संथ वाहते कृष्णामाई : पत्रकार हेमंत जोशी


संथ वाहते कृष्णामाई : पत्रकार हेमंत जोशी 

मुख्यमंत्री या नात्याने उद्धव ठाकरे म्हणजे संथ वाहते कृष्णामाई, या गाण्याच्या ओळीसारखे हे राज्य प्रत्येक दिवस हाकताहेत, एखाद्या नेत्याने त्यांना अगदी समोर येऊन वाकुल्या दाखवल्या काय किंवा एखाद्या सेनानेत्याने त्यांचे पोवाडे गायले काय, एखाद्या खुशमस्कर्याने त्यांना एकांतात गाठून नागीन डान्स केला तरी किंवा एखाद्याने समोर येऊन भांगडा केला तरी, उद्धव ठाकरे यांना कोणताही काहीही फरक पडत नाही, एखाद्या संकटाने ते विचलित होत नाहीत किंवा अमुक एखाद्या आनंदाच्या प्रसंगी ते खुश होऊन स्वतःभोवताली गोल गोल गिरक्या घेत नाहीत त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री कार्यालयातले दोन हेडमास्तर देखील त्यांच्या स्वभावालाच साजेशे घेतले आहेत, विकास खारगे आणि सीताराम कुंटे, याही दोघांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या मनातले नेमके काय तुम्हाला कळणार नाही जे आजपर्यंत मिसेस कुंटे किंवा मिसेस खारगे यांना कळले नाही तेथे तुम्ही आणि आम्ही कोण ? आम्ही आता काहीतरी वेगळे आहोत असे या तिघांनाही दाखवयाचे नसल्याने अनेक खुशमस्कऱ्यांची अवस्था या तिघांनीही अशा तरुणीसारखी करून ठेवलेली आहे कि जिचे प्रेम प्रकरण भलत्याशी आणि लग्न वेगळ्या पुरुषाशी होते, अशावेळी काय होते अशा तरुणीचे कि लग्नानंतर देखील तिच्या तोंडात नवर्याच्या ऐवजी प्रियकराचे नाव अनेकदा येत राहते त्याच पद्धतीने येथेही म्हणजे आजही अनेक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असा उल्लेख करून मोकळे होतात…


www.vikrantjoshi.com


पण उद्धव यांचा स्वभाव किंवा त्यांचे वागणे गाण्यातल्या पुढल्या ओळींसारखेही नक्की नाही म्हणजे, तीरावरल्या सुख दुःखांची जाणीव तिजला नाही, हे असेही त्यांचे वागणे नाही फक्त ते कोणत्याही भावना व्यक्त करणे किंवा चेहऱ्यावर आणणे त्यांच्या ते स्वभावात नाही त्यामुळे उद्धव रागावले आहेत कि रोमँटिक मूड मध्ये आहेत, ते चिंतेत आहेत कि त्यांना एकांतात एकट्यानेच गळा काढून एखादे गाणे म्हणण्याधी लहर आलेली आहे हे असे जेथे रश्मी वहिनींना एवढ्या वर्षात समजलेले नाही तेथे तुम्ही आम्ही कोण. गेले सहा महिने मातोश्रीशी अतिशय निगडित नेता किंवा श्रीधर पाटणकर यांच्या सारखा एकही नातेवाईक असा नव्हता कि ज्या प्रत्येकाला उद्धव यांचे सर्वेसर्वा म्हणाल तर उद्धव यांचा हनुमान किंवा म्हणाल तर उद्धव यांचा उल्लेख शंकर महादेव केला तर नंदीबैल मिलिंद नार्वेकर यांना मातोश्रीवरून बाहेर काढायचे नव्हते किंबहुना मिलिंदचाही जयंत जाधव करायचा होता, सदस्य मग ते थेट ठाकरे कुटुंबातील असतील किंवा नेते मग ते संजय राऊतांसारखे चोवीस तास केव्हाही मातोश्रीवर उठबैस करणारे असतील, ज्या त्या प्रत्येकाला म्हणजे ज्यांचा उद्धव यांच्याकडे शब्दाला मान आहे असे सारे, प्रत्येकाला मिलिंद नार्वेकर यांना मातोश्रीवरून बाहेर काढायचे होते, बाळासाहेब ठाकरे यांचा जसा थापा होता त्यापुढे कितीतरी पावले पुढे मिलिंद नार्वेकर त्यामुळे प्रत्येकाला काहीसे डोईजोड झालेले वाटणारे नार्वेकर उद्धव यांच्या सभोवताली सतत त्यामुळे आदित्य यांची देखील अवस्था अगं बाई सासूबाई मधल्या बबड्यासारखी झालेली होती कारण मिलिंद हे उद्धव ठाकरेंच्या भोवतालीचे जणू गिरीश ओक असेच आदित्य यांच्यासहित साऱ्यांना वाटत होते…

उद्धव ठाकरे विशेषतः मुख्यमंत्री झाल्यानंतर तर मिलिंद नार्वेकर यांना उद्धवजींनी कायमचे दूर केलेले आहे, या अफवांनी बातम्यांनी खूप जोर पकडला होता पण तसे काहीही घडले नाही कारण तेच उद्धव यांच्या मनातली भूमिका जेथे थेट रष्मीवहिनींना खोडून काढणे शक्य नसते तेथे इतर कोणीही काहीही करणे शंभर टक्के अशक्य असते आणि उद्धव यांना जर मिलिंद नार्वेकर शंभर टक्के आजही पसंतीचे असतील तर वरून थेट बाळासाहेबांनी जरी उद्धव यांना त्या मिलिंदला दूर कर, सांगितले तरी उद्धव हे निर्णय न बदलणारे नेते आहेत म्हणून मी वारंवार सांगतो आहे कि उद्धव यांना ओळखणे कोणाचेही काम नाही त्यामुळे त्यांनी मिलिंद नार्वेकर यांची हकालपट्टी केली नाही वरून त्यांची त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयात नेमणूक करवून घेतली असल्याने मिलिंद विरोधकांचे चेहरे हवाबाण हरडे घेतल्यासारखे झालेले आहेत, उतरलेले आहेत. उद्धव नेमके कसे हे न समजलेल्या अजित पवारांनी उद्धव यांच्यापुढे जाण्याचा प्रयत्न करू नये हा त्यांना आमचा मनापासूनचा सल्ला…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *