व्यक्ती आणि वल्ली ३ : पत्रकार हेमंत जोशी

व्यक्ती आणि वल्ली ३ : पत्रकार हेमंत जोशी 

श्री श्री शरद पवार यांच्यातले मला सर्वाधिक काही आवडलेले असेल तर त्यांच्या नातेवाईकांची, प्रचंड मोठ्या संख्यने असलेल्या कुटुंब सदस्यांची एकी आणि पवारांचे जवळपास ५००-६०० संख्यने असलेले कुटुंब सदस्य मग ते जगात कुठेही वास्तव्याला असोत, हे सदस्य अमुक एखादा महत्वाचा निर्णय घेताना शेवटचा शब्द शरदरावांच्या असतो, ते म्हणतील तसे करायचे, त्यांचे सर्वांचे ठरलेले आहे. अलीकडे हे मी अर्थात लिहिलेलेही आहे. अनेकदा तर शरदरावांनाच विचारल्या जाते कि अमुक एका सदस्याने आता काय करायचे आहे मग शरदराव सांगतात, याने अमुक करायचे आहे, त्याने तमुक करायचे आहे पण शरदरावांच्या शब्दाला एवढा मान कि उद्या समजा शरदरावांनी सांगितले कि अमुक एखाद्याने केश कर्तनालय काढायचे आहे तर तो सदस्य दुसरे दिवसापासून तयारीला लागेल…

शरदरावांचे जे जे जवळचे नातेवाईक आहेत किंवा त्यांचे कुटुंब सदस्य आहेत ते जवळपास सारेच अतिशय सुखी आहेत कारण ते त्यांच्या घरातल्या या बुजुर्ग, अनुभवसंपन्न, दूरदृष्टी असलेल्या कप्तानाचे ऐकून मोकळे होतात, असेही नाही कि अमुक एखादा निर्णय एकतर्फी असतो, त्यातही हेल्दी डिस्कशन असते पण शेवटचाशब्द मात्र फक्त आणि फक्त शरदरावांच्या असतो, जो त्या सदस्याचे उर्वरित आयुष्य सुखमय करून जातो म्हणून जो तो आम्ही शारदरावांचे नातेवाईक आहोत, सांगण्यासाठी धडपडत असतो म्हणजे उद्या गिरीश बापटांनी देखील मी शरदरावांच्या मावसभाऊ आहे, सांगितले तर त्यात कोणालाहि आश्चर्य वाटणार नाही. असे त्या पुण्यात किंवा आसपासच्या परिसरात अनेक आहे कि जे सांगून मोकळे होतात कि आम्ही पवारांचे नातेवाईक आहोत किंवा मी शरद पवारांच्या वर्गात होतो, उद्या समजा प्रमोद हिंदुराव यांनी सांगितले कि मी आणि शरद पवार शाळेत असतांना एकाच बेंचवर बसत असू, कृपया हादरून जाण्याचे कारण नाही, यावरूनच तर मागे शरदराव केव्हातरी ते मुख्यमंत्री असतांना म्हणाले होते कि मला एकदा जाऊन बघायचे आहे कि माझ्या शाळेतला तो बेंच किती मोठा होता. काही माणसांची अंगकाठी त्यांचे वय कितीही वाढले तरी तशीच राहते त्या प्रमोद हिंदुराव यांच्यासारखी म्हणजे उद्या जर हिंदुराव म्हणाले कि मी आणि मराठीतली हेलन, अभिनेत्री मानसी नाईक एकाच शाळेत आणि एकाच वर्गात होतो तरीही त्यात फारसे आश्चर्य वाटणार नाही….

