परत या, परत या! राणे साहेब सभागृहात परत या!!

मी सभागृहातला एक पत्रकार …सभागृहात आणि माझ्या मध्ये घडलेले काल्पनिक संभाषण ….

मा. राणे साहेब,

प्रथम, बांद्रातील निवडणूक लढवण्यासाठी ज्या हुरहुरीने आपण उभे राहिलात त्या करिता आपले जेवढे कौतुक केले पाहिजे, तेवढे कमी आहे. जिंकणे-हरणे हा शेवटी नशिबाचा खेळ आहे, परंतु, याही  कसोटीत तुम्ही त्याच जोमात उतरलात हे खरोखरच कौतुकास्पद आहे. तुम्हाला कदाचित निकाल काय लागणार हे आधीच माहित होते, पण तरीही, नारायण राणे हरू शकतो, दोन पावले मागे घेऊ शकतो, पण राणे संपू शकत नाही, हे तुम्ही  पुन्हा सिद्ध केलय. तुमच्या जिगरला आमचा सलाम!!

नारायण राणे हरले, पण तुम्हाला माहित आहे काहो,  की  नारायणराव तुमच्या हरल्याने सगळ्यात जास्त कोण दुखावले असेल? अर्थातच आपल्या महाराष्ट्राचे विधान मंडळांचे  सभागृह! अहो ते तुमची मागच्या नोव्हेंबर पासून वाट बघतेय! नागपूरला कसे-बसे सहन केले त्याने, पण या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्याने लय आठवण काढली हो तुमची! तुमच्या बरोबर त्याने मला गुपचूप आर. आर. पाटील यांचे ही न येण्याचे कारण विचारले. जेव्हा आबांची बातमी दिली त्याला, अख्ख “सभागृहच” हादरल हो राणेसाहेब! असो. मग आपल सभागृह पुन्हा कासावीस झाल. आजाराने सेनेचे बाळा सावंत गेले ना! एकीकडे सभागृहात शोकप्रस्ताव मांडत असताना, सभागृहाला  गहिवरून जाताना, मी पहिले आहे. दुखाचे दिवस विसरायचे असतात. पोटनिवडणुक होणार असे कळले. तिकडे आबांची बायको, आणि इकडे सभागृहाचे लाडके तुम्ही आणि दुसरे लाडके बाळा सावंतच्या पत्नी निवडणूक लढतायेत, हे कळले. पण सभागृहाने जे सांगितले ते पटले हो, कि

” विक्रांत जरी सगळे आकडे, सगळी समीकरणे जरी राणेंच्या विरोधात आहे, मला राणे हवे इकडे यायला. कारण मी दोन अधिवेशनापासून  बघतोय, कि जर सेनेचे मंत्रीच काहीही बोलत नाही तिथे जर सावंत यांच्या पत्नी निवडून ही आल्या तर काय बोलू  देणार हो ही मंडळी? मतदारांना कसा न्याय मिळणार .? राणे तसे बिनधास्त आहेत, कोणाला घाबरत नाही. आणि झालय काय, कि आता विरोधकच उरले नाही अशी संभावना झालीय. कॉंग्रेसचे तर माझ्या खालच्या घरात तर दाणादाण   झालीय. विरोधी पक्ष पद जरी असल, तरी मी विखेंची तुलना रामदास कदम, नारायण राणे, आणि खडसे यांच्याशीच करणार नाही का ? स्वाभाविक आहे तास करणे माझे… जेव्हा ह्या तिघांपैकी कोणीही  काहीही बोलायला उभे राहीचे, मी सुद्धा ऐकत राहायचो.तो काळ नाही राहिला आता. नुकत्याच  आटोपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात फ़क़्त एकदा कामकाज माझ्या खालच्या घराचे बंद पडले. त्यात हि सेनेने साथ दिली या विरोधकांना म्हणून! इकडे राष्ट्रवादीमध्ये सुद्धा वेगवेगळे चित्र दिसले. भुजबळा यांना साथ द्यायला कोणीही नाही. अजित पवार येण्यासाठी यायचे, तिकडे कॉंग्रेस मध्ये पृथ्वीराज चव्हाण हे पण बोलायला उठायचे नाही, नशीब तासभरासाठी का होईना, यायचे बर बाबा। सगळ्या विषयांवर अभ्यास असल्यावरही थोरात पुढाकार घेत नसत, वाडेडडीवर आक्रमक असायचे, पण ते ही या वेळी शांत, वर्षा गायकवाडला कोणी बोलू द्यायचे नाही, गोपाल अग्रवाल, त्यांच्याबद्दल न बोललेच बरे, प्रणिती नुसती काही न काही खात बसायची, सौ. चव्हाण ह्या तर आपला नवरा अजूनहि मुख्यमंत्री आहे तशाच मिरवायच्या. कोणाला हि कोणाची गरज नसल्या सारखेच वागत होते.

तिकडे सरकारमध्ये हि तसेच. रावते आणि कदम शांत बसू शकतात हे मला याच वेळी कळले. सुभाष देसाई तर पाव्हण्या सारखेच वागत होते. अशा वातावरणात कोण विचारणार या बाळा सावंतच्या  विधवेला? जेव्हा यांचे आतले वादविवाद मिटतील तेव्हा कुठे, माझ्या अंगणात माझ्या महाराष्ट्राच्या १२ कोटी जनतेला न्याय मिळेल. काय म्हणतात रे तुम्ही? मिली जुली सरकार…हा …बरोबर आहे. राणे आणि भुजबळ हे विरोधकांचे सचिन आणि सेहवाग होते. सरकारमध्ये असताना ही! माझ्या वरच्या घरात मात्र विरोधक लई मस्त. काय चालवतो रे वरचे घर,  तटकरे! कमाल आहे. धनंजय वर आपण जाम खुश!   पण खालच्या अंगणात जर राणे असते, तर तुफान मजा आली असती. इथे देवेंद्र नावाचा माझा मुख्यमंत्री एवढा हुशार की , त्याला किवा त्याच्या सरकाराला कोणीही कचाट्यात पकडू शकले नाही.

आता टीव्हीवाले म्हणतात कि राणे कदाचित नितेशला राजीनामा द्याला सांगतील आणि कुडाळमधून पुन्हां निवडणूक लढवतील  …काय  रे विश्लेषण तुम्हा पत्रकारांचे ? राणेंना सांगा असे केल्यास पुन्हा तिसर्यांदा पडाल. कसेबी करून आमदार व्हायचे हे लोकानां लक्षात येईल…. ते त्याना आवडणार नाही. राणे हे अतिशय हुशार आणि अनुभवी आहेत. मला सुद्धा त्यांची गरज आहे, पण ईगो मध्ये आणून चालणार नाही…. वाट बघायची ती त्या क्षणाची. नितेशच्या पाठी मागे उभे रहा. सल्ला जर  घ्यायचा असेल तर मोबदल्यात कशाची अपेक्षा न ठेवणारया भाऊ तोरसेकर सारख्या लोकांचे घ्या…मानो या ना मानो, तुम्ही लोकांशी थोडेसे दूर झालात. आमदार काय कार्यकते सुद्धा तुमच्या जुहु मधील आलिशान घरात यायला कचरतात, त्यात  तुमचे १०-१० अंगरक्षक….आता वाटत, की कॉंग्रेसपेक्षा तुम्ही मनसे पक्ष निवडला असता तर कदाचित तुम्ही माझ्या घरात पहिल्या बाकावर दिसले असता …शेवटी जाता जाता, कृपया कोणावरही  हरण्याचे खापर फोडू नका… तुम्ही बलवान आहात, कोणताही अशोक पर्व तुम्हाला हलवू शकणार नाही ”

तूर्त एवढंच!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *