कोण कसे : तावडे असे ३: पत्रकार हेमंत जोशी

कोण कसे : तावडे असे ३: पत्रकार हेमंत जोशी 

तुमचं आमचं सेम असतं, आपण सारेच आयुष्याच्या जडणघडणीत नक्की कोणाकडून तरी प्रेरणा घेत असतो, त्याकाळी त्रिशूल मधल्या नायकाचा म्हणजे अमिताभच्या त्या भूमिकेचा माझ्यावर एवढा प्रभाव पडला कि मी खिशात ५०० रुपये, डोक्यावर त्याकाळी दहा लाख रुपयांचे कर्ज आणि जमवलेले एक कोटीच्या घरातले म्हणाल तर रुपये आणि मालमत्ता सबकुछ गमावून मुंबईत आलो होतो, त्रिशूल डोळ्यासमोर ठेवून पुन्हा कामाला लागलो, परमेश्वर नक्की पाठीशी असावा, पुढल्या केवळ वर्षभरात सारे काही परत आले. खूप काही मिळविले त्रिशूल मधल्या अमिताभ सारखे. व्यवसायात पैसे कमविणे जमविणे कठीण असते पण अयोग्य सल्ला देणाऱ्यांच्या कटात कचाट्यात तुम्ही अडकलात कि होत्याचे नव्हते व्हायला काही क्षण पुरेसे ठरतात म्हणून पदोपदी सावध असावे, सावध राहावे…

आमचेही त्या बार टेंडर सारखे झालेले आहे म्हणजे एखाद्या पबमध्ये बार टेंडर म्हणून काम करणारे अनेक असे असतात कि सुरुवातीला ते तेथला साधा सोडा देखील तोंडात घेणे टाळतात पण पुढे पुढे हेच सोवळ्यातले त्या वातावरणाशी एकरूप होतात आणि हळूहळू बॉसचे लक्ष नसतांना आवडीचे मद्य गुपचूप घ्यायला सुरुवात करतात. सतत २४ तास त्या राजकीय पत्रकारितेत डोके खुपसून बसल्याने धीरेधीरे आमच्यावरही या वातावरणाचा एवढा परिणाम झाला आहे कि अलीकडे स्वित्झर्लंड गेलो असतांना तेथल्या रोमँटिक वातावरणातही माझ्या स्वप्नात कधी देवेंद्र फडणवीस यायचे तर कधी अजित पवार, कधी मंदाताई म्हात्रे यायच्या तर कधी भारती लव्हेकर, थोडक्यात हे नेते होलेहोले आमच्यावरही प्रभाव पाडून मोकळे होत असतात, आणि ह्या अशाच एका प्रभावाखाली मी वावरतोय, आणि ते आहेत श्रीमान विनोद तावडे, होय! त्याची पुस्तकाचे गाव हि संकल्पना मला अक्षरश: एवढे बेड लावते आहे कि शासनाची फारशी मदत न घेता मला माझ्या पारखेड या गावात  जवळपास २५ एकर शेतीवर अगदी मनापासून पुस्तकाचे गाव उभारायचे आहे तेही स्वखर्चाने, शासनाची कोणतीही आर्थिक मदत न घेता….

बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरातील एमआयडीसी लगत खेड्यात म्हणजे खामगावपासून फारतर ६-७ किलोमीटर अंतरावर हि बागायती शेती आहे, अडचण अशी कि तेथपर्यंत जाणारा रस्ता अर्धवट बांधून तयार आहे, लालफितीत अडकला आहे, आमचे दोन मित्र हे काम अगदी सहज करू शकतात, तशी विनंतीही मी त्यांना करणार आहे, त्यातले एका आहेत, व्हर्सटाईल जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार आणि दुसरे आहेत राज्याचे कृषी मंत्री श्रीमान भाऊसाहेब फुंडकर, या दोघांपैकी जो कोणी मनात घेईल त्यांच्यासाठी हे काम म्हणजे हातचा मळ, त्यांचे सहकार्य, मी तो अख्खा परिसर बदलवून मोकळा होईन, राज्यातले हे पुस्तकाचे दुसरे गाव असेल…

एकमेकांमध्ये सुसंवाद कोणत्याही मंत्रिमंडळात अतिशय आवश्यक ठरतो, देवेंद्र फडणवीस विकासाच्या कोणत्याही प्रश्नावर पॉझेटिव्ह असतात, हे त्यातल्या त्यात बरे, तावडे म्हणजे कायम अफलातून प्रयोगशील व्यक्तिमत्व, मंत्री, माणूसही, त्यांना इंग्लड च्या धर्तीवर येथे या राज्यातही पुस्तकांची गावे निर्माण करण्याची कल्पना सुचली, त्यांनी ती लगेच गाडणवीसांसमोर मंडळी आणि अमलातही आली, भिलारी,पुस्तकाचे गाव म्हणून जन्माला आले. माझे वाक्य लिहून घ्या, आता हे लोन हळूहळू राज्यात आणि पुढे देशात पसरले नाही तर मला हेमंत जोशी म्हणू नका, नालायक म्हणा, थर्डग्रेड म्हणा, वाटल्यास मला आघाडीच्या सरकारतल्या एखाद्या मोघे यांच्या सारख्या भ्रष्ट मंत्र्याची उपमा द्या. एखादा मंत्री जेव्हा इतिहास निर्माण करतो, त्याचे मनापासून कौतुक व्हायलाच हवे, तावडे त्यास पात्र आहेत…

काय हा अफलातून माणूस, भारतात चक्क पहिल्यांदा पुस्तकाचं गाव हा वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम फडणवीस आणि तावडे यांनी आकारास आणला आहे, अर्थात अधिक श्रेय नक्कीच तावडे यांनाच द्यायला हवे. होऊन गेलेल्या आर आर पाटलांसारख्या फार कमी मंत्र्यांनी हे असे आगळेवेगळे उपक्रम आणले आणि राबविले, हे असे अफलातून उपक्रम राबविण्यात कायम आघाडीवर असतात या राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते श्रीमान दिवाकर रावते, सलाम या अशा मंत्र्यांना, नेत्यांना, इतरांना या अशा कल्पना का सुचू नयेत, कायम पैसे खाऊन मोकळे व्हावेसे वाटते, याचे अधिक दुःख होते. खरोखरी साहित्य क्षेत्रात हा इतिहास घडविणाऱ्या तावडे यांचे येथे कौतुक करतांना शब्द सुचत नाहीत. पुस्तकाचे गाव या संकल्पनेचे प्रणेते विनोद तावडे, अशी आता त्यांच्या नावाची इतिहासात नोंद होईल. या निमित्ते टुरिझम वाढेल आणि ज्ञानातही भर पडेल वरून हळूहळू गावकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडेल तो प्रकार तर अधिक कौतुकभरा…

विशेष म्हणजे भिलार मध्ये आजच जवळपास २५ घरांमध्ये १५-१६ हजार एवढी विविध विषयांवरची पुस्तके मोफत वाचण्यासाठी उपलब्ध आहेत, त्यातून या गावाला भेट देणाऱ्यांचा वेग अतिशय झपाट्याने वाढला आहे, येणारे हेच ठरवून येतात कि महाबळेश्वर जायचेच पण भिलार ला अधिक वेळ द्यायचा, अत्यंत कौटुंबिक वातावरण आता त्या भिलार मध्ये बघावयास मिळते आहे, नेमके हेच वातावरण मला त्या छोट्याशा 

पारखेड मध्ये निर्माण करायचे आहे, बघूया कसे जमते ते….

हा लेख संपवितांना मित्रांनो, तुम्हालाही आव्हान, तुम्हीही स्वप्न बघा कि तुमचे गावदेखील पुस्तकाचे गाव बनविण्याचे, कमी तेथे आम्ही, तिथे काही शासकीय अडचण आलीच तर अगदी मनापासून मी तुमच्या संगतीला असेल, चला, उरलेल्या आयुष्यात  

काहीतरी चांगले करूया….

पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *