व्यक्ती आणि वल्ली १ : पत्रकार हेमंत जोशी

व्यक्ती आणि वल्ली १ : पत्रकार हेमंत जोशी 

आधी अनुभवायला हवे, जवळून पारखायला हवे अभ्यासायला हवे तदनंतर नेमके ठरवायचे असते, एखाद्या व्यक्तीवर शिक्कामोर्तब करायचे असते कि अमुक एखादी व्यक्ती नेमकी कशी आहे म्हणजे चांगली आहे कि वाईट आहे, आपल्यातले बहुतेक अर्धवट विचारांचे ते जीभ उचलतात आणि टाळूला लावून मोकळे होतात, ते योग्य नाही, अमुक एखाद्याला तो चांगला कि वाईट पटकन झटक्यात ठरवायचे नसते, काहीही माहिती नसते आणि भले भले बोलून मोकळे होतात. शेतकऱ्यांचे मोर्चे निघताहेत पण हि जी पश्चिम महाराष्ट्र वगळता उर्वरित शेतकऱ्यांवर आजची अत्यंत बिकट अवस्था आलेली आहे, ओढवली आहे त्यासी जबाबदार शरद पवार आणि त्यांचा खादाड भ्रष्ट नीच कंपू आहे याकडे कोणाचे अजिबात लक्ष नाही, ज्या सिंचन योजनेचा हवा तसा लाभ न मिळाल्याने आजचा शेतकरी चिंतातुर आहे ते सिंचन खाते सतत पंचवीस वर्षे फक्त आणि फक्त शरद पवार आणि खादाड कंपूच्या दावणीला बांधलेले होते म्हणजे डॉ. पदमसिंह पाटील, अजित पवार, भारत बोन्द्रे, सुनील तटकरे हेच या खात्याचे मंत्री होते, या सर्वांना भर चौकात उभे करून त्यांच्या शेजारी १९९७ दरम्यान याच सिंचन खात्याचे युतीचे मंत्री असलेल्या एकनाथ खडसे यांनाही उभे करून विचारले पाहिजे कि सिंचनाचे पैसे कुठे गेले, उत्तर देणे त्या सर्वांना अशक्य आहे कारण या सर्वांनी सिंचनाचे पैसे याच सिंचन खात्यातील अभियंत्यांना हाताशी धरून स्वतःच्या घरी जिरविले, सिंचनाचे काहीही भले केले नाही म्हणून शेतकरी आज रस्त्यावर उतरले, त्याचा जाब शेतकऱ्यांचा मसीहा समजणाऱ्या आणि जे जबाबदार नाहीत त्यांना भाषणातून सतत शाब्दिक भोसकणाऱ्या शरद पवारांना विचारले पाहिजे तुमच्या मंत्र्यांनी नेमके काय हो केले…हे बघा, आपण भारतीय कर्मांवर विश्वास ठेवणारे आहोत, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर, हेही मान्य त्यामुळे नेते आणि शासकीय प्रशासकीय अधिकारी किंवा अन्य कोणीही जे सर्वसामान्यांना लुटून मोकळे झाले आहेत, मोकळे होताहेत त्यांना सारे येथेच भोगून वर जायचे आहे, येथेच सारे सोडून जायचे आहे, पोटाला चिमटे लावून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या भरवशावर श्रीमंत झालेल्या पतंगराव कदम यांना येथेच सारे सोडून जावे लागले, आपण सारेच पतंगराव कदम किंवा वसंत डावखरे, त्यांच्यातले आपल्यातले असे फार कमी त्या आर आर आबांसारखे सुखासमाधानाने स्वर्गात पोहोचले असतील, इतरांना आवाज न काढणारी पण हृदयावर घाव घालणारी काठी नक्की बसते, थोडक्यात लुबाडणारे आपले भोग भोगतातच पण विनाकारण सर्वसामान्य जनता तमाम नालायक अधीकाऱ्यांमुळे, नेत्यांमुळे, मंत्र्यांमुळे, दलालांमुळे जिवंतपणी नर्कयातना भोगते वाईट त्याचे वाटते…


नेमक्या विषयाकडे वळतो, येथे मला ‘ व्यक्ती आणि वल्ली ‘ या लेख मालिकेची सुरुवात पत्रकार कुमार केतकर यांच्यापासून करायची आहे, खूप खूप खूप आनंद झाला जेव्हा ‘ आमच्यातले ‘ कुमार केतकर हे राज्यसभेवर जाताहेत कळले, त्यांचे अगदी मनापासून अभिनंदन. येथेही तेच ज्यांची कवडीची लायकी नाही किंवा लिखाणात कोणतेही फारसे योगदान नाही ते जेव्हा केतकरांना, ‘ सुमार केतकर ‘ चिडवून मोकळे होतात, तळपायाची आग मस्तकात पोहोचते. कुमार यांना सुमार म्हणण्याची लायकी नक्की भाऊ तोरसेकर यांच्याकडे आहे म्हणून त्यांनी त्यांच्या या मित्राचा उल्लेख ‘ सुमार केतकर ‘ असा केला होता, इतर उठसुठ जेव्हा हे असे म्हणतात, ते नालायक आहेत, म्हणावे लागेल. किंबहुना ज्यांनी कुमार यांना अगदी जवळून बघितले आहे, अनुभवले आहे ते हे असे म्हणण्याचे धाडस नक्की करणार नाहीत, तोरसेकरांचे इतरांशी वैचारिक आणि नेमके मतभेद असतात म्हणून ते निखिल यास ‘ वटवागळे ‘ म्हणून लिहून मोकळे होतात, इतरांनी म्हणजे सर्वसामान्य मंडळींनी स्वतःला भाऊ तोरसेकर समजू नये….


एक मात्र नक्की कुमार केतकर यांनी आपल्यातल्या अनेकांचे काम सोपे करून ठेवले आहे म्हणजे शारदा साठ्ये यांनी आपले आडनाव पूर्वीचेच कायम ठेवले, आपण आता मैत्रिणीसंगे हॉटेलात राहायला गेल्यानंतर सांगू शकतो, आम्ही केतकरांचे अनुकरण करतो. गमतीचा भाग सोडा पण काँग्रेसच्या नेत्यांनी हा अतिशय दूरदर्शी आणि योग्य निर्णय घेतला आहे, त्यांनी केतकरांना राज्यसभेवर आपल्या घोळक्यातून पाठविणे म्हणजे बिकिनी घातलेल्या उत्तान तरुणींच्या घोळक्यात नऊवारी नेसलेल्या खानदानी देखण्या तेजस्वी स्त्रीने एंट्री घेतल्यासारखे….


तुम्हाला माहित आहे का, ज्या कुमार केतकर यांनी म्हणजे संपादक म्हणून कधीकाळी महाराष्ट्र टाइम्स चा ‘ सोनिया टाइम्स ‘ केला, ज्यादिवशी त्यांनी राज्यसभेसाठी अर्ज भरला, त्यांच्या सोबतीने म्हणे ज्या भारतकुमार राऊत यांनी संपादक म्हणून ज्या महाराष्ट्र टाइम्सचा ‘ जयमहाराष्ट्र टाइम्स ‘ केला, तेही जातीने केतकारांसंगे आले होते. अर्थात हा सारा गंमतीचा भाग आहे म्हणजे शारदाताई आणि कुमार दोघेही आजही पक्के लाल निशाणवले पण कुमार यांनी लाल निशाण सांभाळत आयुष्यभर काँग्रेस ला देखील घट्ट मिठीत पकडून ठेवले होते, ठेवले आहे, आता त्याचेच म्हणावे तर त्यांना बक्षीस मिळाले आहे लाल निशाणवाल्या केतकरांना काँग्रेस च्या कट्टर गांधी घराण्याने राज्यसभेवर पाठविले आहे, जमते बुवा एखाद्याला चांगले, जे पत्रकार कुमार केतकरांना जमले आहे, म्हणजे एकाचवेळी बायकोला मिठी मारायची आणि त्याचवेळी प्रेयसीला देखील पोटुशी, प्रेग्नन्ट ठेवायचे, केतकरांच्या बाबतीत हे असे घडले आहे, काँग्रेसच्या झेंड्यात त्यांनी लाल झेंडा उभा केला आहे….


उत्तम वक्ते, अभ्यासू , प्रचंड बुद्धिमान केतकरांच्या स्वभावासारखीच त्यांची लेखणीही,एकदम रोखठोक, म्हणजे रोख धरून ठोक देणारी..आपला मुद्दा पुढे रेटून एखाद्याचा बुद्धीभेद करावा केतकरांनीच. त्यांनी अनेकांना लेखणीतून दुखावले, पण कुणी त्यांचे कायमचे शत्रू झाले नाहीत. परवा त्यांनी फॉर्म भरल्यानंतर विनायक मेटे यांनी त्यांचे अभिनंदन केले. याच मेटेंनी केतकरांच्या घरावर हल्ला केला होता. आता भाजपकडून नारायण राणे आणि काँग्रेसकडून कुमार केतकर राज्यसभेवर, म्हणजे दोन्ही पक्ष कसे 

बदलताहेत पहा. असे वाटते शेजारचे गोविंदराव त्यांच्या शेजारी राहणाऱ्या वनमाला बाईंकडे आपले घर सोडून राहायला गेले आहेत. कुमार केतकर यांनी मंत्रालय विधिमंडळ कधीकाळी कव्हर केले आहे. महत्वाचे म्हणजे त्यांनी संपादक झाल्यावरही आपल्यातला वार्ताहर कधीच मरु दिला नाही किंवा त्यांनी इतर अनेक वार्ताहराचे जसे होते विशेषतः ‘ लोकमत ‘ मध्ये तसेही स्वतःचे होऊ दिले नाही म्हणजे त्यांनी केवळ ‘ मंत्रालय प्रतिनिधी ‘ म्हणून स्वतःला कधीही मर्यादित ठेवले नाही म्हणून केतकर मोठे झाले, संपादक म्हणून जगभर गाजले, इतर अनेक केतकर होण्याच्या लायकीचे आहेत पण त्यांनी स्वतःचा कायम ‘ अरविंद ‘ करून घेतला, घेताहेत. आता यापुढे केतकर वरून पाहिलेल्या सभागृहात थेट उतरणार आहेत, मला खात्री आहे त्यांचा ‘ भारतकुमार ‘ होणार नाही, त्यांची पत्रकारिता तेथे शाहिद होणार नाही, त्यांच्यातला पत्रकार कायम जिवंत राहील, तशी खात्री वाटते….

क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *