भय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी

भय्यू महाराजांचे लग्न : पत्रकार हेमंत जोशी 

बरेच दिवसानंतर मी काल पोट धरधरून हसलो, मीच काय जे त्याला जवळून बघत आले आहेत हे वाचल्यानंतर त्यांनाही खूप खूप हसायला 

आले असेल कारण कि, काल सामना दैनिकातून अभिनेता रमेश भाटकरला विचारले, तुमचे आवडते पेय कोणते, त्यावर या पठ्याने चक्क उत्तर दिले, माझे आवडते पेय लिंबू सरबत आणि लस्सी आहे…

हे म्हणजे असे झाले कि पतंगरावांनी सांगावे, मला विद्यार्थ्यांची सेवा करायला आवडते किंवा तटकरेंनी म्हणावे मला पैसे नाही आंबे खायला आवडतात, ज्याला जे वाटते तो तसा बरळतो नाही का, आणि सामान्य माणसाला ते खरेही वाटते….ज्याला जे मनात येईल तो ते करतो, बरळतो, बोलतो, कृती करून मोकळा होतो, जसा भाटकर बरळला तेच इंदोरस्थित भय्यू महाराजांचेही झाले, दीड दोन महिन्यांपूर्वीच ते डॉ. आयुषी यांच्याशी ते लग्न करून मोकळे झाले आणि आता त्यांचेच लोक सांगताहेत कि महाराज ३० एप्रिल रोजी लग्न करताहेत म्हणून….

या लग्नाच्या निमित्ताने मनाला वाटले कि या बुवाच्या व्यापाला आणि तापाला कंटाळून त्या माधवी वहिनी तर गेल्या आता त्या कुहूचे कसे व्हायचे, वयात येणाऱ्या या गोड मुलीला सांभाळायला माधवीवहिनी नाहीत म्हटल्यावर भय्यू महाराजांच्या घरातल्या अन्य स्त्रियांनी कुहूची काळजी घ्यायचे सोडून त्यांची आई आणि बहिणी, वृद्धत्वाकडे झुकलेल्या बुवाच्या लग्नाची काळजी करताहेत, हसावे कि रडावे, एवढे करून डॉ. आयुषी किमान या बुवासंगे सुखी झाल्यात तरी देव पावला असे म्हणता येईल कारण विविध चवी चाखण्याची आवड असलेल्या बुवाच्या या नव्या सहचारिणीचा किमान माधवी वहिनी होऊ नये असे मनापासून जे जे भय्यू महाराजांना जवळून ओळखतात, त्या सर्वांना हेच मनातल्या मनात वाटते आहे, मी फक्त उघड बोललो, एवढाच काय तो फरक. अलीकडे या देशमुखांना काय झाले काही कळत नाही, काही दिवसांपूर्वी उस्मानाबाद नाट्य संमेलन पार पडले, सोलापुरातले सत्तेतले देशमुख शेतकऱ्यांची, दुष्काळाची काळजी सोडून दोन दिवस धडकले कि उस्मानाबादेत आणि तेथे त्यांनी एका यारीदोस्ती निभावणाऱ्या अभिनेत्रींचे शब्द ज्या पद्धतीने झेलले, ते बघून या वृद्ध देशमुखांबद्दल हसावे कि रडावे असे तेथे जमलेल्या तमाम मराठी तारे आणि तारकांना झाले होते. बिना सहकार नाही उद्धार पद्धतीने या नेत्याची तरुण स्त्रियांच्या बाबतीत वागण्याची पद्धत असावी, आणि हे तपासून बघण्याची नक्कीच आमच्यावर वेळ आली आहे….भेटणाऱ्या सामान्य माणसांशी खडूस थोबाड करून बोलायचे, उध्दट बोलायचे आणि गावजेवण देणारी एखादी सिनेमावाले जरी पुढ्यात आली तरी तिला पायघड्या टाकायच्या, छान संस्कार देताहेत हे सोलापुरी भाजपावाले….

भय्यू महाराजांचे हे लीगल लग्न, त्यांच्या उरल्यासुरल्या भक्तांनाही डिस्टरब करून गेले, मनातून अस्वस्थ झालेत ते सारे हे बघून आणि ऐकून. आपला देव सतत हे असे थेरं करतोय बघून आता उरलेसुरलेही भय्यूमहाराजांपासून दूर जातील असे वाटू लागलेले आहे, पुराणातल्या कृष्णाच्या लीला ऐकायला बऱ्या वाटतात पण घरात चुलीपर्यंत ज्यांना प्रवेश दिल्या जातो किंवा जायचा, त्या भय्यू महाराजांकडे यापुढे आपल्या घरातल्या तरण्या स्त्रियांना पाठवतांना नक्कीच त्याचे खेड्यापाड्यातले जुन्या वळणाचे आणि संस्काराचे भक्त किमान शंभरवेळा बिचार करतील…..भय्यूमहाराजांचा विदर्भातल्या अकोल्याचा एक भक्त विजय देशमुख उगवेकर पाठवलेल्या, प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हणतो, लिहितो, आणखी एक लग्न करून तुम्ही कळसच गाठला आहे. तुम्ही समाजाचे पालक आहात, मग तुमची आई आणि बहिणी पोरक्या का आणि कशाला होतील, पोरकी झाली ती तुमची मुलगी, तुमची कुहू, जिचे तुम्ही बसता उठता तोंड भरून कौतुक करीत होता. आमचा तुमच्यावर विश्वास होता पण तुम्ही आम्हालाच पोरके केले. देशमुख म्हणतात तेच सत्य आहे, भक्तांना दिसायचे, भय्यू महाराजांचे नेमके चंचल वागणे पण त्यांना समाजाने देव मानल्याने सारे सहन केल्या जायचे, उरली सुरली प्रतिष्ठा जर यापुढे महाराजांना टिकवायची असेल, निदान यापुढे तरी त्यांनी डॉ आयुषी यांचा दिवंगत माधवी वहिनी होऊ देता कामा नये, अर्थात डॉ. आयुषी यांनी गाफील राहून संसार करता कामा नये अस त्यांना या लिखाणातून सुचवावेसे वाटते….

क्रमश:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *