पार्थच्या निमित्ताने : पत्रकार हेमंत जोशी

पार्थच्या निमित्ताने : पत्रकार हेमंत जोशी 

अलीकडे मुंबईत सगळे जागतिक दर्जाचे ब्रॅण्ड्स उपलब्ध आहेत आणि जगाच्या तुलनेत अतिशय योग्य किमतीत सारे मिळते त्यामुळे पूर्वीसारखे खरेदीला दुबई किंवा अन्य देशात धाव घ्यायची गरज राहिलेली नाही. एक हिंदी गाणे आहे, वो भी क्या दिन थे ब्लॅक से मंगवाते थे, तसे आपले व्हायचे, मुंबईत उतरल्यानंतर कस्टमच्या तावडीतून सुटता सुटता जीव कासावीस व्हायचा. दुबईहून येतांना बाकी काही आणले नाही तरी चालेल पण थोडेफारही सोने आणले नाही तर बहुतेकांच्या बायका नवऱ्याला घरात घ्यायच्या नाहीत. मला आठवते, एकदा आम्ही तिघे मित्र दुबईवरून येतांना सोन्याचे नेकलेस घेऊन आलो होतो, कस्टमच्या लक्षात येऊ नये, नजरेत पडू नये म्हणून आम्ही तिघांनीही ते नेकलेस गळ्यात घातले होते वरून देवानंद सारखे सारी बटणे बंद लावून घेतलेली होती तरीही एका कस्टम अधिकाऱ्याने आम्हाला पकडलेच, बटणे उघडल्यानंतर तो जवळपास अर्धा तास हसत सुटला होता, बाब छोटीशी असायची पण त्यात गम्मत असायची…


लोकसभा निवडणुकीनिमित्ते लिखाण करून आणि तेच ते आरोप प्रत्यारोप ऐकून वैतागलो होतो विरंगुळा किंवा चेंज म्हणून चार दिवस दुबईला जाऊन आलो. तेवढ्यात इकडे पार्थ अजित पवार यांचे व्हायरल करण्यात आलेले काही फोटो बघण्यात आले. आता तुम्ही थोडेसे आठवा, पार्थ यांना जेव्हा लोकसभेची मावळ मधून उमेदवारी जाहीर करण्यात आली तेव्हा मी जो लेख त्यांच्यावर टाकला लिहिला होता त्यात पार्थ नेमके कसे याची हिंट वाचकांना दिली होती. पार्थ असो अथवा अन्य बहुसंख्य नेते, मंत्री, आमदार, खासदार किंवा अधिकारी, अनेकांच्या भानगडी आमच्याकडे या अशा पुराव्यांसहित उपलब्ध असतात पण अशा बदनामी करणाऱ्या माहितीचा शक्यतो लिखाणासाठी आम्ही अजिबात उपयोग करवून घेत नाही आणि ब्लॅकमेलिंग करणे तर डोक्यातही नसते. एक मात्र नक्की, त्या त्या व्यक्तीला हिंट मात्र देतो कि सावध असावे, असे वागू नये. पार्थ पवार यांना संधी मिळाली आणि ते कुठेतरी चांगल्या कामात व्यस्त झाले हे आमच्यासाठी खूप मोठे होते, पार्थ जर पुढले काही वर्षे रिकामे बसले असते तर दुसरे राहुल महाजन येथे या राज्यात जन्माला आले, लोकांनी म्हटले असते. अजित पवारांना माझ्या सत्य तेवढे सांगण्याचा राग येतो पण त्यांना त्या लिखाणात तेच सांगितले होते कि तुमचे तारुण्य नक्की टिकवून ठेवा पण मुलेही लग्नाची झाली आहेत तेवढे लक्षात ठेवा. शेवटी पार्थ आपणहून जेव्हा राजकारणात उतरला तेव्हा आढेवेढे घेत अजित पवार कसेबसे त्याला परवानगी देऊन मोकळे झाले. जे झाले ते अतिशय उत्तम झाले. एवढेच सांगतो, पार्थ मनाने अतिशय चांगला मुलगा आहे, त्याला जनतेने संधी द्यावी, त्याची वैयक्तिक बदनामी करून पुन्हा त्याला फ्रस्ट्रेट करू नये…


इतर अनेकांच्या बाबतीत देखील ते घडावे. अगदी पुढे जाऊन मी सांगतो, अलिकडल्या वर्षा दोन वर्षात फडणवीस मंत्रिमंडळातले असे चार मंत्री आहेत ज्यांना मी आपणहून अगदी पुराव्यांसहित सांगून आलो कि तुमची मुले आणि मुली हाताबाहेर चालले आहेत, लक्ष द्या, पैसे मिळविण्याच्या नादात तुमच्या घरीही राहुल महाजन अवतरले, असे घडायला नको. त्यातल्या दोघांना यश आले ज्यांच्या मुली हाताबाहेर निघून चालल्या होत्या, मुले मात्र अद्याप ताळ्यावर आलेली दिसत नाहीत. हे फक्त इतरांच्या घरी घडते आणि माझ्या घरी संत तुकारामांच्या घरातले वातावरण असते असे अजिबात नाही पण जे जे लक्षात येते ते मुलांच्या नजरेत आणून देतो कि पेज थ्री वातावरण क्षणिक चांगले वाटते पण पुढल्या पिढीतली मुले वयाने लहान असलीत तरी तुमचे म्हणजे पालकांचे, आईवडिलांचे वागणे मुलांच्या तंतोतंत लक्षात येत असते तेव्हा सावध तर असावेच पण जे काय करायचे त्यावर मर्यादा असाव्यात अन्यथा पार्थ सारखी मुले उद्या बापाला अगदी तोंडावर सांगून मोकळी होतील, आधी स्वतःचे ढुंगण धुवून या मग आमची खरकटी आहे, सांगायला या…


उद्या समजा पंकजा मुंडे यांच्या मुलाने आईला सुनावले कि आई तू घरी नसते, राजकारण करत फिरते आणि बाबा पंचतारांकित हॉटेलात नको त्या अवस्थेत पडलेले असतात तर त्यात त्याचे काही चुकले असे म्हणता येणार नाही, पंकजा मुंडे यांचे सहजच उदाहरण दिले, तेथे गिरीश बापट किंवा सुभाष देसाई, असे काहीही नाव टाकता आले असते. १९९० नंतर म्हणजे या राज्यात शरद पवार पद्धतीने किंवा माफिया पद्धतीने नवश्रीमंत होण्याची मोठी लाट उसळली आणि जो तो हिंदूंचे उत्तम संस्कार विसरून हे राज्य विकून वाट्टेल ते करून श्रीमंत होण्यास सरसावला म्हणजे जे शंकरराव चव्हाण सत्तेतून खाली उतरले कि त्यांना किंवा त्यांच्या कुटुंबाला राहण्याची खाण्यापिण्याची चिंता भेडसावायची त्याच शंकरराव चव्हाणांच्या हयातीतच अशोक चव्हाण राजकारणात उतरले आणि त्यांच्याच पोटी जन्मलेले अशोक चव्हाण या राज्यातले अतिशय करप्ट नेते म्हणून उदयाला आले….


लेखातून तुम्हाला अगदी अलीकडे उदाहरण पण दिले होते कि नांदेडचे पालकमंत्री पद सोडल्यानंतर मी जेव्हा शंकरराव चव्हाणांच्या मानसपुत्राला डॉ. श्रीकांत जिचकारांना, पालकमंत्रिपद का सोडले तर ते एवढेच म्हणाले होते अशोक चव्हाण माझ्याकडून वाट्टेल ते करवून घेतील आणि एक दिवस मला बदनाम करून सोडतील. पुढे काही वर्षांनी हाच प्रसंग नांदेडचे पालकमंत्री म्हणून नेमल्या गेलेल्या माणिकराव ठाकरे यांच्यावर देखील ओढवला होता. पुन्हा तेच अशोक चव्हाण हे उदाहरण दिले, साऱ्याच राजकीय पक्षात अगदी पावलोपावली अशोक चव्हाण जन्माला आले आहेत आणि त्यांच्या या करप्ट वागण्याचा उत्तम गैरफायदा दलालानी, पत्रकारांनी, वाहिन्यांनी, प्रशासकीय आणि शासकीय अधिकाऱ्यांनी उचलला आहे, मोठा प्रमाणावर काळा पैसा अधिकाऱ्यांकडे उपलब्ध असल्याने त्यांची मुले, मुली, बायकाही अय्याशी करण्यात आघाडीवर आहेत…


ज्यांच्याकडे काळा पैसे नाही, मेहनतीचा पैसा आहे त्यांना आत्मविश्वासाने एवढेच सांगतो कि लक्ष्मी ज्या मार्गाने येते त्याच मार्गाने निघून जाते. वाम मार्गाने पैसे मिळविणारे कायम एकमेकांना फसविण्यात आघाडीवर असतात त्यामुळे सर्वांच्या घरात हपापाचा माल गपापा, हेच घडलेले असते. माझ्या ओळखीचे एक प्रशासकीय अधिकारी आहेत कि होते, त्यांच्याशी संबंधित एक पेंडिंग फाईल अलीकडे आयकर खात्यातून माझ्या पाहण्यात आली. या अधिकाऱ्याने ज्या पोरवाल आडनावाच्या बिल्डर कडे १५० कोटी रुपये गुंतवले होते, ते १५० कोटी रुपये घेऊन तो बिल्डर हात वर करून मोकळा झाला आहे. १५० कोटी रुपये लहानसहान रक्कम नाही, पण हि रक्कम ज्या मार्गाने आली त्या मार्गाने गेली, उद्या पोरवालच्या बाबतीत देखील हे घडणारच आहे म्हणजे नियती त्यालाही स्वस्थ बसू देणार नाही, हपापाचा माल गपापा. वाममार्गाने पैसे मिळविणारे ते पचविण्यासाठी वाट्टेल त्या थराला उतरत असल्याने जेव्हा प्रामाणिक सर्वसामान्य माणूस या अशा मंडळींच्या तावडीत सापडतो, ते दृश्य मात्र मन हेलावून सोडणारे असते. दुसऱ्यांचे संसार उध्वस्त करून स्वतः श्रीमंत होणारे आमच्यातले बदमाश भारतीय, जेव्हा त्यांची मुले राहुल महाजन निघालेत,त्यांना कळते तेव्हा त्यांनी येथेच नर्क बघितले, म्हणावेसे वाटते…

तूर्त एवढेच.

 पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *