नेत्यांचे बबड्या आणि आत्महत्या : भाग ३: पत्रकार हेमंत जोशी


नेत्यांचे बबड्या आणि आत्महत्या : भाग ३: पत्रकार हेमंत जोशी

संजय राऊत यांची बिनधास्त बडबड आणि सामनातील त्यांचे लेख किंवा अग्रलेख करोना काळातील शिवसेना किंवा उद्धवजी मुख्यमंत्री झाल्यानंतरची काहीशी सुस्त मवाळ सावध बेसावध झालेली सेना जिवंत ठेवण्यात राऊतांचेच खरे हातभार. असे आहे कि प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात राऊत तर शिवसेनेचे नेते आहेत खासदार आहेत सामना दैनिकाचे सर्वेसर्वा आहेत त्यामुळे त्यांना जसे असंख्य मित्र आहेत तसे बहुसंख्य शत्रू असणे स्वाभाविक आहे. भाषा शिवसेनेला शोभणारी असली तरी एक मात्र मला त्या आदित्य ठाकरे आणि संजय राऊत या दोघांचेही खटकले. जी धमकी थेट लेखी म्हणजे पत्रक काढून आदित्य ठाकरे यांनी दिली त्याच पद्धतीने संजय राऊत देखील वाहिन्यांसमोर धमकी देऊन मोकळे झाले. राऊत म्हणाले ज्यांचे हात दगडाखाली असतात आहेत त्यांना आम्हालाहि पाहून घेता येईल आणि आदित्य म्हणाले अद्याप माझा संयम ढळलेला नाही. म्हणजे संयम ढळला तर मीडियावलो तुमचे काही खरे नाही. दोघांनीही उघड उघड उगाच मीडियाला किंवा तत्सम विरोधकांना धमकावले आहे जे निदान या कठीण काळात त्यांच्यादृष्टीने शिवसेना व मुख्यमंत्रांच्या देखील दृष्टीने अडचणीचे ठरू शकते. चुकून काही विपरीत घडले तर त्याची मोठी किंमत कदाचित थेट उद्धव ठाकरे यांनाही मोजावी लागू शकते. हि ती उघड धमकी देण्याची अजिबात वेळ नाही किंवा राऊत यांनी तर थेट ब्लॅक मेलिंग करणारी भाषा वापरलेली आहे. वातावरण पूरक नसतांना लेखणी किंवा भाषा जपून वापरलेली बरी….

आंधळीला कधी डोळा मारू नये, मुक्या माणसाला गाणं म्हणायला सांगू नये, तोतऱ्याला संस्कृत सुभाषित म्हणण्याचा आग्रह धरू नये, नवरा भलेही रोमँटिक मूड मध्ये असेल पण हगवणीचा त्रास असतांना त्याचा हात पकडून त्याला पलंगावर बसवून ठेवू नये, गाढव लाथा झाडत असतांना अगदी ढोर डॉक्टरने देखील त्याचे ढुंगण तपासायला जाऊ नये, कुत्र्याच्या डोळ्यात कधीच फुंकर मारू नये, सिंहिणीच्या तोंडात अगदी ती लाडात आलेली असली तरी माणसाने बोट देऊ नये, मरतुकड्या माणसाने खूप मोह झाला तरी बलदंड बायकोला कडेवर उचलून घेऊ नये अशाने देव त्याला हमखास आपल्याकडे उचलून नेतो, चवताळलेल्या वाघिणीला आणि चिडलेल्या आडदांड बायकोसमोर कधीही तिला अंगावर शिंगावर किंवा डोक्यावर बसवून घेण्याची भाषा करू नये तद्वत याक्षणी शिवसेनेने अर्णब गोस्वामीला विनाकारण महत्व देऊ नये, त्याच्या ढुंगणाला चीमटा काढून तो चिडेल त्याला त्यातून अधिकाधिक बोलण्याची संधी मिळेल असे करू नये जे शिवसेनेसाठी अजिबात हितावह ठरणारे नसेल. शिवसेना त्यातून घाबरली अर्णब समोर हादरली असा कुठलाही अर्थ कोणीही काढणार नाही उलट संजय राऊत किंवा शिवसेना नेते अक्कलहुशारीने वागले असाच त्यातून अर्थ काढता येईल जे शंभर टक्के सेनेला विशेषतः जे शिवसेना नेता मीडियाच्या किंवा अर्णब गोस्वामीच्या रडारवर आहेत ते आणखी आणखी टार्गेट होत जातील…

www.vikrantjoshi.com


मी पत्रकारितेत अगदीच लहान होतो बऱ्यापैकी नवखा होतो तेव्हाही हे असेच शिवसेनेच्या बाबतीत घडले होते आणि मी लिहिले होते कि बाळासाहेबांनी तोंडफळ वाचाळवीर विरोधी विचारांच्या निखिल वागळे व त्याच्या जेमतेम खप असलेल्या महानगर दैनिकाच्या मागे अजिबात लागू नये त्याच्यावर व महानगरच्या कार्यालयावर हल्ला करू नये त्यातून शंभर टक्के शिवसेनेच्या लोकप्रियतेत आणि बाळासाहेबांच्या लोकमान्य नेतृत्वात मोठा फरक असून त्याचे वाईट परिणाम शिवसेनेला दीर्घकाळ भोगावे लागतील, नेमके तेच घडले माहीम परिसरातील सदा सरवणकर सारखे बलाढ्य नेते वागळे आणि महानगर कार्यालयावर चाल करून गेले पुढे तेच घडले त्याआधी जेमतेम पत्रकारितेत मान्यता असलेला निखिल वागळे रात्रीतून मोठा झाला महानगर चा खप प्रचंड वाढला वागळे यांना पुढे कित्येक वर्षे पोलीस सौरक्षण देण्यात आले तो त्याचे वृत्तपत्र महानगर मोठे झाले आणि शिवसेना तसेच बाळासाहेब ठाकरे यांना न घाबरणारा शिवसेनेला फाट्यावर मारणारा महत्वाचे म्हणजे बाळासाहेबांचा कायम बाळ असा एकेरी उल्लेख करणारा निखिल पुढे प्रसिद्धीच्या झोतात आला, त्याला आर्थिक गणिते जमली नाहीत म्हणून महानगर संपले नंतर निखिल गाढवाच्या मागून व मालकाच्या पुढून जाऊ लागल्याने त्याला विविध वाहिन्या मधून बाहेर पडावे लागले तो भाग वेगळा पण निखिल वृत्तपत्रे किंवा वाहिन्यांमध्ये टिकला असता तर आज उद्धव, आदित्य आणि शिवसेनेला आणखी एका कटकटीला सामोरे जावे लागले असते. अर्णव ओरडतो आहे आणि इतर हिंदी इंग्रजी वाहिन्या शांतपणे नेमकी टीका करून मोकळे होताहेत हाच काय तो अर्णब आणि इतर वाहिन्यामधला फरक दिसतो. थोडक्यात कोणाकोणाची तोंडे तुम्ही बंद करणार आहात ?

विचित्र योगायोग म्हणावा कि इतिहासाची पुनरावृत्ती पण तेव्हा जसे घडले होते ते तसेच आजही घडते आहे घडले आहे म्हणजे रमेश किणी म्हणाल तर आत्महत्या म्हणाल तर हत्या प्रकरण घडले आणि निखिल वागळे यांनी तेव्हा रमेश किणी खून प्रकरण उचलून धरले ते थेट याप्रकरणी बाळासाहेबांवर सडकून टीका करीत होते शिवसेनेला वाट्टेल त्यापद्धतीने बदनाम केले जात होते, आज तीच पुनरावृत्ती घडलेली आहे दिशा सॅलियन आणि सुशांत सिंग आत्महत्या कि हत्या प्रकरणात यावेळी देखील संशयाची खरी खोटी सुई मातोश्रीकडे टोचल्या जात असल्याने पुन्हा यावेळी संजय राऊत किंवा अन्य वागळे पद्धतीने अर्णब गोस्वामी किंवा त्याच्या रिपब्लिक भारत वाहिनीला टार्गेट करण्याचा प्रयत्न करताहेत जी त्यांची मोठी चूक होते आहे, सोयीस्कर दुर्लक्ष करणे वास्तविक त्यावर एकमेव उपाय व इलाज असतांना संजय राऊत आणि तत्सम सेना नेते अर्णबला मोठे करताहेत त्याचे आणखी आणखी महत्व वाढवताहेत ज्यातून काहीही फलनिष्पत्ती न घडता पुढे शिवसेनेलाच त्याचा मोठा फटका बसू शकतो, जेव्हा आपली बाजू पडती असते तेव्हा शांत राहून नेमके उत्तर देऊन मोकळे व्हायचे असते. याआधी मी जे म्हणालो तेही यापुढे अजिबात घडता कामा नये म्हणजे एक चूक लपविण्यासाठी दुसरी चूक करणे म्हणजे दिशा गेली सुशांत गेला आता तिजा घडता कामा नये म्हणजे ज्यांना हे आत्महत्या प्रकरण नेमके माहित आहे त्यातल्या एखाद्याने आत्महत्या केली असेही यापुढे कानावर येता पडता कामा नये थोडक्यात चुकांची वारंवार पुनरावृत्ती घडता कामा नये. अशावेळी शांत बसणे आणि ज्यांच्या हातून दिशा किंवा सुशांत आत्महत्या कि हत्या प्रकरणी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मदत झाली त्यांनी चुका कबूल करून मोकळे होणे हाच त्यावर उत्तम उपाय असेल. शिवसेनेने मनाला लावून न घेता अधिक हुशारीने पावले उचलावीत कारण ज्या ज्या वेळी इतरांना वाटते शिवसेना आता संपली त्या त्या वेळी हीच शिवसेना उफाळून वर आलेली आहे यावेळीही तसेच घडेल, माझे हे वाक्य लिहून ठेवा…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *