अशी हि मीडिया : भाग १: पत्रकार हेमंत जोशी

अशी हि मीडिया : भाग १: पत्रकार हेमंत जोशी 

मीडिया क्षेत्रात काम करताना राजकीय पत्रकारिता करतांना यात रमलेले अनेक कधी अगदी जवळून तर कधी लांबून बघितले. मीडियातल्या बहुतेकांची इत्यंभूत कुंडली पण जमा केली आणि त्या कुंडलीच्या आधारेच मीडियात करिअर करणाऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन ठेवला. आबा  माळकर, उदय तानपाठक, अभय देशपांडे, अभिजित मुळे उदय निरगुडकर सारख्या काही पत्रकारांना कायम सख्य्या भावासारखे किंवा मुलासारखे मानले पहिले बघितले. आणि ज्याला मी पत्रकार केले किंवा पत्रकारितेत आणले त्या सख्य्या भावानेच जेव्हा मला लाथाडले तेव्हा सुरुवातीला काहीसे आश्चर्य वाटले पण नंतर लक्षात आले कि तो त्याच्या मूळ स्वभावाला जागला. प्रवीण बर्दापूरकर जेव्हा माझ्या लिखाणातली जेथल्या तेथे चूक काढून मोकळे होतात माझे लक्ष त्यांच्या पायाकडे जाते कारण असे लिखाणातले महर्षी मनात सतत गुरुस्थानी असतात. कधी दिल्ली गाजवून सोडणाऱ्या अशोक वानखेडे यांचा अघळपघळ स्वभाव भावतो तर कधी उत्तुंग ज्ञानी उदय निरगुडकर किंवा निखिल वागळे आणि अनिल थत्ते यांचे या क्षेत्रातले शापित वास्तव्य मला अस्वस्थ करून सोडते. अगदी सहज शक्य असतांना कुमार केतकर कधीही पैशांच्या मागे लागले नाहीत अन्यथा आज ते पत्रकारितेत पैशांच्या बाबतीत दर्डा यांच्या मांडीला मांडी लावून बसू शकले असते पण दर्डा यांनी तत्वे गुंडाळून ठेवलीत म्हणून त्यांच्याकडले काही अतुल कुलकर्णी नको पत्रकारितेचा नेमका गैरफायदा घेऊन मोकळे झाले. कदाचित कुमार केतकर यांच्या भूमिका आम्हा अनेकांच्या नावडीच्या नावडत्या असतील पण या राज्यातले जांभेकर टिळक अत्रे तोरसेकर यांच्याच पंक्तीतले एक कुमार केतकर देखील…

लहानपणी एक कथा होती, भूक लागली कि जावे आजीकडे मग ती डब्यातला लाडू काढून देते तसे त्या दीर्घ अनुभवी अभ्यासू मेहनती हसतमुख कायम जमिनीवर राहणाऱ्या अभय देशपांडे याचे, हातचे काहीही राखून न ठेवता न टाळता लिखाणात अमुक एखाद्या ठिकाणी अडचण आली कि जावे अभयकडे म्हणजे लावावा फोन त्याला केव्हाही, तो तुम्हाला नेमके संदर्भ देऊन मोकळा होतो तुमचे काम सोपे होते. अभय आणि पत्रकार पत्नी हायमा दोघेही भिन्न, हा मराठी ब्राम्हण तर ती परप्रांतीय हिंदी भाषीक दोघेही नक्की महत्वाकांक्षी आणि नावाजलेले देखील, पण दोघांमधले ट्युनिंग, त्यावर करावे तेवढे कौतुक कमी ठरावे.

अर्थात अभय याचे आडनाव तसे गोडबोलेच असायला हवे होते अर्थात त्याचे प्रसंगी तापट निखिल वागळे किंवा हरफनमौला अनिल थत्ते यांच्याशी जरी लग्न झाले असते तरी अभयने छान निभावून नेले असते. मस्त संसार करून तो मोकळा झाला असता. उदय तानपाठक पत्रकारिता का करतोय तेच कळत नाही त्याच्या जागी मी असतो तर ज्यांच्या आयुष्यातले हसू हरविले आहे अशांचे हसू परत आणण्याचे क्लासेस मी सुरु केले असते आणि शरद उपाध्ये यांच्यासारखे लबाडीने करोडो रुपये कमावून मोकळा झालो असतो. खाजगी आयुष्य कमालीचे गूढ अस्वस्थ किंवा एकांतात डोळ्यात आसवे गाळणारे पण लोकांसमोर येताच आपले दुःख लपवून लोकांचे दुःख टेन्शन अगदी सहज हसवून दूर करणारा कदाचित उदय असेल किंवा मी देखील असू शकतो, म्हणून उदयकडे कायम कौतुकाने बघतो…

अनेक अति भ्रष्ट पोलिसांच्या किंवा शासकीय अधिकाऱ्यांच्या पलीकडे पैसे खाण्यात एक हलकट जमात या राज्यात या देशात फार मोठ्या प्रमाणात फोफावली आहे ज्या जमातीचे उदंड पीकच या राज्यात कानाकोपऱ्यात विशेषतः मुंबईत मोठ्या प्रमाणात आहे ती नीच राज्यद्रोही जमात आहे मीडियाची, फार कमी सुसंस्कृत सुविचारी आहेत किंवा अल्पसंतुष्ट आहेत भाऊ तोरसेकर यांच्यासारखे, मीडिया मग त्या विविध वाहिन्या असतील किंवा वृत्तपत्रे, अनेकांचे पगार मूठभर पण त्यांची वरकमाई मात्र अचंबित करणारी अनेकांना करोडपती करणारी. खरेतर या मंडळींना आयकर खात्याकडे सोपवायला हवे, जेथे काम करतात तेथले पगार म्हणजे त्यांच्यातल्या अनेकांचा दररोजचा तोही बाहेरचा बाहेरख्याली खर्च असतो किंबहुना जसे काही शासकीय अधिकारी  किंवा पोलीस जसे सांगतात कि आम्हाला पगार नको फक्त आम्ही सांगतो तेथे आमचे पोस्टिंग करा तेच मीडिया मध्ये काम करणाऱ्या अनेकांचे, तुम्हाला वाटते कि पत्रकारांनी त्या जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्यांवर तुटून पडावे पण मिंध्या पत्रकारांना ते शक्य नसते त्यांच्यातले फार कमी प्रसाद काथे असतात…

क्रमश: हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *