संघाचे आर्थिक गणित : पत्रकार हेमंत जोशी

संघाचे आर्थिक गणित : पत्रकार हेमंत जोशी 

रा. स्व. संघ आणि पैसा याविषयी संघाबाहेरच्या मंडळींना मोठे कुतूहल असते, अनेक शंका कुशंका त्यांच्या मनात असतात त्यातून मग संघाबाहेरचे त्यावर टीकाटिप्पणी करतात ज्यात अजिबात अर्थ नसतो. अनेकांनी त्यांच्या पक्षात संघपद्धती रुजविण्याचा प्रयत्न केला म्हणजे दिवंगत कांशीराम यांनी अमुक एखाद्या राज्यात पक्षाचे प्राबल्य असले नसले तरी संघस्वयंसेवकांसारखी कार्यकर्त्यांची देशात जेथे तेथे फळी उभी केली, संघाचे तसेच असते ते सत्ता तेथे स्वयंसेवक असे न करता जगात पद्धतशीर स्वयंसेवकांची फळी उभी करतात, क्षणिक फायद्यासाठी असे त्यांचे काहीच नसते…


नागपूरच्या एका सिनियर संघ स्वयंसेवकाने, ज्यांना संघ पाठ आहे त्यांना मला जे लिहून पाठवले ते वाचल्यानंतर संघाचे आर्थिक राजकारण तुमच्या सहज लक्षात येईल, भगव्या ध्वजाला संघात गुरुचे स्थान आहे त्या पवित्र ध्वजासमोर गुरुपौर्णिमेला दरवर्षी गुप्त पद्धतीने प्रत्येक स्वयंसेवक त्याला जशी झेपेल तशी रक्कम, दक्षिणा म्हणून ठेवतो. स्वतः वर्षभर काटकसरीने जगतो आणि हिंदुराष्ट्रासाठी हा स्वयंसेवक ध्वजासमोर जेवढे शक्य ते ठेवून मोकळा होतो ज्याचा त्याला अभिमान असतो, त्याच्या परिवाराला त्याचे अजिबात दुःख नसते, वाईटही वाटत नसते…


मित्र असलेला संघ स्वयंसेवक म्हणतो, ‘ गुरु दक्षिणेतील समर्पण अन्यत्र वळविले जात नाही. त्याचा अन्यत्र अजिबात विनियोग होत नाही, केल्या जात नाही. जमा झालेली दक्षिणा प्रत्यक्ष संघकार्यात व संघप्रचारकांच्या व्यवस्थेत, प्रवास आदी साठी वापरली जाते. गुरुदक्षिणा एका ठिकाणी कधीही येत नसे व येत नाही. विभागश: एकत्र होते व व्यय होते. भाजपा मध्ये संघाने ४३ प्रचारक दिलेले आहेत. त्यांचा वैयक्तिक व्यय संघ पाहतो मात्र संघटनात्मक खर्च भाजपा करतो. संघाच्या सर्वच पारिवारिक संघटना आपापल्या पद्धतीने आर्थिक स्रोत उभा करतात. संघटन अगदी नव्याने उभे राहत असेल तर संघ मदतीचा हात पुढे करतो एवढाच अपवाद. हेडगेवार स्मारकसमितीचे भवन पुनर्निर्माण विदर्भातील स्वयंसेवकांनी स्वबळावर केले. मी सुद्धा एक लक्ष रुपयांचा खारीचा वाटा उचलला. असल्या कामात गुरुदक्षिणा उपयोगी आणली जात नाही. प्रसिद्धी नाही, केवळ वैयक्तिक संदर्भासाठी लिहिले आहे. गुरुदक्षिणा हा डेलिकेट विषय आहे, संघ भाजपाला आर्थिक सहाय्य करतो असा समज अनेकांचा होतो म्हणून हे मुद्दाम लिहून पाठविले. ‘ त्या संघाशी संबंधित मित्राचे यांचे वर दिलेले संदर्भ बारकाईने वाचल्यास संघ आणि आर्थिक राजकारण, तुमच्या सहज ते लक्षात येईल, संघाविषयीचे काही अपसमज दूर होतील…


www.vikrantjoshi.com


केवळ महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास आज या राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी दोघांनाही आर्थिक चणचण मोठ्या प्रमाणावर भेडसावते आहे. या पक्षात आर आर पाटील किंवा अनंत गाडगीळ यांच्यासारखे जेमतेम अपवाद सोडल्यास इतर सर्व 

नेत्यांनी सत्तेचा सऱ्हास दुरुपयोग करून, सत्तेचा स्वतःसाठी वापर करून स्वतःच्या कुटुंबासाठी फार मोठे आर्थिक स्रोत उभे केले, पुढे जाऊन अतिशय महत्वाचे सांगतो, जात व नात्यांचा गैरवापर करून या दोन्ही पक्षाशी संबंधित शासकीय कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी देखील न मोजता येणारे कमविले पण आज जेव्हा काँग्रेस आणि राष्टवादीला प्रचार व प्रसार करण्यासाठी आर्थिक मोठी गरज आहे, कोणीही खिशातले काढून द्यायला तयार नाहीत वरून त्यातले बहुतेक काँग्रेस व राष्ट्रवादीला वापरून आणि आता पक्षांतर करून मोकळे झाले आहेत…


आजपर्यंत मी शरद पवार आणि जळगावच्या सुरेशदादा जैन दोघांनाही लिखाणातून नेमके जे सांगत आलो आहे ते सर्वांनीच आपापल्या परीने ध्यानात ठेवावे. जे पेरले तेच उगवते. पवारांनी काँग्रेसला आणि सुरेशदादा यांनी त्यावेळेच्या म्हणजे ९० च्या दशकात जळगाव जिल्ह्यातील प्रतिस्पर्धी मधुकरराव चौधरी किंवा प्रतिभाताई पाटील इत्यादींना शह देण्यासाठी, नेता म्हणून स्वतःला स्थापित करण्यासाठी स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या नेत्यांना मोठी ताकद देऊन त्यांची देशसेवेसाठी अजिबात लायकी नसतांना त्यांना उंचीवर नेऊन ठेवले. आज अशी परिस्थिती आहे, ज्यांना ज्यांना पवार यांनी महाराष्ट्रात किंवा जैन यांनी जळगाव जिल्ह्यात मोठे केले एकतर ते यांनाच सोडून गेले किंवा यांच्या छातड्यावर बसून त्यांच्यावरच प्रहार करु लागले आहेत. याच मार्गावर भाजपा गेली तर त्यांचाही एक दिवस जैन किंवा पवार होईल यात तिळमात्र शंका वाटत नाही म्हणून माणसे मोठी करतांना सावध असावे लागते, स्वतःची काँग्रेस किंवा राष्ट्रवादी करवून घेऊ नये…


तूर्त एवढेच : हेमंत जोशी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *