अय्यागडे इश्यगडे ! माझा आवडता नेता साऱ्यांना आवडे !! पत्रकार हेमंत जोशी

आज याठिकाणी जे काय लिहिणार आहे ते तुम्ही नीट आधी वाचून ठेवा नंतर जपून ठेवा प्रेयसीने पाठवलेल्या प्रेम पत्रासारखे कारण हे लिखाण तुम्हाला पुन्हा एकदा उघडून बघावे लागणार आहे. माझे या राज्यातले आजवरचे तसे अनेक आवडते नेते आहेत किंबहुना माझा जसा अमुक एखादा स्पेसिफिक अभिनेता किंवा अभिनेत्री आवडते नाहीत ते त्या त्या सिनेमापुरते आवडलेले आहेत तसे मित्र प्रशांत दामले मला अमुक एखाद्या सिनेमात किंवा मालिकेत कधीच आवडलेला नाही पण त्याच्या विविध नाटकातल्या भूमिका, त्या बघण्यासाठी मी काहीही करू शकतो म्हणजे एकदा तर थेट लंडन मध्ये दूरवर कुठेतरी त्याच्या एका नाटकाचा प्रयोग होता, तुम्हाला आश्चर्य वाटेल, मी लंडन फिरायचे सोडून तेथे कितीतरी दूरवर एका उपनगरात त्याचे ते नाटक बघायला पोहोचलो त्यावर माझा चैतन्य जयंत जोशी नावाचा मूळ गाववाला मित्र साक्षीदार आहे, किंवा मला तेथे बघून प्रशांत देखील आधी दचकला मग सावरला कारण वयस्क वंदना त्याच्या संगतीने होती कोणीही तरुण अभिनेत्री त्या नाटकात नव्हती. लोकांना शाहरुख खानचे सिनेमे भलेही आवडत असतील पण मला त्याचे अगदी मोजके सिनेमे आवडलेले आहेत, एकदम फाल्तुक जातीयवादी व व्यसनी अभिनेता असे माझे त्याच्याविषयी अधिकृत मत आहे अर्थात त्या जोडप्याच्या देशद्रोही व्यसनांवर त्याचा मित्र अर्जुन रामपाल अधिक सांगू शकेल. मला या राज्यातले नेते देखील त्यांच्या त्या त्या वेळेच्या घेतलेल्या निर्णयांवर भूमीकेवर आवडतात अगदी शरद पवार देखील माझे ऑल टाइम फेव्हरेट नाहीत पण आवडण्याच्या बाबतीत ते माझ्यासाठी अतिशय वरच्या क्रमांकावर आहेत, एक नेता मात्र असा आहे जो मला कायम आवडत आलेला आहे, काल आवडत होता, आज आवडतो आणि उद्या देखील आवडेल कारण त्याच्या डोक्यात कायम देशभक्तीचे वारे घोंघावत असते अर्थात तो नेता देवेंद्र फडणवीस आहे हे तुम्हाला वेगके सांगण्याची आवश्यकता नाहीच. मला तुम्हाला शाळेत जसे सांगायचे कि माझा आवडता नेता या विषयावर निबंध लिहून आणा तसे आज जर पुन्हा कोणी सांगितले तर मी शंभर टक्के : आवडता नेता देवेंद्र फडणवीस : असे लिहून मोकळा होईल. अलीकडे म्हणे माझ्या शाळेतल्या एका विद्यार्थ्याने माझा आवडता नेता जयंत पाटील असा निबंध लिहून आणला होता तेव्हा अख्खी शाळा त्याच्यावर फिदी फिदी हसली होती…

जेव्हा माझा आवडता नेता अगदी जाहीर सांगतो कि आम्हाला पुढे फार दिवस विरोधात बसायचे नाही तेव्हा त्याच्या सांगण्याला अर्थ असतो बेस असतो सत्यता असते उगाच वाट्टेल ते बरळून सांगून मोकळा होणार्यातला तो टाइम पास नेता नाही हे नक्की आहे आणि तशा जोराच्या हालचाली कोरोना ओसरताच राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरु झालेल्या आहेत आणि राज्यात राजकीय बदल किंवा राजकीय उलथापालथ मोठ्या प्रमाणावर होणार घडणार आहे हि आता काळ्या दगडावरची रेघ रेष आहे. ज्या नव्या राजकीय सिनेमाची तुम्ही सारे अगदी आतुरतेने वाट बघत होता ती वेळ नक्की येऊन ठेपलेली आहे आणि जर पुढल्या काही महिन्यात हे असे राजकीय समीकरण बदलले नाही तर त्यानंतर पुढे उरलेली सारी वर्षे काहीही घडणार नाही त्यातून राज्यातल्या भाजपचेच मोठे नुकसान होईल आणि हे नुकसान भाजपाला नक्की येथे व देशातही परवडणारे नसल्याने राज्यात राजकीय बदल अटळ आहेत हेच नेमके मला येथे मुख्यत्वे म्हणायचे बोलायचे लिहायचे आहे किंवा तुम्हाला लेखी द्यायचे आहे. सत्तेतून काँग्रेस बाहेर पडेल हे जवळपास नक्की ठरले आहे पण काँग्रेस बाहेर पडल्यानंतर ती उरलेल्यांना बाहेरून पाठिंबा देईल असे अजिबात नाही किंवा भाजपातले काही आमदार फुटतील आणि ते राष्ट्रवादी किंवा शिवसेनेला सामील होतील असे तर अजिबात घडणार नसल्याने मला येथे नेमके तेच सांगायचे आहे कि महाआघाडीचे अस्तित्व व भवितव्य आता अंधारलेले व अस्थिर झालेले अधिक दिसते आहे आणि येथे राजकारणात तुमची इच्छा काय आहे असते त्याला अजिबात अजिबात महत्व नसते म्हणजे मला तर आजही वाटते कि दोन हिंदू संघटनांनी राजकीय पार्टींनी म्हणजे शिवसेना आणि भाजपा किंवा भाजपा आणि मनसे यांनी कायम एकत्र असावे एकत्र नांदावे पण यापुढे तसे अजिबात घडणार नाही माझ्या मनासारखे आता काहीही होणार नाही, एक मात्र माझ्या आमच्या तुमच्या साऱ्यांच्या मनात जे होते ती आशा आता धूसर होते आहे म्हणजे आपले अतिशय लाडके लोकप्रिय नेते देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकवार आपण सारेच मुख्यमंत्री होण्याचे करण्याचे जे स्वप्न बघत होतो ते आता केवळ स्वप्न राहणार असे दिसते मला माहिती मिळाली त्याप्रमाणे तसेच वाटते कि थेट नरेंद्र मोदी यांना राज्यापेक्षा देवेंद्र यांनी यापुढे देशाचे नेतृत्व तेही पाहल्या फळीचे नेतृत्व त्यांनी करावे असे आता त्यांना वारंवार वाटत असल्याने उद्याचे या देशाचे खूप खूप मोठे नेते देवेंद्र फडणवीस असेच आपल्याला बघायला मिळणार आहे…

शरद पवार आणि त्यांची राष्ट्रवादी महाआघाडीतून या राज्यात बाहेर पडेल आणि ते व भाजपा उरलेली पंचवार्षिक योजना एकत्र असतील अशी माझी माहिती आहे आणि जे शरद पवारांना येथे नको आहे व वर केंद्रात नरेंद्र मोदी यांना हवे आहे ते तसे येथे घडेल म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना वर दिल्लीत बोलावून घेतले जाईल आणि दिल्लीत महाराष्ट्रातले जे केंद्रीय मंत्री आहेत त्यांच्यापैकी एक येथे मुख्यमंत्री म्हणून येतील काम बघतील पण तशी हवा जरी असली तरी सबकी मधुबाला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर येथे येतील आणि मुख्यमंत्री होतील असे अजिबात वाटत नाही खरी स्पर्धा हि नितीन गडकरी आणि पियुष गोयल या दोघात असेल त्यात आतुर व चतुर पियुष गोयल यांना तुम्ही मुख्यमंत्री करावे असा मोदी यांचा पवारांकडे हट्ट व आग्रह असेल पण मला वाटते शरद पवार आणि नितीन गडकरी यांचे आपापसातले ट्युनिंग व मैत्री किंवा याराना व दोस्ताना बघता, पवार सांगतील म्हणतील कि मला येथे माझे आवडते गडकरी हेच मुख्यमंत्री म्हणून हवेत. वास्तविक हे राज्याचे मोठे दुर्दैव आहे कि पवारांना नेमके देवेंद्र फडणवीस कधी समजलेच नाही त्या दोघांमध्ये जर सुमधुर संबंध राहिले असते तर त्याचा मोठा फायदा राज्याला व राष्ट्राला देखील झाला असता पण हा आपल्या राज्याचा आपल्या नंतर कायमस्वरूपी शरद पवार होऊ शकतो नेमके हेच पवारांना सुरुवातीपासून देवेंद्र बाबतीत खटकत असल्याने त्यांनी कायम फडणवीसांविषयी मनात राग ठेवला त्यांचा सतत द्वेष केला त्याचवेळी राज्याचे भले गडकरी यांच्यात करण्याची मोठी क्षमता आहे हे पवारांना माहित आहे पण त्याचवेळी त्यांना हेही माहित आहे कि गडकरी यांना तब्बेतीच्या व वाढत्या वयाच्या मोठ्या समस्या असल्याने त्यांना पुढे मोठ्या मर्यादा आहेत त्यातून ते माझी जागा या राज्यात घेणे अशक्य आहे म्हणून पवारांना फक्त गडकरी हवे आहेत किंवा त्यांना प्रकाश जावडेकर नावाचे कच्चे लिंबू किंवा पियुष गोयल नावाचे कडुलिंब चालणारे आहे पण त्यांचा आग्रह नक्की फक्त आणि फक्त नितीन गडकरी यांच्यासाठी आहे, असेल, दोघांचेही एकमेकांवर प्रेम आहे  त्यांच्या प्रेमाचे राजकीय लफडे आहे. आज सकाळीच मला विचित्र स्वप्न पडले आहे म्हणजे नरेंद्र मोदी घोडीवर बसलेले आहेत त्याचवेळी देवेंद्र फडणवीस नववधूच्या पेहरावात घुंघट घेऊन बसले आहेत आणि मी मात्र पुंगी वाजवून गाणे म्हंणतो आहे, मेरी प्यारी बहेनीया बनेगी दुल्हनीया…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Comments 1

  1. ३महिन्यांपूर्वी हाच माणूस सांगत होता की भाजप व शिवसेना परत एकत्र येताहेत व फडणवीस परत मुख्यमंत्री होणार.

    http://vikrantjoshi.com/index.php/2020/10/03/blog-post-4/

    आता सांगतोय की भाजप व राष्ट्रवादी एकत्र येताहेत व गडकरी मुख्यमंत्री होणार.

    अजून ३ महिन्यांनी हाच माणूस सांगेल की भाजप व कॉंग्रेस एकत्र येताहेत व अशोक चव्हाण मुख्यमंत्री होणार.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *