अजितपर्वाची अखेरची धडपड

अजितपर्वाची अखेरची धडपड :

पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचा एक फुल दो माली मधला बलराज सहानी अजितदादांचा अगदी सांगून ठरवून केल्या गेला. एक फुल दो माली चित्रपटातली नायिका साधनाला संजय खान पासून लग्नाआधीच दिवस जातात पण लग्न न झाल्याने तिच्या मुलास बलराज सहानी आपले नाव देतो त्यातून साधनाची बेइज्जती होत नाही, झालेले मूल देखील अनौरस ठरून मोठे होत नाही. केवळ सुनील तटकरे वगळता लोकसभेला इतर एकही उमेदवार त्यांच्या गटाचा किंवा पक्षाचा नव्हता, अमित शाह यांनी ज्यांची नावे पुढे केली त्यांनाच दादांनी उमेदवारी दिली, बलराज सहानी पद्धतीने आपल्या पक्षाचे नाव उमेदवारी व चिन्ह दिले. आता कायमची नेमकी वेळ निघून गेली आहे, आज नांगी टाकून जी कसरत अजितदादांना त्या अमित शाह यांच्यासमोर करावी लागते आहे, म्हणजे अमित शाह यादिवसात जर अजितदादांना उठ म्हणाले तर दादा पुढल्या क्षणी उठून जागच्या जागी उड्या मारायला लागतात, समजा जरा चार पावले फिरून या म्हणाले तर अजितदादा लगेच धावायला लागतात, चेहऱ्यावर हास्य हवे म्हणाले तर लगेचच मोठमोठ्याने हसायला लागतात आणि हीच त्यांची नेमकी चुकलेली भूमिका म्हणजे आज ते ज्या पद्धतीने अमित शहांच्या सांगण्याला लगेचच होकारार्थी मान जोरजोरात हलवायला लागतात तेच जर त्यांचे वागणे काका शरद पवारांच्या बाबतीत होकारार्थी ठरले असते तर ही दीनवाणी केविलवाणी त्यांची अवस्था कधीही झाली नसती पण मुलांना घडविण्यात जसे त्यांनी सुनेत्रा वहिनींचे सांगणे न ऐकता सतत बाहेर भटकण्यात भरकटण्यात जसे ते आकंठ बुडाले आणि व्यक्तिगत नुकसान करवून घेतले नेमके त्यांचे काकांच्या बाबतीत देखील अगदी सुरुवातीपासून चुकत गेले त्यांनी सत्तेच्या त्यातून मिळालेल्या अमाप संपत्तीच्या मस्तीत प्रसंगी अत्यंत क्रूर आणि शूर भूमिका घेणाऱ्या काकांना कायम मुर्खात काढले अंडरएस्टिमेट केले म्हणूनच अजित पवारांवर आजचे संकट ओढवले. अजित तू सतत सत्तेतून व्यक्तिगत मोहाचा विचार करू नको, एक दिवस तुला मोठी किंमत त्यातून मोजावी लागू शकते, काकांचा हा उपदेश एकेकाळी अजितदादांनी हसण्यावारी नेला आणि काकांना फसविणार्या दादांचा पाय घाणीत रुतला, फसला…

www.vikrantjoshi.com

जेव्हा मी आणि शरद पवार एकत्र बसून गप्पा मारत असू तेव्हा विचित्र लेंगा झब्बा घालून अजितदादा कोपऱ्यात उभे असायचे तेव्हापासून मी त्यांना ओळखतो, त्यातून त्यांना आता अतिशय मोलाचा महत्वाचा सल्ला असा कि निदान यापुढे तरी जे काकांच्या बाबतीत तुमच्या हातून घडले ती भूमिका तुमच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांच्या आणि ज्यांनी तुम्हाला जवळ घेतले आहे त्या अमित शहांच्या बाबतीत चुकूनही घेऊ नका, अन्यथा तुमचीही अवस्था लांडगा आला रे आला कथेतल्या शरदकाकांसारखीच नक्की होईल, काका जे बोलतात त्याविरुद्ध ते वागतात, हा जर शिक्का तुमच्यवर बसला तर मात्र तुमचाही राजकारणातला सुरेशदादा जैन होईल, आज ते जसे अज्ञातवासात गेले ते तसेच घडेल, तुम्ही मैत्री आणि लॉयल्टी टिकवून धरा, तुमचा मित्र फडणवीस दिलेल्या शब्दाला जागणारा आहे तो तुम्हाला कधीही राजकारणातून भरकटू देणार नाही. पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे सरस ठरले आणि अजित पवारांचा राजकीय विचका आणि पचका झाला असे अजिबात नाही याउलट जर त्यांनी एकनाथ शिंदे पद्धतीची एकांगी भूमिका घेत जेथे तटकरे पद्धतिने सहज विजय शक्य आहे असे आपले उमेदवार उभे केले असते तर चित्र नक्की वेगळे उभे राहिले असते पण अजितदादा बदलले आहेत असे दिसतेय कारण ज्या उमेदवारांशी त्यांच्या राष्ट्रवादीचा दूरदूरपर्यंत संबंध नव्हता किंवा अमुक एखादा उमेदवार काही केल्या विजयी होणे नाही हे त्यांना शंभर टक्के माहित असूनही त्यांनी केवळ भाजपा श्रेष्ठींच्या सांगण्यावरून तटकरे वगळता इतर सारे उमेदवार उभे केले म्हणजे सुप्रिया सुळे यांच्यासमोर सुनेत्रावहीनी काहीही केल्या टिकणार नाहीत हे त्यांना पक्के ठाऊक असतांना देखील त्यांनी हा भाजपा प्रयोग राबविला किंवा पराभूत शिवाजीराव अढळराव पाटील आणि दादांमध्ये कधीही साधा विस्तव देखील जात नसतांना भाजपा श्रेष्ठींनी सांगितले आणि एकनाथांच्या या उमेदवाराला दादांनी घट्ट मिठीत घेत पराभवाचे कुंकू माथी मारून घेतले….

तिकडे परभणीत तर त्यांची अवस्था गाव करून गेले आणि गावातल्या गरीबाच्या झोळीत अनौरस पोर टाकले अशी झाली कारण भाजपच्या मित्रपक्षाचे उमेदवार महादेव जानकर असेच दादांच्या झोळीत टाकल्या गेले वरून दादाच गावातल्या संबंध नसलेल्या एखाद्या गरिबासारखे विनाकारण बदनाम झाले. अलीकडे ज्यांच्याशी विळ्याभोपळ्याचे संबंध होते त्या भाजपा आमदार राणा जगजितसिंग यांच्या पत्नी अर्चना पाटील या पराभूत उमेदवार देखील दादांच्या राष्ट्रवादीतून उभ्या राहिल्या आणि बदनामीचा शिक्का दादांच्या माथी मारल्या गेला जणू अजितदादांचा लीना चंदावरकर झाला म्हणजे आज लग्न आणि दुसऱ्याच दिवशी ऐन मधुचंद्राच्या रात्री नवरा मेला. केवळ सुनील तटकरे खऱ्या अर्थाने दादांची लव्हर होती, सुरुवारीपासूनच जिवलग मित्र होता सच्चा साथीदार होता पक्का कार्यकर्ता होता विश्वासू पाठीराखा होता गमत्या सखा होता नेमका दादांच्या राष्ट्रवादीचा उमेदवार होता जो थेट आव्हान देत एकाचवेळी अनेकांना अंगावर घेत थेट उद्धव ठाकरेंना पराभूत करून आधीपेक्षा कितीतरी अधिक मतांनी निवडून आला. जे तटकरे 2019 च्या मोदी लाटेत भाजपा शिवसेना युती विरोधात त्यावेळी 32 हजार मतांनी निवडून आले होते यावेळी तर याच दादांच्या सुनील तटकरे यांनी भाजपा महायुती पाण्यात गटांगळ्या खात असतांना 82 हजार मताधिक्याने ते निवडून आले म्हणजे जे कुंकू खऱ्या अर्थाने अजित दादांच्या नावाने लावल्या गेले होते तेच काश्मीरला हनिमूनसाठी निघून गेले इतरांच्या गोवऱ्या मसणात गेल्या. अजितदादा अद्याप तुमचा म्हातारा गब्बर सिंग नक्की झालेला नाही पण यापुढे उगाच नेहमीचा अति आत्मविश्वास नको म्हणजे भाजपाचा देखील काका करू नका, बाजू तुमच्यावरच उलटेल. एखादा पहेलवान जसा मधुचंद्राच्या राती पुढल्या पाचच मिनिटात ढाराढूर झोपी जातो तुमचे हे असे पहेलवानासारखे राजकारणात व्हायला नको…

अपूर्ण : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top