महादेव जाधव, नावात काय आहे: भाग २–पत्रकार हेमंत जोशी

महादेव जाधव, नावात काय आहे: भाग २–पत्रकार हेमंत जोशी 

एक रामदास आठवले केंद्रात मंत्री झाले म्हणून अख्या दलितांचे भले होते, झाले असे होत नसते असे असते तर राज्यातले अख्खे मराठे तोंडात सोन्याचा चमचा घेऊनच जन्माला आले असते, तिकडे विदर्भ किंवा मराठवाड्यातल्या सर्वसामान्य मराठ्यांच्या घरी मुक्काम करा, लक्षात येते मराठ्यांचे मूठभर भ्रष्ट असलेले तेवढे अधिकारी आणि पुढारी फक्त श्रीमंत झाले, इतर आहेत तेथेच आहेत, बिनभरंवशाच्या शेतीवर आजही बहुतांश मराठ्यांचे अजिबात भागत नाही, सर्वाधिक आत्महत्या करणारे मराठे आहेत हे त्यांच्या नेत्यांना आणि अधिकाऱ्यांना सांगतांना लाजेने मान खाली जाते. एक फडणवीस मुख्यमंत्री झाले म्हणजे राज्यात पेशवाई आली असेही अजिबात झालेले नाही, होणार नाही. होत नसते अन्यथा मनोहरपंत देखील मुख्यमंत्री होते, त्यांनीच सांगावे स्वतःच्या घराव्यतिरिक्त त्यांनी किती ब्राम्हणांचे भले केले ते? केवळ सत्तेच्या मोहातून नेते सामान्यांची माथी भडकवून मोकळे होत असतात, वास्तविक आपण सर्वसामान्यांनी त्याकडे लक्ष द्यायचे नसते..


केवळ राजकारणात उतरूनच लोकांचे, शेतकऱ्यांचे भले करता येते, सर्व सामान्यांचे भले साधता येते, समाजसेवा करता येते असे न मानणारा एक गट आहे, त्यात अण्णा हजारे असतील हणमंत गायकवाड आहेत, गिरीश गांधी आहेत, पोपटराव पवार आहेत, चंद्रकांत दळवी आहेत, संभाजी भिडे आहेत, असे अलीकडे अनेक राजकारणाव्यतिरिक्त लोकांना घडविणारे, सर्वसामान्य मंडळींना पुढे नेणारे देखील अनेक आहेत, विविध समाजसेवक आहेत, समाजसेवी संस्था आहेत, त्यातलेच एक मुंबईतले महादेव जाधव आहेत, आज ते पंचतारांकित जीवन जगणारे उद्योगपती असलेत तरी त्यांची नाळ मुंबईतल्या किंवा साताऱ्यातल्या ग्रामीण भागाशीच जुळलेली असल्याने म्हणजे त्यांचे बालपण हलाखीचे त्यांनी काढलेले असल्याने त्यांना ग्रामीण त्याचवेळी शहरी भागातल्या चाळीत राहणाऱ्या, राहिलेल्या लोकांचे नेमके दुःख ठाऊक आहे, माहित होते म्हणून त्यांचे व्यावसायिक ध्येय एकाचवेळी स्वतःला आर्थिक दृष्ट्या स्थापित, सेटल करणे हे तर नक्की होतेच पण सर्वसामान्यांसाठी भले करावे, त्यांनी हेही ठरविलेले होते, बरे झाले…


ग्रामीण भागातून शिकून आलेल्या जाधवांचे इंग्रजी, हिंदी आणि अर्थातच मराठीवर असलेले प्रभुत्व वरून उत्तम आकर्षक व्यक्तिमत्व, मी अमुक एका कंपनीचा बॉस आहे, त्यांना सांगावे लागत नाही, अनेकांचे तसे नसते, माझे स्वतःचे देखील तसे नाही म्हणजे मला सांगावे लागते कि मी पत्रकार आहे, कारण पत्रकार म्हणजे खुर्चटलेली दाढी, चेहऱ्यावर उगाचच गंभीर भाव, 

गळ्यात शबनम बॅग, पायात जुनी चप्पल, संध्याकाळी कुठेतरी दारू पिणे, इत्यादी नेहमीच्या खाणाखुणा म्हणजे तो पत्रकार, अमुक एखाद्या सभेला किंवा कार्यक्रमाला गेल्यानंतर राज्यातल्या बहुतांश मंत्र्यांना सांगावे लागते कि मी मंत्री किंवा राज्यमंत्री आहे, कारण लोकांत मिसळून काम करावे लागते हे अलीकडले बहुसंख्य मंत्री राज्यमंत्री विसरलेले आहेत, आर आर पाटलांना कधी सांगावे लागले काय कि ते मंत्री आहेत म्हणून पण उद्या राज्यमंत्री विद्या ठाकूर त्यांच्या एखाद्या महिला पीएसंगे अनोळखी ठिकाणी कार्यक्रमाला गेल्यातर त्यांना नक्की सांगावे लागेल कि त्या राजमंत्री आहे, आणि हि माझ्या बाजूला असलेली माझी पीए आहे, नाही सांगितले तर विद्या ठाकूर लॉबी मध्ये आणि त्यांची पीए प्रमुख पाहुणे, असे दृश्य हमखास नक्की पाहायला मिळेल, कोणाच्या तरी दारावर बसायला निघाल्या आहेत, असेच सदासर्वदा त्यांच्याकडे बघून वाटते…


मुंबईतल्या अतुल्या ग्रुपचे संस्थापक सर्वेसर्वा असलेल्या महादेव जाधव यांची दाखल थेट ‘ कार्पोरेट इंडिया ‘ या सुप्रसिद्ध बिझनेस मॅगझिनने इंग्रजी मासिक रुपी पाक्षिकाने त्यांच्यावर भाला मोठा लेख लिहून घेतली तेव्हा मला देखील माझ्या याव्यावसायीक मित्राची दाखल घेणे भाग पडले, एकीकडे देशातल्या इंग्रजी पाक्षिकाने त्यांच्यावर पानेच्या पाने लिहून काढायची आणि आम्ही काही मराठी मित्रांनी महादेव जाधवांकडे लक्ष द्यायचे नाही, त्यांच्यावर चार कौतुकाचे शब्द लिहायचे नाही, हे चुकीचे ठरले असते म्हणून येथे त्यांच्यावर दिलखुलास लिहायला घेतले. अतुल्या ग्रुपच्या महादेव जाधव यांच्यावर कार्पोरेट इंडिया जुलै १५, २०१८ च्या अंकात अतिशय विस्तृत लिहिल्या गेले आहे..

क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *