महाआघाडीकडून मोठ्ठा धोका महायुतीला मस्त मोका

महाआघाडीकडून मोठ्ठा धोका
महायुतीला मस्त मोका :

महाआघाडीचा प्रचार जोरात आणि जोमात सुरु असतांना अचानक त्यांना कोणती अवदसा आठवली आणि क्षणार्धात त्यांनी स्वतःच्या पायावर अगडबंब धोंडा पाडून घेतला, त्यांच्या त्या एका वाक्याने राज्यातल्या समस्त सामान्य महिला धास्तावल्या आहेत सारेच विद्यार्थी घाबरले आहेत सरकारी नोकर हादरले आहेत कामगार मजूर हंबरडा फोडताहेत शेतकरी हवालदिल झाले आहेत राज्याच्या प्रत्येक भागातले मतदार चिडले आहेत व्यापारी चिंतेत पडले आहेत प्रत्यक्ष महाआघाडीला मानणारे नेते आणि कार्यकर्ते दात ओठ खाताहेत तर महायुतीचे नेते कार्यकर्ते अंगावरचे कपडे फाडून घेताहेत मीडियातले हवालदिल झाले आहेत थोडक्यात असा एकही कोपरा नाही, एकही असे क्षेत्र नाही कि अमुक एखादे क्षेत्र किंवा एखादा व्यक्ती नाही जेथे महाआघाडीच्या नावाने चीड व्यक्त होताना दिसत नाही कारणही अतिशय गंभीर आहे सर्वानाच बुचकळ्यात टाकणारे आहे, महायुती सरकारने घेतलेला प्रत्येक निर्णय महाआघाडी सत्तेवर आल्या आल्या रद्द केल्या जातील हे अगदी जाहीर त्या उद्धव ठाकरे यांनीच सांगून टाकल्याने राज्याच्या कोपऱ्यात अतिप्रचंड खळबळ माजली आहे कारण उघड आहे अस्वस्थ होणे स्वाभाविक आहे कारण महाराष्ट्रातले असे एकही क्षेत्र नाही जेथे महायुती सरकारने सर्वसामान्य लोकांच्या, जनतेच्या भल्याचे निर्णय घेतलेले नाहीत, केवळ महायुतीचा या अशा विकृत पद्धतीने सूड उगवण्यासाठी महाआघाडी अत्यंत घातक निर्णय जर तातडीने घेणार असेल त्यातून फार मोठी सहानुभूती पुन्हा महायुतीलाच मिळेल वरून सर्वसामान्य एका क्षणात रस्त्यावर येतील त्याचे काय?

www.vikrantjoshi.com

गरिबांच्या चिंतामुक्त करणारी लाडकी बहीण योजना महाआघाडी सत्तेत आल्यास बंद करणार आहे हे ऐकून राज्यातले गोरगरीब कुटुंब उद्धव यांच्या या घोषणेनंतर ढसाढसा रडून आकांत करताहेत उर बडवून घेताहेत. महाआघाडी सत्तेत आल्यानंतर लगेच महायुतीने घेतलेले सारेच्या सारे निर्णय क्षणार्धात रद्द करण्यात येतील, जरी हे वक्तव्य उद्धव यांच्या तोंडी जाहीर झालेले असले तरी माझी माहिती अशी कि त्यांच्या खांद्यावर केवळ बंदूक ठेवण्यात आलेली आहे, वास्तवात आधी समस्त घटक पक्षांच्या प्रमुखांनी हा निर्णय कायमस्वरूपी घेण्याचे ठरविले त्यानंतर लगेच हे वाक्य उद्धवजींच्या तोंडून जाहीर करण्यात आले आहे. श्रीमान उद्धव ठाकरेंचा नेमका खोडसाळ हट्टी स्वभाव संपूर्ण राज्याला तोंडपाठ आहे म्हणजे त्यांच्या जे नेमके मनात असते ते करतांना त्यांना फायदा तोट्याची चिंता अजिबात नसते, आठवते का,मुसलमानांना कुर्वाळतांना राज्यातले समस्त मराठी आपल्यावर कायमस्वरूपी रुसतील फुगतील याची थोडीशीही तमा न बाळगता जेव्हा ते मुख्यमंत्री झाले तेव्हापासून त्यांनी अगदी उघड मुसलमानांना कुर्वाळण्यात आनंद मानला आहे किंवा हेच उद्धव मुख्यमंत्री झाली तेव्हा फक्त आणि फक्त फडणवीसांविषयी असलेल्या रागातून असूयेतून त्यांनी मुंबईकरांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय अर्थात मेट्रो प्रकल्प होता पण लोकांच्या मुंबईकरांच्या भावनेला लाथ घालून याच उद्धव यांनी मेट्रोचे काम थांबविले विशेष म्हणजे जर हे उद्धव सत्तेत आणखी पुढे टिकले असते तर त्यांच्या डोक्यात मेट्रो प्रकल्पाला कायमस्वरूपी डब्ब्यात बंद करण्याचे प्रयोजन होते पण देवाला मुंबईकरांची किंव आली असावी त्यानंतर लगेच उद्धव ठाकरे यांचे बऱ्यापकी सत्तेतून वाटोळे झाले…

मै जो बोलता हूं वो मैं करता हूं, हे असे उद्धव यांचे वागणे जर महायुतीला राज्यातल्या सर्वसामान्य जनतेला खड्ड्यात टाकायचे नसेल तर त्यांनी आपापसात वाद न घालता जिद्दीने प्रचाराला लागावे निवडून यावे त्यांना हात जोडून विनंती कारण उद्धव काहीही झाले तरी महायुतीने घेतलेल्या लोकोपयोगी निर्णयांना अगदी शंभर टक्के भीक घालणार नाहीत जरी जनता भिकेला लागली तरी. आता महायुतीने केलेली एक मोठी चूक सांगतो. आजतागायतचा माझा प्रदीर्घ पत्रकारितेतला अनुभव असा कि लोकांना खुश करण्यासाठी निर्णय केवळ जाहीर करायचे असतात प्रत्यक्षात कधीही पूर्णत्वाला न्यायचे नसतात रखडत ठेवायचे असतात म्हणजे आम्ही लोकांसाठी फार झटतो आहे असे केवळ दाखवायचे असते पण महायुतीने नेमके उलट काम केले म्हणजे त्यांनी जे असंख्य अनंत अमापसमाप निर्णय घेतले आश्चर्य म्हणजे त्यांनी घेतलेल्या समस्त निर्णयांची पूर्तता दुप्पट वेगाने केली आता त्याच वेगाने जर हे महायुतीने अमलात आणलेले निर्णय महाआघाडीने तातडीने ठरल्याप्रमाणे रद्द केले तर मला वाटते राज्यातल्या वेड्यांच्या इस्पितळांची संख्या झपाट्याने वाढवावी लागणार आहे कारण लोकांना एका झटक्यात वेड नक्की लागणार आहे. महायुतीला हात जोडून विनंति कि त्यांनी जे जे निर्णय घेऊन त्यांची पूर्तता किंवा अंमलबजावणी केलेली आहे ते ते समस्त निर्णय लोकांना पुन्हा एकवार वाचून दाखवावेत म्हणजे नेमके रद्द केल्या जाणारे निर्णय कोणते हे लोकांच्या लक्षात येईल आणि ते येणाऱ्या संकटाला सामोरे जाण्यासाठी मनाची हिम्मत वाढवतील…

तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top