भाजपाला मौका भी है और धोका भी…

भाजपाला मौका भी है और धोका भी…

श्रीमान विश्वास पाठक भाजपा नेते आहेत त्याशिवाय त्यांना वीज क्षेत्रात प्रचंड अभ्यास आणि अनुभव आहे. ते धडपडे आहेत बडबडे आहेत भाजपाचे उत्तम वक्ते आणि प्रवक्ते आहेत, सध्या ते महाराष्ट्र राज्य वीज सूत्रधारी कंपनीजचे स्वतंत्र संचालक आहेत, वास्तविक राज्याच्या वीज खात्याची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पण देवेन्द्रजी बोट ठेवतील किंवा विरोधक वीज खात्याच्या नावाने बोंबाबोंब करतील बोंबा मारतील अशी एखादी क्षुल्लक चूक देखील आपल्या कार्यकाळात घडू नये एवढे पाठकजी सतत वीज खात्याबाबत सदैव अलर्ट असतात, सावध राहतात. अलीकडे याच विश्वास पाठक यांनी पडत चाललेल्या टकलावर उपाय म्हणून पिटुकल्या केसांचा विग एवढ्या खुबीने चढवला कि त्यांच्या वाढदिवसाला त्यांच्या दोन चाहत्यांनी शुभेच्छा देणारे त्यांचे दोन फोटो टाकले, एक आधीचा आणि एक अलीकडील, दोन्ही फोटोंकडे बघत माझा नातू मला म्हणाला कि आबा, पाठक साहेबांचा आणि त्यांच्या वडिलांचा वाढदिवस एकाच दिवशी असतो का? एवढा प्रचंड बदल केवळ विग घालण्याने होत असेल तर हा बदल नक्कीच सुखावह आहे, नाही म्हणायला पाठक साहेब यादिवसात घरातून बाहेर पडायचा अवकाश, अनेक तरुण बायका त्यांना बघायला गॅलरीत येऊन उभ्या राहतात. गमतीचा भाग सोडा पण याआधीच्या भागात मी जे नेमके सांगितले ते देखील भाजपाने अचानक केलेल्या बदलामुळेच घडले आहे म्हणजे देवेंद्र फडणवीसांऐवजी भाजपाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले आणि बसत चाललेली घडी त्यांच्या श्रेष्ठींनी पूर्णतः विस्कटवून टाकली. शिंदे आणि त्यांची नव्यानेच जन्माला आलेली शिवसेना कुठल्या कुठे निघून गेली, निदान आज तरी तसे चित्र आहे आणि जुनी जाणती भाजपा आज एवढ्या दूर ढकलल्या गेली कि त्यांना आधी लोकसभेला आणि येणाऱ्या विधानसभेला शिंदे सेनेवर अवलंबून राहावे लागणार आहे, विसंबून राहावे लागणार आहे…

www.vikrantjoshi.com

लोकसभेला निदान काहीतरी बरे घडले म्हणण्याची वेळ भाजपावर आलेली आहे म्हणजे लोकसभेला भाजपाच्या वाट्याला 28 जागा आल्या होत्या त्यापैकी केवळ 9 खासदार झाले, शिंदे सेनेला 15 जागा मिळाल्या त्यापैकी त्यांनी जवळपास निम्मे म्हणजे 7 जागांवर विजय मिळविला आणि येथेच एकनाथ शिंदे यांचे महत्व वाढले, ज्यांना भाजपा सहज ताब्यात ठेवून त्यांच्यावर अधिराज्य गाजवेल वाटले होते आज तेच शिंदे एवढे पुढे निघून चालले आहेत कि त्यांच्यापेक्षा उद्धव ठाकरे परवडले असते, असे आता अगदी उघड भाजपातले आपापसात बोलू लागलेले आहेत. लोकसभेला अजित पवार यांना मानणार्या एकही मतदाराने भाजपाला त्यांच्या उमेदवाराला मतदान केले नाही जे नेमके आणि नक्की विधानसभा निवडणुकीत देखील हमखास घडणार आहे. विधान सभा निवडणुका तोंडावर आहेत आणि त्या कशा कोणत्या पद्धतीने जिंकता येतील या चिंतेने भाजपा नेत्यांना ग्रासलेले आहे कारण लोकसभेप्रमाणे आपल्याला सर्वाधिक मोठा धोका फक्त आणि फक्त अजित पवारांच्याच राष्ट्रवादीकडून त्यांना होणार आहे हे भाजपाला नक्की ठाऊक आहे म्हणजे ज्याठिकाणी अजितदादा गटाचे उमेदवार उभे असतील केवळ त्याच जागांवर अगदी शंभर टक्के मतदान त्यांच्या राष्ट्रवादीला फॉर असलेल्या मतदारांकडून होईल जर उभा असलेला उमेदवार भलेही महायुतीचा असेल पण तो जर अजित पवारांच्या गटाचा नसेल तर त्याठिकाणी महायुतीच्या अन्य उमेदवारांना मतदान न करता लोकसभेप्रमाणे यावेळी देखील हे मतदान हमखास शरद पवारांच्या महाआघाडीकडे वळविले जाईल आणि नेमके तेच सत्य असल्याने भाजपा नेते कमालीचे टेन्स आहेत तणावाखाली आहेत. पुढला धक्कादायक प्रकार असा कि पुढल्यावेळीही जर महायुतीला सत्तेत यायचे असेल तर भाजपा एक मोठी रिस्क घेण्याच्या जवळपास पूर्ण तयारीत आहे त्यानुसार भाजपा पेक्षा शिंदे सेनेचे उमेदवार विधानसभेला राज्यात अधिक निवडून येणार असल्याचा गुप्त अहवाल भाजपाला प्राप्त झाला असून केवळ सत्तेत विरोधकांना न येऊ देण्या विधानसभा निवडणुकीत भाजपा पेक्षा अधिक जागा शिंदे सेनेला सोडण्यात येण्याचा जवळपास निर्णय भाजपाचा झाला आहे थोडक्यात ससा कासव कथेप्रमाणे कासव शिंदे ससा भाजपाच्या पुढे निघून गेल्याचे निदान आज तरी तसे चित्र आहे. पुन्हा तेच, भाजपाने आपणहून पुन्हा एक शरद पवार नावाचा तगडा नेता उभा करून भविष्यात नवे आव्हान स्वतःसमोर उभे केले आहे…

तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top