घ्या घरातली माणसे आभाळाला टेकतात, प्रचंड मोठी होतात त्या घरातली पुढली पिढी जर नालायक व्यसनी आणि त्या कर्तव्य पुरुषाचे ऐकणारी नसेल तर आकाशाला टेकलेल्या त्या कुटुंब प्रमुखाचे आणि त्या घराचे वसे फिरायला तदनंतर फारतर काही वर्षे लागतात, अशी घरे अशी कुटुंबे तदनंतर काही वर्षातच रस्त्यावर येतात, उघडा डोळे पहा नीट, तुमच्या ते अगदी सहज लक्षात येईल कि घरातल्या कटकटींमुळे, आपापसातल्या दररोजच्या भांडणांमुळे, त्या कर्तव्य पुरुषाचे न ऐकल्याने ते घर आणि तो पुरुष अस्ताला गेल्याचे….शून्यातून विश्व् निर्माण करणाऱ्या कुटुंब प्रमुखाच्या घरातले वातावरण जर खेळीमेळीचे आणि वयाचा विचार न करता एकमेकांचा आदर राखणारे नसेल तर अगदी शंभर टक्के अशा घराचे नजीकच्या काळात वाटोळे होते आणि वाटोळे झाल्यानंतर, कपाळावर हात मारून घेण्यात काहीही उपयोग नसतो. एकीचे बाळ हेच सर्वस्व असते हे नक्की आहे, पवारांचे यशस्वी घराणे हे त्यांच्यातल्या एकीचे यश आहे. आमच्याही घरात छोट्या मोठ्या कुरबुरी होतात पण सर्वांना सांगून ठेवले आहे जर तुम्ही बेताल वागायला सुरुवात केली, घरातले वातावरण बिघडविले तर मी मागला पुढला कोणताही विचार न करता हे घर सोडून मोकळा होईल, थोडक्यात, जर मी उद्या कोणालाही न सांगता आमचे घर सोडून अज्ञात स्थळी कायमचा निघून गेलो तर हे समजायला हरकत नाही कि मी लोकांना ज्ञान पाजळणारा, माझेच घर नीट सांभाळू शकलो नाही, अर्थात हे असे साऱ्याच कर्तव्य पुरुषांनी मनाशी ठरविले पाहिजे कि कुटुंब सदस्यांना तुम्ही आयुष्याचे बलिदान करून सर्वकाही उपलब्ध करून दिले असेल आणि ते जर माजल्यासारखे एकमेकांची डोकी फोडत असतील, एकमेकांच्या उरावर बसून एकमेकांचा जीव घेण्यापर्यंत त्यांची मजल जात असेल तर हेच भले त्या घरातल्या प्रमुख माणसाने उठावे आणि अज्ञात स्थळी निघून जावे सारी मोह माया तेथेच सोडून….

आपल्या राज्यातली जी घरे आभाळाला टेकलेली आहे, असतात क्षेत्र मग ते कोणतेही असो, त्या घरातली शांती टिकविणे अत्यंत गरजेचे असते हे येथे पुन्हा सांगतो. मुख्यमंत्री फडणवीस किंवा अन्य कोणीही, बाहेरच्या जगात हि माणसे यशस्वी होत असतांना समजा घरातले नातेवाईकच, कुटुंब सदस्य त्यांना साथ देणे बाजूला पण दररोज नवीन काहीतरी भानगडी करून मोकळे होणार असतील तर अशी मोठी माणसे फार लवकर खचून जातात, कोलमडून पडतात, सभोवताली नीट बघितले तर ते लक्षात येते. वास्तविक अजित पवार २००४ मध्येच 

राष्ट्रवादीच्या आमदारांची संख्या काँग्रेसपेक्षा अधिक असल्याने मुख्यमंत्री झाले असते पण त्यावेळी दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच ते होऊ दिले नाही. आपल्याला वाईट वाटले कि पुतण्या काकांच्या पुढे जाईल अशी काकांना भीती वाटल्याने त्यांनी पुतण्याच्याही पायात पाय अडकवला आहे पण त्यावेळी शरदरावांनी घेतलेला निर्णयच योग्य होता हे कालांतराने लक्षात आले कारण त्यानंतरच्या काळात अजित पवार साधे मंत्री असतांना नको तसे वागले,जर ते मुख्यमंत्री झाले असते तर….उगाच नाही, शरदराव नेतृत्वात जगमान्य आहेत कारण त्यांना दूरदृष्टी आहे, जे आपल्या लक्षातही येत नाही ते त्यांना फार आधी जसेच्या तसे दिसत असते. अर्थात अजित पवारांच्याही हे सत्तेतून पायउतार झाल्यानंतर लक्षात आलेले आहे कि सुनील तटकरेंसारखे सभोवताली जमलेले सारे त्यांना पद्धतशीर वापरून घेतात, आर्थिक फायदा अजितदादांचाही झाला असेल पण जो सिंचन अहवाल मुख्यमंत्र्यांकडे पडून आहे त्यात अजित पवार अडचणीत आल्याचे स्पष्ट दिसते, तटकरे सारख्या मंडळींनी स्वतःच्या अंगाला साधी धूळ देखील लावून घेतलेली नाही आणि अजितदादा तर चिखलाने माखले आहेत असे त्या अहवालात वारंवार वाटत राहते. अजितदादांच्या देखील ते लक्षात आल्याने यावेळचे सभागृहातले अजितदादा नेतृत्वात अधिक परिपकव झाल्याचे स्पष्ट चित्र दिसते आहे, यापुढे ते अधिक सावध राहून आणि पूर्वीच्या चुकांना फाटा देऊन, मीच खरा शिवाजींच्या घरातला पराक्रमी संभाजी, असे सिद्ध करून मोकळे होतील. यानंतरचे अजितदादा नेते म्हणून फार वेगळे असतील, आता मात्र ते नक्की खूप मोठे होतील प्रसंगी काकाच्याही पुन्हा एकवार पुढे निघून जातील…..

क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *