फंडा फडणवीसांचा वांदा सेनेचा २ : पत्रकार हेमंत जोशी

फंडा फडणवीसांचा वांदा सेनेचा २ : पत्रकार हेमंत जोशी 


उत्तम नेता यशस्वी राजकारणी तोच होतो असतो जो प्रसंगी चार पावले मागे येतो आणि संधी चालून येताच विरोधकांचा खात्मा करून मोकळा होतो. सत्तेत भाजपा शिवाय येऊन चूक केली त्यात अननुभवी असल्याने चारही बाजूंनी अवघ्या ८-९ महिन्यात हातून प्रचंड चुका घडल्या, बाजू पार लंगडी पडली आहे हे नेमके लक्षात आल्याने किंवा अनिल परब यांच्या सारख्या जवळच्या विश्वासू साथीदारांनी नेमके लक्षात आणून दिल्याने उद्धवजी यांनी अगदी अलीकडे चार पावले मागे येण्याचे ठरविले जे त्यांच्या, उद्धव ठाकरे कुटुंब सदस्यांच्या व झपाट्याने मरगळ आलेल्या अतोनात नुकसान झालेल्या शिवसेनेच्या दृष्टीने त्यांनी उचललेले योग्य असे पाऊल. तुम्ही परिवहन मंत्र्याला म्हणजे अनिल परब यांना कधी जवळून जाताना न्याहाळले आहात का, अनिल परब यांच्या कडे बघितल्यानंतर असे वाटते हा माणूस पाचवीत दोन वेळा नापास झाल्याने सहावीत असतांना शाळा सोडून केबलच्या धंद्यात अगदी लहान वयात पडला असेल, अनिल परब हे आपली सही देखील अडखळत करत असतील आणि मराठीतले जोडाक्षरे खाजगी सचिव रुमाले यांच्याकडून वाचून घेत असतील पण हा तुमचा गैरसमज ठरावा कारण अनिल हे तेही अभ्यास करून वकिलीचे पदवी मिळविणारे त्यामुळे एकही केस आजपर्यंत अंगावर न घेता अत्यंत धाडसी नेता म्हणून म्हणजे कोणालाही थेट अंगावर घेण्याची तयारी ठेवणारे शिवसेनेतले दादा नेते, त्यांचे वागणे आक्रमक आणि सल्ला देणे निष्णात वकीलसारखे म्हणून उद्धव यांचे ते उजवे हात ओळखले व गणले जातात. चार पावले मागे या, उद्धव यांना त्यांचाच हा अत्यंत मोलाचा सल्ला, उद्धव आता केलेल्या अतिशय गंभीर चुकांतून सावरताहेत… 

देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत भेटीच्या काही दिवस आधी दिल्लीत उद्धव यांचे दुसरे एक विश्वासू खासदार विनायक राऊत हे भाजपच्या अमित शाह आणि राजनाथ सिंग यांना भेटून, आमच्या चुका पदरात घेऊन आम्हाला मोठ्या मनाने माफ करून आम्हाला जवळ घ्या, तुमच्यापासून दूर जाण्याची आमच्याकडून पुन्हा अशी चूक होणे नाही पण सुशांत सिंग प्रकरणात आमची बदनामी होणार नाही, आम्ही पुन्हा एकवार लहान भावाच्या भूमिकेत शिरून आपल्याशी युती करण्यास सत्तेत बसण्यास तयार आहोत, असे विनायक यांनी म्हणे या अशा भाजपा श्रेष्ठींना विश्वासात घेण्याचे काम केले होते पण त्यांना कदाचित अमित शाह यांच्याकडूनच थेट असे सांगण्यात आले कि निरोप देण्यात आला कि, महाराष्ट्रातले निर्णय घेण्याआधी, देवेंद्र फडणवीस सांगतील म्हणतील असेच आमचे बहुतेकवेळा धोरण असते त्यामुळे तुम्ही त्यांनाच भेटावे, त्यानंतर ते जे सांगतील तसे करता येईल, आम्ही तुमच्याबाबतीत निर्णय घेऊन मोकळे होऊ असे दिल्लीतून विनायक राऊत यांना स्पष्ट शब्दात सांगण्यात आले. देवेंद्र फडणवीस यांची ते मुख्यमंत्री असतांना वेळोवेळी केलेली अडवणूक त्यानंतर सत्तेत न येण्यासाठी त्यांची झालेली फसवणूक, फडणवीसांची वेळोवेळी कधी भाषणातून तर कधी कृतीतून केल्या गेलेली मानहानी त्यांचे केल्या गेलेले सततचे अनेक अपमान, त्यामुळे त्यांना कोणत्या तोंडाने भेटायचे, शिवसेनेची येथे मोठी पंचाईत झाली, नाही म्हणायला फडणवीसांना भेटण्याचे गाठण्याचे प्रयत्न देखील करण्यात आले जे फडणवीसांनी धुडकावले त्यातून मग हनुमान संजय राऊत फडणवीसांना भेटण्याआधी नितीन गडकरी यांना भेटले आणि फडणवीसांना भेटण्याची इच्छा त्यांनी गडकरी यांच्याकडे प्रकट केली…. 

नंगा नहायेगा क्या और निचोडेगा क्या, अशी दस्तुरखुद्द गडकरी यांचीच सध्या मोदी व शाह यांनी अवस्था करून ठेवली आहे. जे नितीन गडकरी यांच्याकडे जातील ते त्यांच्या गटाचे त्यामुळे त्यांना उचलून बाजूला टाकणे हे भाजपा श्रेष्ठींचे सध्याचे धोरण त्यामुळे लालकृष्ण अडवाणी व नितीन गडकरी या दोघांची पक्षातली अवस्था फारशी वेगळी नाही फक्त गडकरी यांना खुर्ची देण्यात आलेली आहे हेच काय त्यांचे भाग्य. गडकरी यांचे चालले असते तर खडसे यांनी उंचच उंच जम्प्स घेतल्या असत्या वरून फडणवीसांना वाकुल्या पण दाखवल्या असत्या. गडकरी मग राऊत यांना म्हणाले, थांबा, फडणवीस फारतर याक्षणी मोहन भागवत यांचे नक्की ऐकून घेतील त्यातून तुम्हाला भेटतील. आणि भागवत यांच्या थेट निरोपानंतर आणि वर दिल्लीत कानावर घालून तेथून रीतसर परवानगी मिळाल्यानंतर फडणवीस जवळपास दोन तास मुंबईतल्या पंच तारांकित हॉटेलात जेव्हा संजय राऊत यांना भेटले तेव्हा आधीचे पावणे दोन तास ते राऊत यांना फक्त आणि फक्त एक एक प्रसंग आठवून आणि एक एक पुरावा पुढे करून अक्षरश: झापत होते, तासत होते, बोलत होते आणि संजय राऊत मान डोलावून केवळ हो म्हणत होते. शेवटी फडणवीस एवढेच म्हणाले कि मी सध्या बिहार विधान सभा निवडणुकीत अतिशय व्यस्त आहे शिवाय तुमच्या माझ्या भेटीने आमच्या पक्षातले सोमय्या शेलार भातखळकर कदम यांच्यासारख्या तुमच्या अंगावर थेट येणाऱ्या अन्य नेत्यांना त्यातून अस्वस्थता निराशा येऊ शकते, मला तुमच्या या प्रपोजल वर आधी विचार करून नेमके जे काही ते आमच्या नेत्यांच्या कानावर घालू द्या, त्यानंतर सांगतो, नेमके मला आम्हाला काय करता येईल ते आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे याक्षणी आमचे कोणतेही चुकीचे पाऊल उचलणे,लोकांच्याही मनातून आम्ही उतरू शकतो तेव्हा मला निदान याक्षणी पटकन काहीही करता येणार नाही आणि संजय राऊत हात हलवत परतले, हीच वस्तुस्थिती आहे. अचानक विरोधकांना जवळ करून मित्रांच्या मनात खळबळ आणि अस्वस्थता निर्माण करणारे शरद पवार, यावेळी उद्धव ठाकरेच त्यांच्या पद्धतीने वागले त्यामुळे शरद पवार किंवा थोरात यांच्या सारखे अन्य काँग्रेस नेते या दिवसात कमालीचे अस्वस्थ आहेत यापुढे महाआघाडी मध्येच आपणहून कोणत्याही क्षणी काहीही घडू शकते…

 
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *