मुक्काम पोस्ट नागपूर २ : पत्रकार हेमंत जोशी

मुक्काम पोस्ट नागपूर २ : पत्रकार हेमंत जोशी 

काही अधिकारी किंवा प्रशासकीय अधिकारीही सर्वसामान्य लोकांमध्ये अतिशय लोकप्रिय असतात, एखाद्या फिल्मी हिरो भोवती जमावी तशी त्यांच्या सभोवताली गर्दी जमते, जमलेली असते अर्थात केलेल्या कामांच्या गुणवत्तेतून ते लोकप्रिय ठरलेले असतात. अलीकडे नागपूर अधिवेशन सुरु असतांना मी रेडिसन हॉटेलातल्या कॉफी शॉप मध्ये बसलेलो असतांना तेवढ्यात मला लॉबी मध्ये प्रशासकीय अधिकारी भूषण गगराणी यांच्या सभोवताली गर्दी जमलेली आहे आणि तेही सर्वांशी हस्तालोंदन करीत करीत पुढे जात असल्याचे दिसले, छान वाटले, एखाद्या प्रशासकीय अधिकार्याभोवताली देखील गर्दी जमते बघून, न राहवून मी त्यांना बाजूला नेऊन विचारले देखील का माणसे अशी कशी सभोवताली जमलेत ते, त्यावर गगराणी म्हणालेत, हे असे अनेकदा घडते, चार शब्द चांगले बोलतो, लोकांना बरे वाटते, पुढे ते म्हणाले मी सरकारी कामांच्या निमित्ते अनेकदा राज्यभरात फिरत असतो, स्थानीक नेते मुद्दाम भेटायला येतात, चार दोन गप्पा मारतात आणि आल्या पावली निघूनही जातात, त्यांचे माझ्याकडे कुठलेही काम नसते, त्यांना असतो, वाटतो केवळ एक जिव्हाळा. मनातल्या मनात स्वतःशी म्हटले, असे सामान्यांना सहज उपलब्ध होऊ बघणारे अधिकारी, वास्तवात मुख्यमंत्री कार्यालयाची गरज आहे, परदेशी साहेबांसंगे गगराणी साहेब, कॉम्बिनेशन छान जमून येईल, पण नको, मी जे नाव सुचवतो, ते नेहमी बाजूला पडते, पुरावाच हवा असेल तर पत्रकार अनिकेत जोशी हे त्यावर उदाहरण देता येईल म्हणजे मंत्रालय पत्रकार संघाच्या निवडणुकीत अनिकेत जोशी उभा असला कि त्याचा मला प्रचार करायला सांगतात, मी तो मनापासून करतो आणि अनिकेत जोशी ती निवडणूक हमखास घालवून बसतो. यावेळी तू अनिकेत जोशींचा प्रचार मनापासून करायलाच हवा, हे सांगण्यासाठी मला हमखास उदय तानपाठक या महान पत्रकाराचा फोन येतो आणि मी कामाला लागतो. अनिकेत जोशी यांना असे उगाचच वाटत असावे कि उदय त्यांच्या गटातला गोटातला खास माणूस आहे. कधी आहेत रे मित्रांनो, मंत्रालय पत्रकार संघाच्या निवडणुका…? 


दरवर्षी डिसेंबर महिन्यात नागपुरात होणारे हिवाळी अधिवेशन तसे अनेकांना धडकी भरणारे असते कारण अनेक राजकीय संदर्भ या अधिवेशनादरम्यान बदलतात, विरोधक लढवय्ये असलेत आणि तोडपण्या करणारे नसलेत कि सत्ताधाऱ्यांना या अधिवेशनादरम्यान हमखास हागवणीचा त्रास होतो, त्यांना हि सत्ता नकोशी वाटते, जसे संभोग संपल्यानंतर नवऱ्याला आणि प्रेताची चिरफाड केल्यानंतर ते करणाऱ्या माणसाला, पुरुषाला आता या बॉडीचे काय करायचे हा जो प्रश्न पडतो तेच या अधिवेशनात खुर्चीत बसलेल्यांचे होते म्हणजे आता या खुर्चीला कसे वाचवायचे किंवा या खुर्चीचे आता काय करायचे….पार अडलेल्या नागपूर अधिवेशनात देखील नेहमीप्रमाणे घडले, अनेक राजकीय संदर्भ आणि समीकरणे तेथे बदलले विशेष म्हणजे गुजराथ विधान सभा निवडणुकीत फार मोठे यश भाजपा ला न मिळाल्याने हे असे घडले आणि घडणार देखील होते, या निकालांचा मोठा परिणाम महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात होतो आहे, झाला आहे हे येथे हमखास सांगणे आवश्यक ठरते. गुजराथ विधानसभेत भाजपाला मिळालेले अत्यल्प यश आणि त्याचवेळी तुझ्या गळा माझ्या गळा म्हणत शरद पवार यांनी पुन्हा एकदा अगदी मनापासून काँग्रेसला आय लव्ह यु म्हणून त्यांना घट्ट मिठीत आणि पद्धतशीर मुठीत पकडून यवतमाळ ते नागपूर दरम्यान काढलेला मोर्चा, मित्रांनो, अनेक संदर्भ नजीकच्या काळात यातून बदलणार आहेत, बदलले आहेत…


शरद पवारांनी तिकडे नरेंद्र मोदी आणि इकडे या राज्यातल्या भाजपाला गेली तीन वर्षे पद्धतशीर झुलवून, खेळवून वेगळ्या पद्धतीने आपल्या पक्षाची मोट बांधली आहे, त्यामुळे होणारे राजकीय नुकसान केवळ भाजपाचे असेल, असे आजचे तरी चित्र आहे. एक मात्र नको ते घडले आहे शरद पवार पुन्हा एकदा डिमोट झाले आहेत, देशाचे हे नेते पुन्हा राज्यात येऊन अडकले आहेत, तसे ते आवश्यक देखील होते कारण नेमके फक्त वरचढ भुजबळांना तेवढे तुरुंगात धाडून इतरांना तुरुंगाबाहेर ठेवायचे, हे असले पवारांचे नेहमीचे डावपेच ते तेथे दिल्लीत, देशात अडकले असते तर येथे यशस्वी ठरले नसते. बघा ना तिकडे तुरुंगातून ना कधी भुजबळ शरद पवारांचा धावा करतांना आढळले ना येथे तुरुंगाबाहेर शरद पवार त्या भुजबळांच्या आठवणीने अश्रू ढाळतांना व्याकुळ होतांना दिसले….


राज्यातली भाजपा गुजराथ विधानसभा निकालानंतर झपाट्याने एकाकी झाल्याचे, एकटी पडल्याचे दिसते आहे काही ठिकाणी तर बालेकिल्ला असलेल्या विदर्भातही कारण याआधी काँग्रेसपासून मोठ्या प्रमाणावर दूर गेलेले मुस्लिम आणि बौद्ध, नवबौद्ध हे परंपरागत मतदार आणि शरद पवारांपासून दूर गेलेले या राज्यातले विशिष्ट टगे नेते पुन्हा या दोन्हीकडे म्हणजे अनुक्रमे काँग्रेस आणि राष्ट्रवादी कडे परतल्याने नक्कीच राज्यातल्या भाजपाला नजीकच्या काळात मोठ्या आव्हानाला सामोरे जावे लागेल, असे आजतरी नक्की वाटते. सत्व परीक्षा आता खऱ्या अर्थाने फडणवीसांची आहे. शिवसेना मतदारांच्या बाबतीत तोट्यात आहे असे आज तरी दिसत नाही पण काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत कारण त्यांना आपली ताकद वाढली आहे याची खात्री वाटते आहे आणि ते तसे त्यांना वाटणे स्वाभाविक आहे….

क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

www.offtherecordonline.com

www.vikrantjoshi.com 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *