खासदाराचे अल्टिमेटम २ : पत्रकार हेमंत जोशी

खासदाराचे अल्टिमेटम २ : पत्रकार हेमंत जोशी 

काल परवा एका प्रशासकीय अधिकाऱ्याशी सहजच गप्पा मारीत बसलो होतो, ते म्हणाले, पत्रकार उदय तानपाठक तुमचे सॉफ्ट टार्गेट आहे, मी जोराने हसलो, तुम्ही नेमके उलटे सांगताय, उलट आम्ही सारे पत्रकार, उदयचे सॉफ्ट टार्गेट आहोत, जेवढ्या आमच्या बायका आम्हाला घालून पाडून बोलल्या नसतील, त्यापेक्षा कितीतरी अधिक पाणउतारा तेही अगदी चारचौघात आम्हा सर्वांना सहन करावा लागतो, मी त्यांना म्हणालो. तो वयाचा गैरफायदा घेतो, आम्हा सर्वांपेक्षा तो वयाने मोठा असल्याने….


कानावर पडलय, बजेट अधिवेशनानंतर म्हणे उदय अमेरिकेला निघालाय, अशावेळी त्याला काही सूचना कराव्या लागतात म्हणजे विमानाबाहेर हात काढू नको, विमानात झोपू नको नाहीतर विमान पुढे निघून जाईल, हवाई सुंदरी वाकली म्हणून लगेच आपणही वाकून बघायचे नसते, त्यांचे कपडे बंद गळ्याचे असतात, आणि जे दिसते तसे काहीही नसते, आतून पॅडिंग केलेले असते. विमानात वाट्टेल ते मागू नको, मागल्या वेळी एकाने पाणी मागितले, दुसर्याने पांघरुण माहीतले, तिसऱ्याने सॉफ्ट ड्रिंक मागितले, हे बघून मग उदयने यादीच खिशातून बाहेर काढून वाचायला सुरुवात केली, अमुक द्या तमुक द्या, अंगावर शिंपडायला गोमूत्र द्या, वाचायला हनुमान चालीसा द्या, बटन तुटलंय सुई दोरा द्या, डोक्याला झंडू बाम चोळून द्या, वगैरे वगैरे…


नेमक्या मुद्द्याकडे वळतो. विदर्भातील अकोला जिल्ह्यात भाजपामधले गढूळ  झालेले किंवा ढवळून निघालेले गलिच्छ राजकारण हा विषय येथे मला नेमका विशद करायचा आहे. राज्यमंत्री रणजित पाटलांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा हा अल्टिमेटम स्थानिक भाजपा खासदार संजय धोत्रे यांनी थेट मीडिया समोर मांडला आहे तेही अकोल्याचे स्थानिक आमदार लालाजी उर्फ गोवर्धन शर्मा यांच्या साक्षीने…गोवर्धन शर्मा हवा मग कोणत्याही राजकीय पक्षाची असो अकोलाशहरातून भाजपातर्फे विधानसभेला नेहमी निवडून येतात. ते एवढे साधे सिम्पल आहेत कि अमुक एखाद्याला हात दाखवून त्याची स्कुटर थांबवतात आणि पाठीमागे बसून मार्गस्थ होतात, त्यांच्या त्या मनोहर पर्रीकर यांच्यासारखे म्हणजे कोणत्याही टपरीवर उभे राहून ते चहा घेतील किंवा मिसळ खाऊन जमलेल्यांशी गप्पा मारतील. समजा एखाद्या पिंजऱ्यासमोर उभे राहून शाळेतली मुले माकडाला वाकुल्या दाखवत असतील तर हेही तेच करतील किंवा संघस्थानावर शिशु कोलांटी उडी मारतांना दिसलेत तर हे देखील कोलांट्या उद्या मारून मोकळे होतील. अर्थात तेथे शर्मा आहेत म्हणून ते निवडून येतात असेही नाही कारण अकोला शहर विधानसभा परिघातल्या मतदारांना कट्टर हिंदू उमेदवार तेथे हवा असतो तसेही संपूर्ण अकोला जिल्हा केवळ आणि केवळ जातीच्या राजकारणाने बरबटलेला आहे, किळस येते ती सारी जातीची समीकरणे बघून, लाज वाटते कि जो तो केवळ जात बघून त्या जिल्ह्यात राजकारण खेळतो, निवडणुका लढवतो…


खासदार संजय धोत्रे व त्यांचा गट त्यांच्या नातेवाईकांचा कंपू अशी एकही संधी सोडत नाही जेथे त्यांनी राज्यमंत्री रणजित पाटील यांच्यावर तोंडसुख घेतले नाही आणि एखाद्याने अगदी एकमेव तरी उदाहरण द्यावे कि पाटलांनी संजय धोत्रे असोत किंवा अगदी विरोधी पक्षातलेही, कधी पातळी सोडून अमुक एखाद्याविषयी त्यांनी अपशब्द वापरलेत, कधीही नाही. मला पक्षाने सेवा करण्याची संधी दिली, अधिकार दिले, आमदारकी दिली, शेवटच्या श्वासापर्यंत उद्या भाजपा सत्तेत असेलही नसेलही, मी तेथेच असेल, रणजित पाटील नेहमी हे असे अगदी उघड सांगून मोकळे होतात. वास्तविक रणजित पाटील यांच्याविषयी असलेली मनातली खदखदा धोत्रे आणि कंपूने त्यांच्या पक्षश्रेष्ठींकडे मांडावी पण त्यांचे हे असे उघड उघड सतत धमकी देणे, बघून वाटते त्यांनाही स्वतःचा नाना पटोले करवून घ्याचा असेल म्हणून ते उठसुठ आपले गार्हाणे अंतर्गत न मांडता, मीडियासमोर ते घसा खाकरून खाकरून मांडताहेत. डॉ. नेने यांना माधुरी मिळाली म्हणून आम्ही नेने यांचा राग करणे किंवा उद्या समजा लोणीकरांनी दोन तीन लग्ने केलीत म्हणून अविवाहित राजन पारकर यांनी उठसुठ त्यांच्या अंगावर धावून जाणे रावल यांनी जमिनी हडपल्या म्हणून मीही तेच कारेन असे एखाद्या स्थानिक नेत्याने म्हणणे जसे चुकीचे ठरते ते तसे त्या अकोल्यातही, म्हणजे ‘तेरी साडी मेरे साडीसे सफेद क्यो, धर्तीवर केवळ रणजित पाटलांना राज्यमंत्रीपद मिळाले आणि आपल्याकडे ते चालून आलेले नाही असे जर काहींना वाटत असेल तर हे असे अस्वस्थ होणे साफ चुकीचे, त्यांना आज मिळाले, तुम्ही चांगले वागलात तर उद्या ते नक्की तुमच्याकडेही चालून येऊ शकते, अस्वस्थतेचे लक्षण म्हणजे अपरिपकवतेचे गचाळ दर्शन आहे असेच त्या अकोल्यातले सारे सांगतात आणि भाजपातले तर कपाळावर हात मारून घेतात, उर बडवून घेतात, तोबा तोबा म्हणतात…

क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *