राज्यातला राजकीय गोंधळ : पत्रकार हेमंत जोशी


राज्यातला राजकीय गोंधळ : पत्रकार हेमंत जोशी 

शिवसेनाप्रमुख  उद्धव ठाकरे कि मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे, मी जे ते मुख्यमंत्री झाल्या झाल्या अगदी सुरुवातीला सांगितले होते तेच आज तुमचेही सांगणे म्हणणे असेल कि ठाकरे कुटुंबीयांनी यावेळी जो काय स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला तो पुरेसा आहे निदान यापुढे तरी त्यांनी कधीही सत्तेचा मोह बाळगू नये त्या मंत्रालयाचे तोंड देखील बघू नये. राजाने कधीही प्रधान व्हायचे नसते, वाघाने कधीही माकडिणीला डोळा मारायचा नसतो, सिंहाने कधीही हजामत करायला सलून मध्ये जाऊन न्हाव्यासमोर मान झुकवायची नसते आणि एखाद्याने कधीही गाढवाच्या ढुंगणाची पप्पी घ्यायची नसते. उद्धव ठाकरे हे कायम राजाच्या भूमिकेतच शोभणारे, त्यांनी मातोश्रीवर बसून रुबाब करायचा असतो प्रसंगी समोरचा कोणीही भलेही राष्ट्रपती पदासाठी इच्छुक असो अथवा पंतप्रधान होण्यास इच्छुक असो इच्छुकाने यांच्या कडे जायचे असते, यांच्यावर त्यांच्याकडे जाण्याचा, बाहेर बाकावर बसून वाट पाहण्याचा वाईट प्रसंग येत असेल तर सारे संपले म्हणून समजावे. उद्धव यांना अवदसा आठवली, त्यांनी झक मारली आणि ते व त्यांचे चिरंजीव सत्तेत घुसले खुर्चीवर जाऊन बसले. अजूनही खूप काही बिघडले असे नाही, उद्धव व आदित्य या दोघांनीही मंत्रालयातून बाहेर पडावे आणि या राज्यातल्या ज्याला त्याला त्याची जागा दाखवून दयावी…

कोरोना चे गांभीर्य माझ्या लक्षात येत होते, उद्या अगदी रस्त्यावर हजारो माणसे मारून पडतील ढिसाळ  पद्धतीने सारे नियोजन केल्या जात होते म्हणून मी हे तेव्हाच सांगितले होते, नेमके आता तेच घडते आहे, परिस्थिती एवढी गंभीर आहे कि प्रेतं ठेवायला जागा उरणार नाही. यात उद्धव यांची फारशी चूक नाही, अननुभवी उद्धव खुर्चीवर बसल्या बसल्या त्यांच्यावर व जनतेवर हे गहिरे गंभीर घोर संकट ओढवले आहे. खुद्द शिवसैनिकांना देखील यादिवसात कळत नाही कि रस्त्यावर उतरून आंदोलन करावे कि जे काय या कठीण दिवसात घरात बसून आहोत तेच चालू ठेवावे. यादिवसात संघ स्वयंसेवक सोडले इतर कोणीही फारसे सामाजिक बांधिलकी जपताना रस्त्यावर येऊन मदत सहकार्य करतांना दिसत नाहीत. जे असंख्य विशेषतः सोशल मीडियावर किंवा गावागावात होर्डिंग्स लावून स्वतःला वाघ सिंह दादा नेता समाजसेवक म्हणून घ्यायचे, कर्तृत्वाचा कमी जातीचा अधिक आधार घेऊन फुक्काची शान मारत बापाने घेऊन दिलेल्या मोटार बाईकवर बसून गावाबाहेर भरपेट दारू ढोसून घरी त्याच घाणेरड्या तोंडाने येऊन स्वतःच्या बायकांवर शारीरिक व मानसिक अत्याचार करायचे ते सारेच्या सारे कोणत्या बिळात लपून बसले आहेत वर त्यांचे तोंड देखील बघायला मिळत नाही एवढे ते त्या पोलिसांच्या दांडक्यांना घाबरलेले आहेत. संकट मग ते कितीही भयावह असो आजतागायत शिवसैनिक रस्त्यावर उतरून मराठी माणसाचे तारणहार ठरले नाहीत असे कधीही याआधी घडले नाही, शिवसैनिकांचे आक्रमक होऊन रस्त्यावर उतरणे व संघ स्वयंसेवकांचे नियोजनपूर्वक धावून जाणे हे मराठी माणसाला नेहमीचेच वेड लावणारे काम, पण साहेब तिकडे सहाव्या माळ्यावर जाऊन बसल्याने आपल्या समस्त शिवसैनिकांची काहीशी गोची नक्की झालेली आहे. वाईट याचे वाटते कि उद्धव मुख्यमंत्री म्हणून नको त्या एक दोन बदमाशांच्या हातचे बाहुले ठरले आहे झपाट्याने ठरताहेत, दुबळे शिवसेनाप्रमुख हे दृश्य समस्त महाराष्ट्राला अस्वस्थ करून सोडणारे आहे. जी अगदी उघड व्यथा सांगण्याची सुरुवात पृथ्वीराज चव्हाण व राहुल गांधी यांनी केली आहे त्यातून हे आघाडीचे पडलेले भोक कोणत्याही ठिगळाने जोडल्या जाईल असे अजिबात वाटत नाही, मोठी दरी शंभर टक्के निर्माण झाली आहे. आम्हाला असल्या सत्तेत रस नाही हेच जणू अगदी उघड काँग्रेसने सांगून टाकले आहे… 


www.vikrantjoshi.com

अत्यंत महत्वाचे म्हणजे ही ती वेळ नाही उद्धव यांची खुर्ची खेचून घेण्याची आणि हे देवेंद्र फडणवीस चांगले जाणून आहेत कारण त्यांना हे पक्के माहित आहे कि जर असे काही विशेषतः भाजपाकडून केल्या गेले तर त्यांचा निदान या राज्यातला तरी मिळविलेल्या लोकप्रियतेचा ग्राफ झपाट्याने खाली येऊन त्याचा मोठा फायदा विशेषतः शिवसेनेला आणि उद्धव ठाकरे यांना होईल, सेनेला त्यातून जनतेची सहानुभूती मिळेल, त्यामुळे कोरोनाचे संकट दूर होऊपर्यंत या राज्यात सत्तेची कोणतीही उलथापालथ होणार नाही जरी राष्ट्रवादी आणि भाजपा यांना एकत्र येऊन सत्तेत यायचे असले तरी आणि याच संधीचा नेमका फायदा उचलणारा गडकरी सारखा एखादा नेता जर पुढे आला आणि अशा नेत्याने जर भाजपा व उद्धव ठाकरे यांच्यात समन्वय

घडवून आणला तर पुन्हा एकवार शिवसेना भाजपा हि मराठी हि हिंदू युती बेरजेच्या राजकारणाला सुरुवात करून समस्त हिंदूंना दिलासा देऊ शकते. अगदीच एक दोन दिवसांच्या फरकाने २५-२६ मे दरम्यान आधी उद्धव आणि नंतर देवेंद्र दूरदर्शनच्या माध्यमातून जनतेसमोर आले त्यात देवेंद्र उजवे ठरले आणि उद्धव यांना शाळेतले मूल भाषण लिहून देते कि काय, बघणाऱ्या अनुभवींना ते वाटले. आणि हेच नेमके घडता कामा नये, या दोघांच्या भांडणात मानसिक बळी समस्त मराठींचा जाऊन या राज्याशी फारसा संबंध नसलेले सत्तेत बसल्याने माजोर्डे होताहेत जे अतिशय गंभीर आहे. एकमेकात सामंजस्य आणि गहिरी दोस्ती मैत्री हे महाजन मुंडे आणि बाळासाहेब कॉम्बिनेशन पुन्हा एकवार उद्धव देवेंद्र यांच्या रूपाने बघायला मिळावे. अन्यथा तो दिस फार दूर नाही कि सत्तेत बसल्याने ठाकरे कुटुंबीयाने त्यांचे व शिवसेनेचे मोठे नुकसान करवून घेतले. शरद पवार एकदा का घरातून बाहेर पडले कि समजून घ्यावे कि काहीतरी राजकारण बिघडले आहे आणि पवारांनी त्यामुळे वेगळी पावले उचलायला सुरुवात केली आहे. पुन्हा सांगतो पुढल्या काही महिन्यात भाजपा-राष्ट्रवादी आघाडी बघायला मिळाल्यास अजिबात आश्चर्य वाटून घेऊ नये…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top