भाग ३ : गडकरी बावनकुळे व फडणवीस तिघेही एकमेकांसाठी कासावीस —पत्रकार हेमंत जोशी



भाग ३ : 

गडकरी बावनकुळे व फडणवीस 

तिघेही एकमेकांसाठी कासावीस 

—पत्रकार हेमंत जोशी 

प्रशासकीय अधिकाऱ्यांचे म्हणजे आयएएस झालेल्या अधिकाऱ्यांचे स्वतःचे एक वेगळेच जग असते. थेट निवडलेल्या गेलेले प्रशासकीय अधिकारी थोडेसे माणूस घाणे असतात पण एकदा त्यांच्या अतिशय चतुर डोक्याने मनात साठवले कि ज्याला आपण जवळ करतोय तो विश्वासू आहे कि मग प्रश्न संपतो ते अतिशय मोकळेपणाने मनातले सांगतात. पदोन्नती होत होत निवडल्या गेलेले प्रशासकीय अधिकारी सर्वसामानातूनच वावरून पुढे गेलेले असल्याने असे प्रशासकीय अधिकारी वागायला बोलायला मोकळे ढाकळे असतात. अगदी अलीकडे प्रशासकीय अधिकारी आबासाहेब जराडांशी बोलणे झाले, सर्वांना भावणारे त्यांचे व्यक्तिमत्व. सध्या तरी ते मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. कारण प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा अजिबात भरवसा नसतो त्यावर अश्विनी जोशी तुम्हाला थेट निबंध वाचून दाखवतील एवढ्या त्या कधी कधी या बदल्यांना वैतागतात. नोकरीत हळूहळू मोठे होत गेलेले आबासाहेब जराड त्यामुळे त्यांचा जनसंपर्क मोठा आहे माणूस म्हणून अतिशय सकारात्मक पद्धतीने या समाजाकडे बघणारे आबासाहेब त्यांच्या मिठ्ठास बोलण्यातून व सर्वांना सहकार्य या स्वभावातून, कायम हवेहवेसे वाटणारे, वाटत आलेले…


www.vikrantjoshi.com


आता तुम्हीच सांगा आबासाहेब यांचा विचार डोक्यात ठेवून जगायला मी काय त्यांची प्रेयसी आहे काय पण उगाचच डोक्यात अनेकदा वाटत राहते कि त्यांच्या पत्नीला आजपर्यंत किंवा यापुढेही किती वेगवेगळ्या पद्धतीने तोंड द्यावे लागत असेल. म्हणजे त्यांची पत्नी एकमेव अशी तिला मुलाशी नव्हे बापाशी नव्हे तर थेट तेही आबाशी लग्न करावे लागले. त्यांना म्हणे वारंवार सांगावे लागते कि होय, माझे थेट आबांशीच लग्न झालेले आहे. काही माणसे कसे अकाली उगाचच प्रौढ असल्यासारखे वागतात किंवा बोलतात देखील. वंदना गुप्तेंना मात्र विनाकारण वाटत राहते कि त्या आजही तिशीच्या दितात म्हणून पण आबा जराड वागायला बोलायला देखील अगदी सुरुवातीपासून एखाद्या पोक्त वयाच्या आबासारखेच त्यामुळे मिसेस जराड यांनी खऱ्या अर्थाने आबाशी लग्न केले आहे अशी आमची खात्री झाली आहे. तुम्हीच सांगा जेव्हा त्यांनी लग्न झाल्या नंतर मैत्रिणींना सांगितले असेल कि त्या आबांसंगे मधुचंद्र साजरा करायला निघाल्यात,काय वाटले असेल ऐकणाऱ्यांना. एक मात्र नक्की थेट आबाशी लग्न करणाऱ्या त्या या राज्यातल्या एकमेव, अगदी तरुण वयात त्यांनी थेट आबांशी लग्न केले. कृपया वाचकांनी गमतीने घ्यावे…


नितीन गडकरी हे देवेंद्र फडणवीस यांना म्हणाल तर धाकट्या भावासारखे मानतात म्हणाल तर पुत्रवत प्रेम करतात. उद्या सत्तेच्या कोणत्याही वाट्यावरून त्या दोघात वाद होणार नाहीत एकमेकांवर ते तुटून पडणार नाहीत त्यांचा अनिल देशमुख रणजित देशमुख होणार नाही. लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान फडणवीसांना हे शंभर टक्के माहित होते कि या देशातल्या प्रतिष्ठेच्या मानल्या गेलेल्या निवडणुकांपैकी एक, गडकरी यांची निवडणूक असेल आणि त्यात त्यांना महत्वाची भूमिका निभवावी लागणार आहे त्यामुळे संपूर्ण राज्याच्या लोकसभा निवडणुकीची सोलो हिरो म्हणून जबाबदारी असतांनाही स्टार प्रचारक म्हणून ते व्यस्त असतांनाही सतत नागपूरशी संपर्क ठेवून होते, दररोज नागपूर लोकसभा मतदारसंघात येऊन जाऊन होते, अगदी गडकरी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळीही फडणवीस गडकरींच्या आधी महालात घरी गेले त्यांना सर्वातआधी वाकून नमस्कार करून शुभेच्छा दिल्या त्यानंतर देखील पूर्णवेळ ते गडकरींसमवेत होते…


नितीनजी आमचे नेते आहे असे जाहीर सतत उल्लेख करणारे फडणवीस त्यामुळे गडकरी यांचा त्यांच्या उभ्या आयुष्यात फडणवीसांकडून कधीही ‘ यशवंतराव चव्हाण ‘ होणार नाही, वास्तविक दोघांचा स्वभाव पूर्णतः भिन्न म्हणजे जेथे गडकरी कोलांट्या उड्या मारत मारत पोहोचतील तेथे फडणवीस यांचे चालणे एखाद्या नववा लागलेल्या गर्भार बाईसारखे संथ आणि शांत असेल पण विकासाचा वेग मात्र त्या दोघांचाही कमालीचा असल्याने त्यांनी मनाशी ठरविलेले आयुष्यात पूर्ण केलेले असते. दोघेही राजकारणी आहेत पण कारस्थानी नाहीत त्यामुळे सतत याला संपवा त्याला खतम करा, असे टिपिकल विकृत खलनायकी विचार त्यांच्या डोक्यातही नसतात. उत्तम लोकांच्या संस्कारात वाढले कि हे असे सरळमार्गी वागणे आणि थेट सांगून पंगा घेणे सहज शक्य होत असते. पुन्हा एकवार सांगतो गडकरी हे फडणवीसांना पाण्यात पाहत नाहीत आणि फडणवीस देखील मिथुन चक्रवर्ती होऊन कधीही गडकरींकडे खाऊ का गिळू किंवा गडकरी म्हणजे प्रेम चोप्रा आहेत, गडकरी गुलशन ग्रोवर आहेत, पद्धतीने बघत नाहीत…

क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *