कडू आणि कटू सत्य: पत्रकार हेमंत जोशी

विदर्भ अचलपूर मतदारसंघातल्या वसुधाताई देशमुख २००५ दरम्यान लागलेल्या विधान सभा निवडणुकांआधी या राज्याच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या राज्यमंत्री होत्या. त्यांचे अचलपूर मतदार संघात चांगले काम होते, त्या विधानसभा निवडणुकीत पराजित होतील असे मतदारांना अजिबात वाटत नव्हते पण एक दिवस निवडणुकीपूर्वी मला त्या म्हणाल्या, यावेळेची निवडणूक मला खूप काम करूनही कठीण जाईल असे वाटते कारण आमच्या भागात बच्चू कडू याची एखाद्या 

फिल्मी हिरोसारखी लोकप्रियता आहे, त्याचा धाडसी स्वभाव या मतदार संघात आकर्षणाचा विषय ठरला आहे, नेमके घडलेही तेच, प्रचंड काम करूनही वसुधाताई त्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाल्या आणि बच्चू कडू केवळ तरुण मतदारांच्या भरवशावर निवडून आले, आमदार झाले.धाडस नेमके कोठे आणि कसे वापरावे याचे देखील एक तंत्र असते आणि ते तंत्र अत्यंत संयमाने वापरावे लागते, जेव्हा केव्हा आम्ही त्या मंत्रालय किंवा शासकीय कार्यालयात जातो, तेथले वातावरण बघून मनस्वी राग, संताप येतो, खरेच मनाला वाटते, कानाखाली आवाज काढावा पण अमुक एखाद्याशी वाद घालणे किंवा खडसावून बोलणे वेगळे आणि शिव्या देणे किंवा मारहाण करणे अगदी वेगळे, कायदा हाती घेणे केव्हाही अयोग्य, जो अलीकडे कडू यांनी हाती घेतला, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव भाऊराव गावित यांना मारहाण केली. विशेष म्हणजे गावित हे मुख्यमंत्री कार्यालयातच बसतात, जर तेथेच अधिकारी असुरक्षित असेल तर इतर ठिकाणी वातावरण केवढे दहशतीचे असेल?आमदार बच्चू कडू यांनी गावित यांना मारहाण करून मोठी चूक केली कारण गावित यांना मी अतिशय जवळून ओळखतो, वास्तवात गावित हे तसे अतिशय शांत स्वभावाचे पण तेवढेच कणखर अधिकारी, व्यक्तिमत्व. ते जेव्हा शांतपणे उत्तर देतात तेव्हा त्यांच्या देहबोलीवरून उगाचच वाटते, ते उद्धट उत्तरे देत आहेत, पण तसे अजिबात नसते, भेटणाऱ्या प्रत्येक अगतिक असतो, कारण गावित यांचे टेबल हे असेच महत्वाचे आहे, सहज शक्य असेल तर गावित नक्कीच 

अमुक एखाद्याला सहकार्य करतात पण अगदीच नियमबाह्य असेल तर समोरचा कितीही मोठा असला तरी ते आपल्या भूमिकेवर ठाम असतात, म्हणून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील अगदी मनापासून आवडतात…मी गावित यांना अगदी जवळून यासाठी ओळखतो कि गेली दहा वर्षे एका मिशनवर आम्ही सारे जणू एकत्र लढत होतो म्हणजे गावित, मी, माझ्यासारखे आणखी एक दोन RTI ACTIVIST आणि मुख्यमंत्री आणि ते मिशन होते, वर्षनुवर्षे विविध मंत्र्यांकडे ठाण मांडून बसलेल्या स्टाफची हकालपट्टी करणे, त्याना त्यांच्या नेमक्या खात्यात पाठवून देणे, आणि हे अतिशय कठीण असे काम जर भाऊराव गावित यांच्यासारखा खंबीर, धाडसी, जिगरबाज, आमिषांना बळी न पडणारा अधिकारी नसता तर कधीच शक्य झाले नसते त्यामुळे गावित यांना कडू यांच्याकडून मारहाण झाल्यानंतर हाकलल्या गेलेले आजी माजी मंत्र्यांचे स्वीय सहाय्यक, खाजगी सचिव, विशेष कार्यकारी अधिकारी आणि इतर स्टाफ मनापासून खुश झाला असेल, त्यांनी पेढे वाटले असतील….आजी माजी मंत्र्यांकडे काम करणारा कोट्याधीश झालेला स्टाफ काढणे तसे अतिशय कठीण असे काम होते, ते कोणालाही दाद देत नसत, हे शक्य झाले कारण देवेंद्र फडणवीस यांनी गावित यांच्या मागे कणखरपणे उभे राहून त्यांना हिम्मत दिली, तोलामोलाची साथ दिली…..अर्थात एवढे कठीण असे काम करूनही विविध छुप्या मार्गाने काढल्या गेलेले अनेक आजही पुन्हा विविध मंत्र्यांकडे घुसलेले आहेत, त्यातल्या अनेकांना ना जनाची, ना मनाची, केवळ पैसा खोर्याने ओढणे, हेच त्यांचे वैशिष्ट्य आहे. एकदा तर गावित यांना रांडदिवे का रणदिवे आडनावाच्या विविध आमदार, मंत्र्यांकडे अगदी उघड दलाली करणाऱ्या पिएने सरळ सरळ तब्बल एक कोटी रुपयांची लालूच दाखविली होती, अर्थात जो पिए दररोज विविध शासकीय अधिकार्यांना न चुकता लेडीज बार मध्ये नेतो, पंचवीस तीस हजार रुपये त्यांच्यावर उधळतो, त्याला आपले पद टिकविण्यासाठी एक कोटी रुपये म्हणजे वेटरला टीप देण्यासारखे होते पण गावित कधीही कुठल्याही अमिषाला बळी पडले नाहीत म्हणून मुख्यमंत्री विविध आजी माजी मंत्र्यांकडील माजोरड्या,भ्रष्ट, व्यसनी शासकीय कर्मचार्यांना, अधिकार्यांना त्यांच्या ओरिजनल खात्यात पाठविण्यात यशस्वी ठरले, हि मेहनत आणि हे यश नक्कीच गावित यांचे. एकदा तुम्ही गावित यांना भेटून विचारा, आपले मंत्र्यांकडे असलेले स्थान टिकविण्यासाठी त्यांना कोणी कोणी आणि किती देऊ केले होते, ऐकून तुम्ही तोंडाचा आ वासाल, आश्चर्याने तोंडात बोटे घालाल….एका सच्च्या आणि लढवू, धाडसी अधिकार्याला जर त्याच्या प्रामाणिक कामाची हि अशी मारखावू पावती मिळणार असेल तर मला नाही वाटत, गावित यापुढे फार काळ त्या आव्हान देणाऱ्या पदावर काम करतील, ते बदली करवून घेतील आणि शांत जीवन जगतील. बच्चू कडू अमुक एखाद्या प्रामाणिक सरकारी कर्मचार्यासाठी गावित यांच्याकडे गेले असते तर कदाचित कडू यांना लोकांची सहानुभूती मिळाली असती पण ज्या अशोक जाधव यांच्या स्वत:च्या मालकीच्या सदनिका मुंबई शहरात आहेत, त्या सदनिका भाड्याने देऊन जाधव जेव्हा शासकीय वसाहतीत राहण्याचा चुकीचा आग्रह धरतात, अशावेळी कडू यांनी गावित यांच्या नव्हे तर जाधव यांच्या थोबाडात ठेवून द्यायला हवी होती. अत्यंत महत्वाचे म्हणजे जाधव यांचा दुरान्वयेहि कडू यांच्या अचलपूर मतदार संघाशी संबंध नसतांना त्यांना जाधव यांच्यावर एवढे प्रेम का उतू यावे, मनात संशय निर्माण होतो. मला हे कळतनाही अनेक आमदार आपला मतदार संघ सोडून इतर दुरदुरच्या मतदार संघातल्या लोकांची कामे मंत्री किंवा मुख्यमंत्र्यांकडे का घेऊन जातात, मंत्री आणि मुख्यमंत्री जे काय समजायचे समजतात आणि कुत्सित हसून अशी कामे इच्छा नसतांना देखील करून देतात, त्यावर अपवाद फडणवीस किंवा दिवाकर रावते यांच्यासारखे, मतदार संघ सोडून घेऊन आलेले काम बघताच मुख्यमंत्री, परिवहन मंत्री किंवा अगदीच एक दोन मंत्री असे काही त्या आमदाराला धारेवर धरतात कि विचारू नका, त्यावर आमदार 

बोंडे तुम्हाला मनातले सांगतील…..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *