उद्धवनीती : पत्रकार हेमंत जोशी

उद्धवनीती : पत्रकार हेमंत जोशी 

अनेकांनी अनेक प्रयत्न केले तरीही त्या दोघांना उद्धव ठाकरे यांनी कधीही दूर केले नाही, सर्वाधिक शिव्याशाप त्यांनाच झेलावे सोसावे लागतात, नेते शिवसेनेतले असोत अथवा बाहेरचे काड्या करणारे स्वतः उद्धव ठाकरे हेच असतात पण बदनाम ते दोघे होतात, शिव्या आणि शाप त्या दोघांनाच सहन कराव्या लागतात. त्या दोघांच्या रांगेत बसण्याचा उद्धव यांचे जनसंपर्क अधिकारी हर्षल प्रधान किंवा अभिनेते कम नेते आदेश बांदेकर यांच्यासारख्या अनेकांनी प्रयत्न केले, पण त्यांचे स्थान कोणालाही मिळविता पटकविता आले नाही. इतर ते स्थान मिळविण्यासाठी जे डावपेच आखतात त्यावर त्या दोघांनी कधीही त्रागा केला नाही, बदला घेतला नाही, ते मनाशी नक्की हेच म्हणत असतील, हत्ती चले बजार तो कुत्ते भुके हजार…


मिलिंद नार्वेकर आणि संजय राऊत दोघेही शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे आणि संपूर्ण ठाकरे कुटुंबियांचे उजवे व डावे हात आहेत, त्या दोघात उजवा कोण आणि डावा कोण, हे मात्र सांगणे तेवढे सोपे नाही. संजय राऊत यांना नक्की राजकीय महत्वाकांक्षा आहे, त्यातून ते स्वतः राज्यसभेवर गेले, भाऊ सुनील राऊत यांनाही त्यांनी आमदार केले. मिलिंद नार्वेकर यांना राजकीय महत्वाकांक्षा आहे किंवा नाही हे ते स्वतः बोलायला वागायला अतिशय फटकळ, मनमोकळे असूनही अगदी त्यांच्या जवळच्याही मंडळींच्या मित्रांच्या मिलिंद नार्वेकर यांच्याविषयी लक्षात येत नाही कि त्यांना राजकीय महत्वाकांक्षा आहे किंवा नाही, मला वाटते ती असती तर ते याआधीच आमदारकी खासदारकी मिळवून मोकळे झाले असते…


संजय राऊत किंवा मिलिंद नार्वेकर यांच्या मागच्या रांगेतल्या बांदेकर, यांच्यासारख्या जवळपास साऱ्याच मंडळींना राजकीय महत्वाकांक्षा नक्की आहे पण मिलिंद नार्वेकर यांच्या मनातले अद्याप त्यांच्या ओठावर आल्याचे कधी कानावर आलेले नाही. वास्तविक शिव्या आणि शाप द्यायचे तर त्या उद्धवजींना द्यायले हवेत पण ते घडत नाही याउलट भाजप असो वा सेनेतून राज ठाकरे किंवा नारायण राणे यांच्यासारखे कितीतरी नेते किंवा राजकीय दृष्ट्या महत्व कमी झालेले मनोहर जोशी यांच्यासारखे सेनेतले देखील सारे, शिव्या आणि श्याप या दोघांनाच सहन करावे लागतात. वास्तविक हे किती साधे राजकीय गणित आहे कि ज्या उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेत १९९९- २००० च्या दरम्यान मातोश्रीवर आणि शिवसेनेत किंवा ठाकरे कुटुंबावर दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरे यांच्यावर देखील पूर्णपणे पकड घेतल्यानंतर त्यांनी जे काय बदल घडवून आणलेत ते सारे निर्णय फक्त आणि फक्त त्यांचे स्वतःचे होते फारतर बाळासाहेब ठाकरे त्यांना तेवढ्यापुरते मार्गदर्शन करायचे पण अंतिम निर्णय घेणारे उद्धव ठाकरे हेच असतांना साऱ्यांचे वाट्टेल ते ऐकून घ्यावे लागते, घ्यावे लागले ते फक्त आणि फक्त संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांना, रश्मी ठाकरे यांच्याकडे देखील फारसे बोट दाखविल्या गेले नाही..


www.vikrantjoshi.com


नार्वेकर आणि राऊत हे हिरो कमी लोकांचे आहेत पण त्यांच्याकडे शक्ती कपूर, अमरीश पुरी, ललिता पवार, शशिकला, मदन पुरी, प्राण, कादर खान, के. एन. सिंह, बिंदू म्हणजे थेट खलनायक, दुष्ट पुरुष, सिनेमातल्या जीवन सारखे काडी लावणारे म्हणून बघणारेच खूप आहेत, असंख्य आहेत, अनेक आहेत, लाखो आहेत, बहुसंख्य आहेत, ते अनेकांच्या मनातले खलनायक आहेत, असे ऐकले आहे कि ज्या दिवशी त्यांच्या विरोधात उद्धव यांच्याकडे काहीतरी वाईट बोलल्या सांगितल्या जात नाही त्यादिवशी उद्धव ठाकरे यांना करमत नाही, चुकल्या चुकल्या सारखे वाटते. विशेष म्हणजे संजय राऊत मिलिंद नार्वेकर यांच्याविषयी जेव्हा केव्हा एखादा थेट उद्धव यांच्या कानात फुसफुस करतो, उद्धव ती निंदा आधी शांतपणे ऐकून घेतात नंतर सांगणाराला ते म्हंतातही कि तुमचे सांगणे कसे तंतोतंत योग्य आहे नंतर हळूच उद्धवजी आतल्या हवाबंद खोलीत जातात जेथे बाहेरच्या माणसाला काहीही ऐकू येत नाही, तेथे एका कोपऱ्यात उभे राहतात आणि जोरजोराने लाफ्टर क्लब चे सदस्य असल्यासारखे स्वतःशीच हसायला लागतात, तणावमुक्त होऊनच ते बाहेर येतात…


पुन्हा एकवार तेच अतिशय साधे गणित सांगतो कि अनेकांचे विरोध पत्करून देखील आल्या दिवसापासून राऊत आणि नार्वेकर यांचे महत्व कमी न होता झपाट्याने वाढलेले आहे याचा सरळ अर्थ असा त्यांचे बोलविते धनी उद्धव ठाकरे हेच आहेत त्यामुळे उद्धव यांच्याकडे त्या दोघांविषयी त्रागा व्यक्त करून काहीही साध्य होत नसते याउलट सांगणाऱ्याचे, राऊत किंवा नार्वेकर यांच्या विरोधात सांगणाऱ्यांचे महत्व कमी कमी होत जाऊन एक दिवस विरोधात बोलणारा थेट नारायण राणे यांच्या सारखा प्रभावी नेता जरी असला तरी फार मोठे राजकीय नुकसान त्या नेत्याचे होते, या दोघांचे वाकडे झाले, महत्व कमी झाले असे कधी झाले नाही, होणार नाही, याउलट जेवढा अधिक विरोध त्यांचे महत्व वाढत गेल्याचे दिसते. मला वाटते संजय राऊत व मिलिंद नार्वेकर या दोघांशी जुळवून घेणे त्यांनाच विश्वासात घेणे केव्हाही उत्तम थोडक्यात डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून सामना या वृत्तपत्राकडे तसेच नार्वेकर, राऊत या जोडगळीकडे बघणे अधिक चांगले.जर शिवसेनेत राहूनकाही मिळवायचे असेल किंवा विरोधकांना, भाजपा नेत्यांना जर उद्धव आणि सेनेकडून काही पदरात पाडून घ्यायचे असेल तर नार्वेकर राऊत यांच्याशी मैत्री ठेवणे केव्हाही डोक्यास तापदायक नाही उलट लाभदायक असते…

क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *