मिलिंद नार्वेकर १ : पत्रकार हेमंत जोशी

मिलिंद नार्वेकर १ : पत्रकार हेमंत जोशी 

अगदी अलीकडे मला एका पत्रकार मित्राने एकंदर शिवसेना आणि बिलंदर मिलिंद नार्वेकर असा आशय आणि विषय घेऊन लिहिलेला एक लेख पाठविला आहे, तो मी येथे तुमच्यासाठी नक्की उपलब्ध करणार आहेच पण तत्पूर्वी मला जे वाटते ते तुम्हाला सांगून मोकळे व्हायचे आहे. अत्यंत महत्वाचे म्हणजे त्यात जे मिलिंद नार्वेकर यांना धो धो धुतलेले आहे ते त्या पत्रकाराच्या लेखणीतून उतरलेले विचार आहेत, ती नार्वेकर यांच्याविषयी माझी भूमिका नाही पण सदर लेख अनेकांच्या पसंतीला पडू शकतो म्हणून तो मी माझ्या अंकात छापण्याचा आगाऊपणा करणार आहे, एकच सांगतो मातोश्रीवर एखादा माणूस सहजासहजी मोठा होत नाही, फार पापड बेलावे, लाटावे लागतात…


शक्यतो मला आपल्या राज्याच्या तीन युवा नेत्यांना डिस्टरब करायचे नसते, असे नाही कि त्यांना घाबरतो पण इतर नेत्यांच्या तुलनेत त्यांनी घेतलेली भरारी लक्षणीय असल्याने आणि त्या तिघांचीही भूमिका मराठी लोकांचे भले साधण्याची असल्याने त्यांना मला टीकेचे लक्ष केवळ व्यक्तिगत तोट्या फायद्यासाठी करायचे नसते, ते तिघे कोण तुम्हालाही चांगले ठाऊक आहे, ते आहेत उद्धव, राज आणि देवेंद्र. 


कदाचित नजीकच्या काळात यात आणखी एकाची आश्चर्यकारकरित्या भर पडण्याची दाट शक्यता आहे आणि ते नाव आहे अजितदादा. होय, सत्तेतून अजितदादा बाहेर गेल्यानंतर खूप बदलले आहेत, केलेल्या चुका पुन्हा करायच्या नाहीत हे त्यांनी अगदी शपथ घेऊन ठरविलेले आहे आणि दादा खोट्या शपथा घेत नाहीत, भविष्यातले अजितदादा कसे चांगले असतील हे त्यांच्या अलिकडल्या बोलण्या वागण्यातून तुमच्याही लक्षात आलेले आहे कि ते बदलताहेत म्हणून. नकोशा वाटणार्या सुप्रिया सुळे ऐवजी हवेहवेसे वाटणारे अजितदादा पुन्हा एकदा कौतुकाचा विषय ठरणे भविष्यात केव्हाही चांगले…


आधीचे दादा म्हणजे अजितदादा, राजकीय आणि आर्थिक विचारांच्या बाबतीत भलतेच मॉड होते पण नजीकच्या भविष्यातले आणि आयुष्य उरलेले अजितदादा केवळ त्यांच्या पक्षातल्या अन्य नेत्यांचे नव्हे किंवा कार्यकर्त्यांचे नव्हे तर उभ्या महाराष्ट्रातल्या जनतेचे गॉड होऊन काम करतील, असे नक्की वाटायला लागले आहे त्यांच्यासमोर नजीकच्या काळात आजपर्यँत थोड्याफार प्रभावी धाडसी उत्साही वाटलेल्या ठरलेल्या त्यांच्या भगिनी सुप्रिया सुळे यापुढे मात्र संजीवकुमार समोर थेट भारत भूषण वाटतील किंवा मधुबाला समोर आजच्या थोराड चेहऱ्याच्या रोहिणी हट्टंगडी वाटतील, थोडक्यात नेमके जे अजितदादा जनतेला, काकांना, नेत्यांना, अधिकाऱ्यांना, समाजसेवकांना, पत्रकारांना अपेक्षित होते तेच अजितदादा यापुढे असतील आणि तुम्हाला तसे दिसतील याची मी तुम्हाला गॅरेंटी देतो, खात्रीने, विश्वासाने सांगतो अजितदादा यापुढे नक्की उद्धव राज देवेंद्र यांच्यासंगतीने माझ्या कौतुकभरे लिखाणातल्या पंक्तीला बसलेले असतील…


मुंबईतल्या भाजपामध्ये, भाजपामधल्या युवा नेत्यांमध्ये अलिकडल्या काळात एकमेकांमध्ये प्रचंड स्पर्धा निर्माण झालेली आहे. या युवा नेत्यांमध्ये मी मंत्री विनोद तावडे यांचा समावेश करतोय असे जेव्हा त्यांच्याच ओळखीच्या एका तारुण्य अस्ताला गेलेल्या कार्यकर्तीला सांगितले तेव्हा ती क्षणार्धात उसळून म्हणाली वाटल्यास त्यांना भाजपाचे नेते म्हणा पण भाजपाचे युवा नेते प्लिज प्लिज म्हणू नका आता त्यांच्यातल्या युवा ची अवस्था तुमच्या विदर्भातल्या पावसाळ्यासारखी झालेली आहे म्हणजे विदर्भात कसे सतत असे वाटत राहते कि मोठा पाऊस पडणार आहे पण वाट पाहून देखील पडत नाही, पिटुकल्या सरी पडतात आणि ढग मान खाली घालून निघून जातात, येथेही तेच म्हणजे तावडे केवळ नावाचे युवा, आचारात आणि थोडाफार विचारातही त्याच्यात पोक्तपणा आलाय…


गमतीचा भाग सोडा पण मुंबई भाजपा आता युवा नेत्यांना पूर्वीसारखी सोयीची राहिलेली नाही तेथे एकमेकांना तागडे स्पर्धक निर्माण झालेले आहेत आणि निर्माण झालेले स्पर्धक नजीकच्या काळात भाजपमधून बाहेर पडतील म्हणजे भाजपाला सोडचिठ्ठी देऊन अन्यत्र वळतील असे अजिबात वाटत नाही. पूर्वी कसे भाजपामधले युवा नेते कधीही एकमेकांचे स्पर्धक नव्हते ते एकमेकांचे चांगले मित्र होते आजही आहेत म्हणजे विनोद तावडे, आशिष शेलार, पराग आळवणी, अतुल भातखळकर (आशिक नव्हे आशिष शेलार, हो, त्यांना आशिकी करायला म्हणाल तर वेळ नाही किंवा म्हणाल तर बऱ्यापैकी ते बायकोला घाबरून असतात) इत्यादी बोटावर मोजण्याइतक्या या मंडळींना कोणीही स्पर्धक नव्हते पण अलीकडे त्यांच्यात राम कदम, मोहित कंबोज,प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, अमित साटम इत्यादींची अचानक भर पडल्याने मोनोपली असलेल्या तावडे शेलार यांच्यासारख्या युवा नेत्यांना नाही म्हणायला मनातून अस्वस्थ व्हायला झालेले आहे. आशिष शेलार यांना तर येत्या विधान सभा निवडणुकीत जसे सारे मुसलमान एकत्र येऊन पराभूत करण्याचा आटोकाट प्रयत्न करणार आहेत त्यात त्यांना शिवसेना अगदी उघड आणि भाजपामधले अनेक प्रभावी नेते आतून नक्की सहकार्य करतील मदत करतील अशी माझी पक्की माहिती आहे कारण आशिष शेलार सर्वांना मागे टाकत त्यांनी आपल्या विधान सभा क्षेत्रात आणि अख्य्या मुंबईत स्वतःचे नेते म्हणून आगळे वेगळे आणि दमदार नेते म्हणून स्थान निर्माण केलेले आहे. राज्यातल्या आणि थेट दिल्लीतल्या नेत्यांनी देखील शिवसेनेशी आणि मुंबईतल्या मुसलमानांशी अगदी उघड पंगा घेऊन प्रसंगी दंगा करून यश स्वतःकडे खेचून आणणारा नेता म्हणजे आशिष शेलार हे स्थान त्यांच्याही मनात निर्माण केलेले आहे. आशिष शेलार यांचे यश आणि त्यांचा उपक्रमी व पराक्रमी स्वभाव मुंबईकर नेत्यांच्या मग हे नेते विरोधी पक्षातले असतील आणि भाजपामधलेही, या सर्व स्पर्धकांच्या डोळ्यात खूप लागलेला आहे, त्या सर्वांना वाटते शेलार यांना यशाची नशा चढल्याने गर्व झालेला आहे पण वास्तव ते नाही, शेलार यांचा मूळ स्वभाव मस्ती आणि गमती जमती करीत पुढे पुढे जाण्याचा आहे, ते गर्विष्ठ झाले म्हणणे अगदी चुकीचे आहे. आणि ज्यांना वाटते आम्ही शेलार यांच्या आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवून आहोत कदाचित त्यांना हे माहित नाही कि आशिष यांच्या तिजोरीत या मंडळींच्या आर्थिक कुंडल्या इन डिटेल्स आहेत,आशिष शेलार म्हणजे शायना एन सी नव्हेत कि नाव पक्षाचे सांगायचे आणि जमा केलेला निधी आपल्या घराकडे वळवायचा. कदाचित शायना यांच्या या लबाड स्वभावातून तुम्ही बघितले असेल त्यांची चमकोगिरी वर्षभरापासून कुठे फारशी पनकलेली दिसत नाही, त्यांचाही मग नाना चुडासामा होईल म्हणजे उरलो केवळ मुंबईच्या हमरस्त्यावर लक्ष वेधून घेण्यासाठी होर्डिंग पुरता…

क्रमश:

पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *