कवी आणि कवयत्री : पत्रकार हेमंत जोशी

कवी आणि कवयत्री : पत्रकार हेमंत जोशी 

पूर्वीच्या काळी प्रत्येकाला किमान ५-६ मुले असायचे कारण पूर्वी विशेषतः पुरुष घरी अधिक रमायचे बाहेर कमी पडायचे आणि स्त्रियाही धडधाकट असायच्या, पाच सहा बाळंतपणे त्या अगदी सहज सहन करायच्या. पूर्वीसारखे पुन्हा एकदा घडले आहे म्हणजे पुरुष घरात आहेत आणि त्यांच्या बायकाही. शिवाय सोशल मीडिया सहज उपलब्ध असल्याने बाहेरच्या भानगडी करतांना अगदी उधाण आलेले आहे त्यामुळे उद्या जर तुमच्या कानावर आले कि विजय दर्डा यांनी वयाच्या ७५ व्या वर्षी मिस बँकॉकशी लग्न केले किंवा हेमंत जोशी एका देखण्या मुलीच्या प्रेमात पडले किंवा धनंजय मुंडे पुण्यात नको ते करून बसले किंवा जयंत पाटलांना वयाच्या ६०व्या वर्षी अपत्य झाले किंवा यावेळी अजितदादांच्या चक्क राजस्थानची रूपवती राणी प्रेमात पडली किंवा उदय तानपाठक यांनी त्यांच्या शेजारच्या गोखले काकूंना पळवून नेले किंवा प्रमोद हिंदुराव त्यांच्यापेक्षा एका दुप्पट उंचीच्या मुलीच्या प्रेमात पडले किंवा नितीन राऊत यांना पुन्हा एकवार त्यांच्या बायकोने रंगेहात पकडले किंवा विश्वास पाठक यांच्या घरी पुन्हा चिमुकला नवा पाहुणा येणार किंवा उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकवार आपल्याच बायकांच्या प्रेमात पडले किंवा उदय सामंत यांच्या घरात नव्याने वादळ असे या दिवसात काहीही तुमच्या कानावर पडू शकते. बैठें बैठें क्या करें करना है कुछ काम, असे ज्याचे त्याचे झाले आहे…

एका वेगळ्या विषयाला मला या लेखापासून सुरुवात करायची आहे आणि हा विषय लिखाणाशी संबधित आहे. माझ्या विविध फेसबूकसवर जवळपास १५ हजार फ्रेंड्स आहेत ते विविध क्षेत्रातले बऱ्यापैकी मान्यवर आहेत त्यापैकी जवळपास १००० स्त्री पुरुष तरुण तरुणी कवी आणि कवयत्री आहेत नेमका हाच विषय मला नेमका याठिकाणी छेडायचा आहे. विशेष म्हणजे काव्य रचण्यात करण्यात स्त्रियांचा मोठा अधिक व्यापक असा वाटा आहे. माझ्या या फेसबुक्स वरील परिवारात दोन मैत्रिणी  अशा आहेत कि ज्या त्यांच्याकडे असलेल्या शब्द भांडाराच्या भरवशावर स्वतःचा त्या बर्यापैकीं आर्थिक डोलारा सांभाळून आहेत, त्या विविध विषयांवर इंग्रजी आणि मराठी भाषेत एकाचवेळी अगदी तरुण वयात भाषांवर प्रभुत्व ठेऊन कन्टेन्ट रायटिंग करतात आणि त्यांना त्यात चांगले पैसे मिळतात. अत्यंत महत्वाचे म्हणजे ज्या स्त्रिया तरुणी कविता रचतात त्यांच्याकडे असलेला शब्दांचा साठा पुरुष कवींपेक्षा अतिशय समृद्ध असूनही किंवा या दोघींपेक्षा शब्दसाठा अधिक श्रीमंत असूनही बहुतेक कवी किंवा कवयित्रींच्या कविता हा त्यांना ओळखणार्यामध्ये थट्टेचा विषय असतो ठरतो. मला वाटते दर  दिवशी या राज्यात जे असंख्य कवी किंवा कवयत्री जन्माला येतात त्यांच्यापैकी त्यातल्या फारतर एक टक्का मंडळींना प्रवीण दवणे किंवा शांता शेळके होता येते. बहुतेकांच्या कविता केवळ त्यांना स्वतःच वाचण्यासाठी असतात. येथे मला कोणालाही कमी लेखायचे नाही वस्तुस्थिती तेवढी पटवून द्यायची आहे…

कवी आणि कवयत्री यांचे त्यांच्या आयुष्याच्या अखेरपर्यंत कस्तुरी मृगासारखे होते म्हणजे त्यांना आपल्याकडे असलेल्या समृद्ध शब्द कस्तुरीचा गंध अखेरपर्यंत कळत नाही आणि शेवटी त्यांच्या कविता या त्यांच्या जणू प्रेताबरोबर जळून खाक होतात, त्यांच्या मागे घरातल्यांना देखील त्यांच्या काव्याची कवितांची आठवण राहत नाही, आठवण होत नाही. एक नक्की आहे कि काव्य हा प्रकार नक्की इतिहासजमा होता कामा नये पण आपल्या कवितांना फारशी ओळख प्रसिद्धी नाही समाजमान्यतानाही हे एकदा का नवोदितांच्या लक्षात आले कि त्यांनी कविता करण्यात रचण्यात उगाच वेळ न घालवता जर विविध प्रोफेशनल विषयांवर स्वतःकडे असलेल्या श्रीमंत शब्दांच्या भरवशावर लिखाणकेले तर पैसे तर मिळतील पण नावही होईल, समाधान अधिक मिळेल. काही काम नाही, रिकामटेकडा वेळ अधिक आहे म्हणून उचलले शब्द आणि केल्या कविता असेच  काव्य करणाऱ्या बहुतेकांच्या बाबतीत घडते आणि अशा शिघ्र कविता करणाऱ्यांना मग भीक नको पण कुत्रे आवर हि अशी वागणूक समाजात अनेकदा मिळते. गद्य नव्हे पद्य अधिक महत्वाचे, प्रोफेशनल कन्टेन्ट रायटिंग खरे महत्वाचे हे जर विशेषतः तरुणींच्या स्त्रियांच्या लक्षात आले तर मला वाटते त्या प्रसंगी त्यांच्या नवर्यापेक्षा अधिक पैसे कमावून मोकळ्या होतील आणि अशा लिखाणाची चर्चा पण रंगेल. कोणालाही कमी लेखणे माझ्या मनातही नाही…

क्रमश: हेमंत जोशी. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *