टार्गेट ब्राम्हण २ : पत्रकार हेमंत जोशी

टार्गेट ब्राम्हण २ : पत्रकार हेमंत जोशी 

बहुतेक विवाहित पुरुषांच्या बाबतीत जे घडते तेच अलीकडे माझ्या एका उद्योगपती असलेल्या मित्राच्या बाबतीतही  घडले आहे म्हणजे परवा तो बायकोला घेऊन मुंबईत असंख्य ठिकाणी असलेल्या, नावाजलेल्या ‘ कॉफी बाय डी बेला ‘ च्या लिंकिंग रोड वरल्या कॉफी शॉप मध्ये अगदी सहज घेऊन गेला, ते त्याच्या सेक्रेटरीने बघितले आणि नको ते घडले, तिने तडकाफडकी राजीनामा दिला कि…


माझे मात्र या मित्राच्या नेमके उलटे आहे, माझे निरंतर लिखाण, त्यावर जग भरातून होणाऱ्या सततच्या काँट्रावर्सिज, मित्रहो, मनातले सांगतो, दररोजचे तेच ते वाचकांकडून होणारे त्रास, मी कंटाळलोय, आणि मनापासून ठरवलंय, बायकोला घेऊन किमान ८-१० दिवस दूरवर शांत ठिकाणी कुठेतरी जायचे, जेथे फक्त ती आणि मी, खूप खूप मजा करायची, रिलॅक्स व्हायचे त्यामुळे एकतर टेन्शन कमी होईल, थकवा निघून जाईल, पुढल्या लिखाणासाठी फ्रेश वाटेल, आपले मन शरीर अद्याप किती आणि कसे तरुण आहे हेही नेमके लक्षात येईल, ध्यानात येईल, फक्त अद्याप हे ठरलेले नाही कि न्यायचे तर नक्की कोणाच्या बायकोला…


आम्ही ब्राम्हणही चुकतो का, ते नेमके मला आता ब्राम्हणांनीच शक्यतो नक्की सांगायचे आहे, जे प्रश्न मला पाठविल्या गेले त्याआधारेच मी माझ्या जातीतल्या लोकांना विचारतो आहे, त्यांनी त्यावर नेमके उत्तर द्यायचे आहे, त्यातून इतरांचे समाधान होईल असेच सांगायचे आहे…


ब्राम्हणेतर मंडळींचे असे सांगणे म्हणणे आहे कि भारतीय कुत्र्याला, माकडाला, गायीला, बैलाला, सापाला, मुंगीला, वाघाला, सिंहाला, गरुडाला, बकरीला, वडाच्या तुळशीच्या दुर्वांच्या झाडाला, नदी, समुद्र, अग्नी, वायू, जल, मांजर, उंदीर, ससा, कबुतर, चिमणी, आकाश, पाताळ, डोंगर, पृथ्वी, घोडा, कावळा, मोर इत्यादी इत्यादी अनेकांना देव, परमेश्वर मानतात आणि हे आम्ही ब्राम्हणांनी करून सोडले आहे, ज्यांचा देवाशी अर्थाअर्थी अजिबात दूरदूर पर्यंत संबंध नाही ते सारे आम्ही ब्राम्हणांनीच पूजाअर्चेतून किंवा पुराणातून देव करून सोडले आहे थोडक्यात त्यांचे असे म्हणणे आहे कि भोळ्या ब्राम्हणेतर मंडळींकडून पूजेच्या नावाखाली दक्षिणा उकळण्यासाठी आम्ही हे सारे थोतांड उभे केले आहे, आणि हेच आता त्यांना पटवून द्यायचे आहे कि जे केले ते नक्की आम्ही केले आहे का आणि केले असेल तर का केले…


त्यांचे हेही विचारणे आहे कि पर जातीच्या संतांना तुम्ही ब्राम्हणांनीच वेगळ्या पद्धतीची नावे विशेषतः त्यांच्या जातीवरून दिलेली आहेत म्हणजे संताजी तेली, रोहिदास चांभार, गोरा कुंभार, सावता माळी, वाल्मिक कोळी नरहरी सोनार, चोखा महार किंवा नामदेव शिंपी पण त्याचवेळी रामदासांना स्वामी आणि ज्ञानेश्वरांना माउली म्हटले जाते, हेही ब्राम्हणांचेच कारस्थान आहे असे त्यांचे म्हणणे आहे, त्यावर ब्राम्हणांचे काय म्हणणे हे कळले तर बरे होईल कारण माझ्याकडे त्याचे नेमके उत्तर नाही, पुराणावर माझा अभ्यास नाही. थोडक्यात बहुजन समाजातील संत म्हटले कि त्यांच्यापुढे जात लावायची आणि रामदास, ज्ञानेश्वर नेमके कोणत्या जातीचे लपवून ठेवायचे किंवा त्यांचे श्रेष्ठत्व वेगळ्या टोपण नावातून दाखवायचे, असे त्यांचे सांगणे आणि हेच सतत किंवा याच पद्धतीने कायम ब्राम्हणेतर तरुण पिढीवर बिंबवल्या जात असल्याने त्यातून ब्राम्हणांविषयी पद्धतशीर नफरत कशी वाढेल, निर्माण होईल, हे बघितल्या जाते, नेमके हेच मनाला पटत नाही, थेट सांगायचे झाल्यास साडे शहाणंव टक्के मतदार आपल्याकडे खेचण्यासाठी विकृत मनाचे अनेक ब्राम्हणेतर नेते केवळ साडे तीन टक्के असलेल्या निरुपद्रवी ब्राम्हणांना हे असे घालून पडून सतत अपमानित करतात, हेही खरे आहे का, नेमके उत्तर मला ब्राम्हणांकडूनच हवे आहे, नेमकी चूक कोणाची वाचकांना सांगायचे आहे. महत्वाचे म्हणजे देवाच्या नावाने इतरांची लूट करणारे ते ब्राम्हण हा जो जो आरोप ब्राम्हणांवर होतो त्यात अलीकडे अजिबात तथ्य नाही असे माझे म्हणणे आहे, पूजेसाठी भटजी किंवा ब्राम्हण मिळत नाही हि जी बोंब मारल्या जाते त्याचे हेच प्रमुख कारण आहे कि ब्राम्हणांनी भटजीपण जवळपास सोडल्याचा जमा आहे पण त्याचवेळी ब्राम्हणेतर वर्गातून जे बुवा बाबा अलीकडच्या काळात जन्माला आले आहेत तेच ब्राम्हणेतर मंडळींना लुटून लुबाडून मोकळे होताहेत हे हि येथे आवर्जून सांगावेसे वाटते विशेष म्हणजे हे ब्राम्हणेतर बुवा बाबा त्यांच्याच समाजातल्या तरुण स्त्रियांचे लैंगिक शोषण करण्यात देखील आघाडीवर आहेत असेही चित्र जागोजाग दिसते आहे जे अतिशय गंभीर आहे….


थोडक्यात पुराणातल्या मूठभर ब्राम्हणांकडून जर काही चुका घडल्या असतील तर त्या विसरून आपण सारे एक, पद्धतीने सतत या राज्यातल्या मूठभर ब्राम्हणांना पाण्यात फक्त सार्वजनिक पातळीवर पाहणे सोडून द्यावे, वैयक्तिक पातळीवर मात्र आम्हा समस्त ब्राम्हणांना अजिबात कोणत्याही जातीतल्या माणसांचा मानसिक आर्थिक शारीरिक त्रास नाही, ते आमचे मित्र असतात आणि आम्हीच त्यांचे सर्वाधिक जवळचे, अत्यंत जिवलग मित्र असतो, अगदी पुढे जाऊन सांगतो माझे जे अतिशय जिवलग मित्र आहेत ते शंभर टक्के ब्राम्हणेतरच आहेत आणि साऱ्याच ब्राम्हणांचे तेच असते, आमचे जवळचे मित्र फारसे कधी ब्राम्हण नसतात, हो हे मात्र खरे आहे कि आम्ही ब्राम्हण पाकिस्थानी विचारांच्या मुसलमानांची खूप खूप नफरत करीत असतो, देशभक्त किंवा राष्ट्रभक्त मुसलमानांशी मात्र आमची खूप जवळची मैत्री असते, आमच्यातल्या मांसाहारी ब्राम्हणांना या अशा राष्ट्रप्रेमी मुसलमानांकडे जाऊन मटण चिकन खाणे, पर्वणी असते…


हे लिखाण संपविताना, 

आता तो मंत्रालयातला फोटोग्राफर हयात नाही पण त्याच्या बाबतीत घडलेला किस्सा असा, एकदा त्याने त्याच्या बायकोचे काही फोटो काढले आणि कुठल्याशा आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात ठेवले, आश्चर्य म्हणजे पुढल्याच आठवड्यात त्याला परीक्षकांनी उत्कृष्ट ‘ वाईल्ड लाईफ फोटोग्राफर ‘ 

म्हणून घोषित केले…

क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top