संघ स्वप्न : हिंदू राष्ट्र

संघ स्वप्न : हिंदू राष्ट्र :

भारतीय जनता पक्ष, देशातला एकमेव हा पक्ष ज्या पक्षात दोन भिन्न विचारसरणीचे नेते व कार्यकर्ते सामावलेले आहेत. पहिले रा स्व संघाच्या मुशीतून तयार झालेले जन्माला आलेले अतिशय कट्टर हिंदू विचारांचे नेते व कार्यकर्ते दुसरे ज्यांचा संघाशी दूरदूरपर्यंत संबंध नाही किंवा भविष्यातही ज्यांना संघ स्वयंसेवक व्हायचे नाही असे एकतर अतिशय प्रोफेशनल नेते किंवा नरेंद्र मोदी यांच्या विचारांवर कार्यपद्धतीवर प्रभावित होऊन भाजपावसी झालेले नेते, तयातल्या अनेकांना कट्टर हिंदुत्व देखील मान्य नसते. याठिकाणी आपल्याला राष्ट्राचा नव्हे तर केवळ महाराष्ट्राचा विचार करायचा आहे, कारण बाहेरच्या मंडळींमुळे मूळ संघ भाजपातले अस्वस्थ आहेत आणि ते ऐन निवडणुकीत बाहेरच्या उमेदवारांना मतदान करतांना मोठा दगा फटका करू शकतात, अशी कुजबुज जाणूनबुजून विशेषतः शरद पवार समर्थकांकडून मोठ्या प्रमाणात पसरविण्यात येते आहे त्यावर येथे तुम्हाला नेमकी वस्तुस्थिती सांगायची आहे…

www.vikrantjoshi.com

निमित्त होते माधव भंडारी यांच्या मुलाने अलीकडे जाहीर पत्रातून जी अस्वस्थता प्रकट केली, नेमका हा धागा पकडत संघ भाजपातले ओरिजनल यादिवसात कसे अस्वस्थ आहेत नाराज आहेत निराश झालेले आहेत, या अपप्रचाराला मुद्दाम खतपाणी घालण्यात येते आहे, आले आहे पण वस्तुस्थिती नक्की वेगळी आहे. फारतर जे बाहेरून भाजपा किंवा महायुतीमध्ये अलीकडे सामील झाले आहेत कदाचित ते काही न मिळाल्याने नक्की थोड्याफार प्रमाणात अस्वस्थ असू शकतात पण त्यांच्याही अस्वस्थतेचा फटका लगेच येणाऱ्या दोन महत्वाच्या निवडणुकात राज्यातल्या महायुतीला विशेषतः भाजपाला बसेल असे अजिबात घडणारे नाही. किंबहुना मोदी यांच्यासमोर दगाफटका करण्याची हिम्मत एकातही नाही. भाजप आणि संघाचे कट्टर माधव भंडारी यांच्या विविध महत्वाकांक्षा आधीपासूनच अजिबात लपून राहिलेल्या नाहीत त्यातून त्यांनी राज्याचे ज्युनिअर प्रमोद महाजन होण्यासाठी मोठी धडपडही केली पण त्यांचा हा डाव हाणून पाडल्या गेला, ज्याची कल्पना मी स्वतः भंडारी यांना दिलेली होती, पुढे सत्तेसाठी काहीसे आक्रमक झालेले भंडारी बऱ्यापैकी वरकरणी शांत झालेले दिसले तरी मनातली अस्वस्थता कायम होती, जी अलीकडे त्या पत्रातून व्यक्त झाली. सत्तेशिवाय आमदारकीशिवाय इतरही अनेक बाबी असतात ज्याची पूर्तता मोठ्या खुबीने भंडारी यांनी करवून घेतलेली आहे ज्याकडे फडणवीसांनी मुद्दाम कानाडोळा केला आहे, भाजपामध्ये देखील झपाट्याने साऱ्यांनीच फाटके नेसावे गरीब असावे हा विचार केव्हाच मागे पडला आहे त्यातूनच गडकरी पद्धतीचे नवश्रीमंत तेथेही जागोजाग नक्की पाहायला मिळतात, मर्यादा न ओलांडता जर स्वतःचे भले करून घेतले म्हणजे स्वतःचा आर्थिक भानगडीत एकनाथ खडसे न करवून घेता तुम्हाला काही करता आले तर येथेही आता फारशी हरकत नसते त्यामुळेच तुम्हाला शिंदे यांच्या मंत्रिमंडळातले जे ओरिजनल भाजपा संघ विचारसरणीचे त्या संस्कारतून आलेले मंत्री आहेत, आमदार आहेत ते कधीही फार मोठ्या आर्थिक मर्यादा ओलांडतांना दिसणार नाहीत, मर्यादा ओलांडल्या तर मोठ्या खुबीने त्यांचा एकनाथ खडसे करण्यात येतो कारण तेथे आजही शिस्त अतिशय महत्वाची आहे. महत्वाचे म्हणजे भंडारी यांना त्यांच्या राजकीय निवृत्तीआधी नक्कीच त्यांच्या मनातले घडवून आणल्या जाणार आहे…

एखादा दुसरा अपवाद असू शकतो पण संघ भाजपामध्ये बाहेरचे आल्याने किंवा सध्याच्या महायुतीमुळे अस्वस्थता आहे नाराजी आहे नैराश्य आलेले आहे असे चित्र दूरदूरपर्यंत नक्कीच पाहायला मिळत नाही आणि मिळणार देखील नाही कारण हिंदुराष्ट्र करण्यासाठी समस्त हिंदू मोदी किंवा फडणवीसांच्या नेतृत्वाखाली एकत्र येणे गरजेचे आहे हे संघवाल्यांना नेमके व नक्की ठाऊक आहे, अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे इतर विविध अनेक देशांची ओळख तेथील संख्यने मोठ्या असलेल्या समाजावरून जशी होते म्हणजे जगात जसे मुस्लिम ख्रिश्चन बौद्ध राष्ट्र आहेत त्याच पद्धतीने पुढल्या काही वर्षात भारत हे हिंदू राष्ट्र म्हणून नक्की घोषित करण्यात येईल अशी माझी माहिती आहे किंबहुना त्यादृष्टीने स्वतः नरेंद्र मोदी यांनी जगातल्या मान्यवरांची त्यापद्धतीने मानसिकता बदलवायला सुरुवात केलेली आहे. बघा, रा स्व संघाने जे स्वप्न थेट शंभर वर्षांपूर्वी संघाची स्थापना करून बघितले होते ते आता प्रत्यक्षात नक्की उतरणार असल्याने मूळ जो उत्तम विचारांचा संघ स्वयंसेवक किंवा भाजप कार्यकर्ता असतो तो आपल्या तत्वांशी प्रामाणिक असतो, अमुक एखादे पद किंवा पैसा त्याच्यासाठी कधीही महत्वाचा नसतो. हिंदुत्वाचा विचार रुजवितांना जे पुरिगामी विचारवंत हिंदू नसणाऱ्यांची माथी दरदिवशी भडकावून देण्यात स्वतःला धन्य समजतात, आधी त्यांचा बंदोबस्त करणे हेही संघ भाजपा मंडळींचे गुप्त कार्य विचारात घेण्यासारखे आहे कारण केवळ एका रात्रीतून हिंदू राष्ट्राची हि संकल्पना प्रत्यक्षात उतरलेली नाही त्यासाठी गेल्या शंभर वर्षात अनेक संघ भाजपावाल्याच्या घरांची राखरांगोळी झालेली आहे. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हा विचार रुजवत असतांना येथे जे असंख्य वेगळ्या धर्माचे वास्तव्याला आहेत त्यांच्या हक्कांना त्यांच्या अस्तित्वाला बाधा येणार नाही धक्का पोहोचणार नाही याची काळजी घ्यावी हा विचार संघ विचार मंथनातून त्यांच्या स्वयंसेवकांना मुद्दाम पटवून सांगितल्या जातो हे विशेष. थोडक्यात बदललेल्या परिस्थितीत हिंदू राष्ट्राला पोषक असे वातावरण असतांना अगदी आपल्या या राज्यात केवळ काही मिळत नाही किंवा सत्तेत वाटा नाही म्हणून अस्वस्थ होणारा संघ स्वयंसेवक किंवा ओरिजनल भाजपा कार्यकर्ता तुम्हाला कधीच आढळणार नाही….

तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top