घराणेशाही बालुशाही पेक्षा…पत्रकार हेमंत जोशी

घराणेशाही बालुशाही पेक्षा…पत्रकार हेमंत जोशी 

ज्यांना मधुमेह आहे त्यांनी पाकातली तुपातली बालुशाही खाणे जसे घातक त्यापेक्षा कितीतरी घातक खतरनाक धोकादायक हानिकारक आहे ती या देशाला या राज्याला लागलेली घराणेशाहीची कीड. ज्यांना साखर खाणे धोक्याचे ते मग शुगरफ्री वापरतात तसेच या नेत्यांचेही, महिला धोरण आले, लगेच या नेत्यांनी कित्येक नेत्यांनी राजकारणाचा समाजकारणाचा शासन प्रशासनाचा गंध नसलेल्या आपल्या बावळट अडाणी सुनांना मुलींना बायकांना निवडणुकीत उतरविले निवडून आणले आणि सत्तेत बसविले. नियम कोणतेही काढा, आम्ही भारतीय पुढल्या काही तासात त्यावर पर्याय काढून शोधून मोकळे होतो. आणखी एक गंभीर विषय याच घराणेशाहीशी संबंधित सांगतो, या राज्यात शासकीय नोकरीत येण्यासाठी ज्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात, मागल्या वीस वर्षांचे रेकॉर्ड जर तुम्ही तपासले तर या राज्यातले विशिष्ट समाजातलेच मुले मुली शेकडा ७५ टक्के सरकारी नोकरीत आल्याचे तुम्हाला दिसेल, फक्त जेवढे आरक्षण आहे तेवढे भरल्या जाते बाकी सरसकट तेथेही मोनोपली दिसते, चौकशीतून फार काही निष्पन्न होईल वाटत नाही कारण चौकशी करणारे देखील त्याच घराण्यातले, त्यांचीच पिल्लावळ असते, इतरांनी फक्त मूग गिळून बसायचे असते…


२४ अकबर रोड वर म्हणजे काँग्रेस च्या मुख्यालयात अलीकडे मोतीलाल व्होरा, गुलाम नबी आझाद यांच्या नावाच्या पाट्या काढून थेट राहुल गांधी यांच्या केबिन शेजारी प्रियांका गांधी-वढेरा नावाची पाटी लावण्यात आली जशी राष्ट्रवादीच्या कार्यालयात सुप्रिया सुळे-पवार, अजित पवार या नावाच्या पाट्या कित्येक वर्षे आधीच लागलेल्या आहेत. पवार घराण्यातल्या आणखी काही पाट्या लवकरच लागताहेत हेही तुम्हाला माहित आहेच. साऱ्याच पक्षातल्या नेत्यांना घराणेशाहीची चटक लागलेली त्यामुळे ठाकरे कुटुंबाची आज तिसरी चवथी पिढी गादीवर आहे उद्या पुढली पिढी असेल, ठाकरे यांच्या गादीवर दिघेंन्नी बसण्याचा प्रयत्न कधीही करायचा नसतो. टेन्शन येऊन माणूस मरतो किंवा दिव्या ढोले होतो, भारती लव्हेकरांना भाच्याला पुढे न्यायचे असते, दिव्या ढोले मग भाजपाच्या असूनही त्यांना घर सोडून दूर कुठेतरी मग धारावीत जाऊन काम करावे लागते…


मूठभर लोकांच्या हाती हा देश हे राज्य त्यातले देखील चांगले अगदी बोटावर मोजण्या एवढे, हेच मूठभर राजकारणात शासनात आणि हल्ली हल्ली तर प्रशासनातही, इतर सारे त्यांच्या गुलामासारखे, दहशतीपुढे आम्ही सारे कमालीचे गांडू कारण ते सारे पारधी आणि आम्ही गरीब प्राणी त्या सस्यासारखे, मान वर करून काही बोलू तर क्षणार्धात आमची शिकार करण्यात येते. इलाज काही नाही, अजिबात नाही, मोकळ्या श्वासाने मतदान करू म्हटले तर तीही हिम्मत नाही त्यामुळे तीच ती घराणी कायम सत्तेत आणि सत्तेतून अति श्रीमंत होत गेलेली कारण देश लुटायचा अधिकार फक्त त्यांना आणि त्यांनाच जणू या देशातली हि अप्रत्यक्ष गुलामगिरी…


विखे पाटलांची चवथी पिढी राजकारणात, मुलायम सिंग यांनी मुलाला राजकारणात आणले, महिला आरक्षण येताच मुलाने पत्नीला पुढे केले तेच येथे चव्हाण घराण्याचे झाले, अगदी शंकरराव चव्हाण यांना देखील मोह आवरला नाही त्यांनी वादग्रस्त मुलास व जावयाला पुढे केले आणि चिरंजीवांनी राजकारणाचा राज्याचा गंध नसलेल्या पत्नीलाच आमदार केले. डॉ. श्रीकांत जिचकार दिवंगत शंकरराव चव्हाण यांच्या मंत्री मंडळात राज्यमंत्री होते त्यांच्याकडे शंकररावांनी एक अभ्यासू प्रामाणिक तेजस्वी मंत्री म्हणून मुद्दाम नांदेडचे पालकमंत्रिपद सोपविले होते. पण जेव्हा डॉ. जिचकार यांनी चिरंजीव अशोक चव्हाण यांचे उलटे सुलटे कारनामे बघितले, नको त्या भानगडींना साथ देणे आणि बदनाम होणे म्हणून मोठ्या खुबीने म्हणजे लंडन मध्ये उपचार घेत असलेल्या वडिलांच्या तब्बेतीचे कारण पुढे करून स्वतःची सुटका करवून घेतली. हा किस्सा अगदी मृत्यूपूर्वी डॉ. जिचकार यांनी मला आणि भय्यू महाराजांना आम्ही एकत्र गप्पा मारीत असतांना सांगितला होता. दुर्दैवाने शिस्तीच्या त्याच हेड मास्तरांनी बेशिस्त अशोक चव्हाणांचे मात्र अति फाजील लाड करून या राज्याचे मोठे नुकसान करवून ठेवले…


सारेच एका माळेचे मणी, तिकडे लालू यादवांनी बायकोला आणि मुलामुलींना राजकारणात आणलेले असेल तर इकडे या राज्यातल्या एकही नेत्याने गणपतराव देशमुख यांच्यासारखे चार दोन अपवाद सोडले तर फार वेगळे काहीही केलेले नाही. पुढे हेच नातेवाईक त्या मुलायम घराण्यांसारखे मग एकमेकांच्या जीवावर उठतात म्हणजे तटकरे घराण्यात अद्याप तेवढ्या एकमेकांच्या अंगावर तलवारी निघायच्या बाकी आहेत. सुनील म्हणतात मी अनिल यांना सत्तेत आणले राजकारणात उतरविले तर अनिल यांचेही मग तेच सांगणे म्हणणे, त्यामुळे ते दोघे आणि त्यांची पुढली पिढी, एकमेकात तुंबळ युद्ध केवळ वाट्यावरून सुरु आहे, विकासाचे कोणालाही काहीही देणे घेणे नाही नसते त्यामुळे पुढल्या काही वर्षानंतर सुनील तटकरे यांच्या मुलीची मुले आणि मुलाची मुले अनिल सुनील सारखे एकमेकात भिडलेले दस्तुरखुद्द सुनील यांनी आपल्या डोळ्यांनी बघितले तरी त्यात फारसे आश्चर्य वाटून घेण्यासारखे नाही कारण सत्ता हि गँगस्टर सारखी असते येथेही केवळ वाटणीवरून तलवारी बंदुका चालतात आणि एक दिवस सर्वांचा ‘ केशव भोसले ‘ होतो, मुलगा आणि बाप एकमेकांवर बंदुकी चालवून मोकळे होतात…

अपूर्ण:


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *