स्त्री पुरुष तुलना आणि फरक : पत्रकार हेमंत जोशी

स्त्री पुरुष तुलना आणि फरक : पत्रकार हेमंत जोशी 

स्वयंपाक अधिक चवदार रुचकर कोण बनवतं स्त्रिया कि पुरुष त्यावर माझे उत्तर आहे कि आम्ही पुरुष तुम्हा स्त्रियांपेक्षा कितीतरी पटीने अधिक स्वादिष्ट भोजन तयार करू शकतो म्हणून जगात कुठेही नजर टाका म्हणजे थेट पंचतारांकित हॉटेल्स पासून तर रस्त्यावरच्या ढाब्यापर्यंत अत्र तत्र सर्वत्र तुम्हाला पुरुषांचीच मक्तेदारी याही क्षेत्रात बघायला मिळेल मिळते. हाच प्रश्न मला कायम लिखाणाच्या बाबतीतही पडलेला असतो कि अधिक उत्तम लिखाण कोणाचे म्हणजे स्त्रियांचे कि आम्हा पुरुषांचे, येथे मी अधिक गूण स्त्रियांना देऊ इच्छितो. शब्दरचना स्त्रियांच्या खूप प्रभावी असतात पण स्त्रियांना विविध विषयांवर लिहितांना मोठी मर्यादा येते त्यामुळे आम्ही पुरुष अधिक वाचनीय ठरतो कारण आजही केवळ मराठी स्त्रियांचे येथे उदाहरण घेतले तर त्यांना चौकटीत राहूनच लिखाण करावे लागत असल्याने अनेकदा ते वाचनीय नसते पण पुरुषांना लिखाणाच्या ना चौकटी आहेत ना मर्यादा आहेत त्यामुळे कुठेही भटकून ते विविध प्रत्यक्षदर्शनी विषयांवर लिहून मोकळे होतात. वाचकमित्रहो, पुरुषांचे शब्द प्रभावी ठरत नसले तरी विषय प्रभावी ठरतात त्यामुळे ते वाचनीय असतात….

पत्रकार भाऊ तोरसेकर आणि त्यांच्या पत्नी स्वाती तोरसेकर दोघेही पट्टीचे लेखक किंबहुना स्वाती शब्दांशी वाक्यांशी खेळतांना अधिक प्रभावी वाटतात पण  घराच्या चौकटीत राहून त्यांना लिखाण करायचे असते आणि भाऊंचा संपर्क जनसंपर्क भटकंती साराच आवाका भला मोठा त्यामुळे भाऊ अधिक प्रभावी ठरले आणि लिखाण अतिशय उत्तम असून स्वातीवहिनींना नक्कीच भाऊंच्या एवढी मान्यता लोकप्रियता मिळाली नाही. कवितांच्या बाबतीत देखील असे का घडते कळत नाही पण आधी आणि आजही कवयत्री पेक्षा कवी लोकप्रियतेच्या बाबतीत खूपच पुढे निघून गेलेले दिसतात असतात. मी तर त्याहीपुढे जाऊन असे म्हणेन कि जेव्हा शंभर नामवंत कवी पुढे निघून जातात तेव्हा कुठेतरी एखादी शांता शेळके किंवा बहिणाबाई चौधरी जन्माला येते नामवंत ठरते. अनेकदा असे वाटते कि चौकटीच्या मर्यादा तोडून जर आजची स्त्री लिखाण करू लागली तर त्यांच्यातही अनेक राही भिडे, रोहिणी निनावे बघायला मिळतील. गिरिजाबाई किर हयात असतांना एकदा मी त्यांना हेच म्हणालो होतो कि तुम्ही शेकडो पुस्तके लिहिलीत पण लक्षात राहील असे लिखाण कधी तुमच्या हातून घडले नाही मात्र तुमच्या वरच्या माळ्यावर राहणाऱ्या वपु काळे यांची सारी पुस्तके मुखोद्गत असलेले कितीतरी मराठी वाचक या जगात आहेत…


www.vikrantjoshi.com

माझे १४००० हजाराच्या आसपास फेसबुक फ्रेंड्स आहेत त्यात जगातल्या राज्यातल्या अशा अनेक स्त्रिया आहेत कि ज्यांचे लिखाण मला मंत्रमुग्ध करते. अगदी मनातले सांगतो कि या स्त्रियांच्या लिखाणाची ताकद जर माझ्या शब्दांमध्ये असती तर मला खात्री आहे आणखी कित्येक कोटी रुपये मी त्या भरवशावर मिळवून मोकळा झालो असतो. शेवटी तेच कि या निष्णात फेसबुक महिला फ्रेंड्सचे केवळ शब्द किंवा भाषा तेवढी प्रभावी आहे असते पण त्यांचे विषय प्रभावी प्रॅक्टिकल नसल्याने त्यांना हवी तेवढी लोकप्रियता मिळत नसावी. विशेषतः स्त्रियांच्या कवितांचे विषय आणि शब्द यात एवढे साम्य असते कि वाचणाऱ्याला वाटावे एकाच कवयित्रीने वेगवेगळ्या नावांनी कविता काव्य तयार केले असावे. कदाचित रोहिणी निनावे ला वाईट वाटेल पण तिच्यापेक्षा कितीतरी अधिक पटींनी माझ्या कितीतरी महिला फेसबुक फ्रेंड्स काव्य रचण्यात अधिक प्रभावी आहेत पण स्वतःला घराच्या समाजाच्या विशिष्ट चौकटीत त्यांनी जखडून ठेवलेले असावे त्यामुळे त्यांना रोहिणी निनावे होता आले नाही किंवा तिच्यापुढे जाता आले नाही. रोहिणी मात्र प्रसंगी वैवाहिक जीवन किंवा सरकारी नोकरीवर लाथ मारून तिन लिखाणात स्वतःला झोकून दिले तो सारा तिचा इतिहास माझ्यासमोर आहे. बघा, तुमच्यातल्या कोणाला शांताबाई शेळके रोहिणी निनावे होता आले तर…

क्रमश: हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *