राजकारण गेलं चुलीत, नेते गेले उडत : पत्रकार हेमंत जोशी

राजकारण गेलं चुलीत, नेते गेले उडत : पत्रकार हेमंत जोशी 

विधानसभा निवडणूका दिवाळीआधी आटोपल्या पण नेत्यांचे एकमेकांच्या ढुंगणाखाली फटाके लावणे अद्याप सुरु आहे. आरोप प्रत्यारोपांच्या गदारोळात राज्याच्या विकासाचे अजिबात कोणाला काही पडलेले नाही. यावेळी काही नग असे निवडून आलेले आहेत कि त्यांची तुलना फक्त वसुली दादांशी करता येईल. निवडून येणाऱ्या अनेक बहुतेक उमेदवारांचे हिंदी सिनेमातल्या डाकुंसारखे असते म्हणजे अनेक ठिकाणी दरोडे टाकायचे लुटपाट करायची त्यातले थोडेसे आपल्या गावात वाटून मोकळे व्हायचे म्हणजे मग त्या गावात डाकू देखील मसीहा ठरतो, गावकरी त्याला देव मानतात, देवघरात ठेवतात, निवडून येणाऱ्या अनेक आमदारांचे तसेच असते. जे निवडून आले नाहीत दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकावर होते ते देखील डाकूंच्याच पंक्तीतले फक्त त्यांचे वाटप चुकले किंवा फारतर कमी पडले असे म्हणता येईल. लोकांच्याच कार्यकर्त्यांच्याच घरी जेऊन निवडून येणारे अलीकडे असे फार कमी आहेत दिवंगत सुदाम देशमुखांसारखे…

पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला हवे तसे यश मिळालेले का नाही त्याची नेमकी कारणे फारशी कुठे वाचण्यात आलेली नाहीत, जी करणे मी तुम्हाला सांगणार आहे त्यावर साऱ्याच पक्षाच्या नेत्यांनी विचार करणे गरजेचे आहे. जसे फडणवीसांच्या मंत्रिमंडळात चंद्रशेखर बावनकुळे हे ऊर्जा आणि उत्पादन शुल्क खात्याचे अत्यंत यशस्वी लोकप्रिय आणि खालची मान वर न करता येणाऱ्या प्रत्येकाला सहकार्य मदत करणारे असे मंत्री होते. ज्यांना हमखास उमेदवारी मिळेल ते शंभर टक्के निवडून येतील व पुन्हा मंत्री होतील असे बोलले जायचे किंवा त्यांना स्वतःला देखील तेच वाटायचे, उमेदवारी जाहीर करतांना असे काहीच त्यातले घडले नाही म्हणजे ना त्यांना भाजपाने उमेदवारी दिली ना बावनकुळे यांनी सहज शक्य असतांना पक्षाशी गद्दारी केली. उलट त्यांच्यावर पक्षाने आणि नेत्यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रचाराची जी अनेक मतदारसंघाची जबाबदारी टाकली होती अजिबात खचून न जाता बावनकुळे सतत त्यादिवसात धावपळ करतांना दिसले…

चंद्रशेखर बावनकुळे यांना उमेदवारी का मिळाली नाही त्याची काही करणे आहेत जी मला उघड करायची नाहीत कारण ते माझे मित्र आहेत मित्र होते. पण थेट दिल्लीतून बावनकुळे यांना जेव्हा उमेदवारी न देण्याच्या सूचना येथे मुंबईत आल्या तेव्हापासून तर उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत स्वतः नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी अतिशय मनापासून प्रयत्न केले,  अमित शाह यांना गळ घातली, अगदी विनवण्या देखील केल्या पण त्यांनी शेवटपर्यंत गडकरी आणि फडणवीसांचे देखील ऐकले नाही, बावनकुळे किंवा त्यांच्या पत्नीला देखील उमेदवारी दिल्या गेली नाही. फक्त एकच मोठे गुपित याठिकाणी उघड करतो कि मी चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांचे उजवे हात विश्वास पाठक यांना काही मंडळींच्या बाबतीत त्यांना जवळ करू नका वारंवार सांगत होतो तसेच काही निर्णय घेतांना कमालीची सावधगिरी बाळगावी जीव तोडून सांगत होतो पण ज्यांनी ज्यांनी माझे ऐकले नाही त्या सर्वांचा विनोद तावडे झालेला आहे ज्याचे मला तीव्र दुःख आहे. अत्यंत महत्वाचे म्हणजे राज्यात मोठ्या प्रमाणावर तेली समाज आहे, त्या तेली समाजाने बावनकुळे  यांना भाजपा ने उमेदवारी न दिल्याने मोठ्यांप्रमाणावर विरोधात जाऊन मतदान केले ज्याचा फार मोठा फटका आणि झटका भाजपा उमेदवारांना सोसावा लागला आहे. बावनकुळेंच्या बाबतीत त्यांच्या दिल्लीतल्या पक्षश्रेष्ठींनी एवढी टोकाची भूमिका घ्यायला नको होती, येथे या राज्यात विशेषतः नागपुरातही त्यामुळे भाजपा उमेदवारांचे मोठे नुकसान झाले…

हेमंत जोशी. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *