तावडे पुढे जातील बावनकुळे आमदार होतील…

तावडे पुढे जातील बावनकुळे आमदार होतील…

-पत्रकार हेमंत जोशी

जे आम्हाला अगदी जवळून ओळखतात त्यांना आमच्याविषयी नेमके माहित असते जे आम्हाला ओळखत नाहीत त्यांच्या मनात आमच्याविषयी अनेक गैरसमज असतात, वास्तविक कट्टर हिंदुत्व आणि भ्रष्टाचारी व माजोरड्या यंत्रणेविरुद्ध थेट लढा हा आमच्या लिखाणाचा मुख्य उद्देश असतो आहे काहींना उगाचच वाटते किंवा वाटत राहते कि आम्ही संघ किंवा भाजपावाले आहोत नाही आम्ही केवळ कट्टर हिंदू आहोत, खोटे वाटत असल्यास राज्यातल्या मान्यवर भाजपा नेत्यांना आमच्या विषयीचे मत विचारा मग ते माधव भंडारी असतील किंवा केशव उपाध्ये किंवा विनोद तावडे असतील अथवा गणेश हाके किंवा थेट चंद्रकांत पाटील असतील किंवा पंकजा मुंडे किंवा नितीन गडकरी असतील अथवा गिरीश महाजन असे कितीतरी, बोला त्यांच्याशी काढा माझा विषय, मला खात्री आहे थेट भाजप नेते देखील आमच्या माझ्या विषयी यासाठी फारसे चांगले बोलणार नाहीत कारण जेथे हे असे नेते चुकले त्यांना एकतर लिखाणातून आम्ही ठोकले आहे किंवा प्रत्यक्ष जाऊन त्यांची अनेकदा कान उघडणी केली आहे कि असे चुकीचे वागणे योग्य नाही ज्यातून तुमची लीडरशिप अडचणीत येऊ शकते नेमके तसे घडते तेव्हा माझे सांगणे किंवा लिहिणे त्यांना मनापासून पटते किंवा पटत असावे. नेमक्या काय व कोणत्या चुका झाल्या त्यावर येथे मला उहापोह करायचा नाही किंवा ते गुपित यासाठी उघड करायचे नाही कारण नागपूरचे चंद्रशेखर बावनकुळे हे उत्तम नेते आहेत चांगले लोकनेते आहेत पण तेही चुकले आणि त्यांना विधान सभेचे जेव्हा तिकीट तेही थेट अमित शाह यांनी नाकारले तेव्हा बावनकुळे मनातून अतिशय अस्वस्थ झाले होते, नको नको ते विचार जेव्हा त्यांच्या मनात येत होते तेव्हा मी त्यांना एवढेच सांगितले कि कोणतीही खडसे छाप बंडखोरीची भाषा किंवा शब्द तोंडातून न काढता अगदी दुसरे दिवसापासून पक्ष बांधणीला विदर्भातून सुरुवात करा त्यांना माझे सांगणे पटले असावे बावनकुळे यांनी विधान सभा निवडणुकीत संपूर्ण विदर्भात मोलाची कामगिरी पार पाडली पक्षाला यश मिळवून दिले आणि बघता बघता पाहता पाहता नेता मग तो भाजपामधला कोणीही असो त्या प्रत्येकाच्या गळ्यातले बावनकुळे ताईत बनले, साऱ्यांचे लाडके झाले, आणि त्यांना भाजपाने नागपुरातून विधान परिषदेची उमेदवारी जाहीर केली आहे. लोकप्रिय लोकमान्य नेते चंद्रशेखर बावनकुळे नक्की निवडून येतील विधान परिषदेवर आमदार होतील आणि आधीपेक्षा आणखी कितीतरी पटींनी ते मोठे नेते म्हणून राज्य गाजवून सोडतील….

माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचेही तेच, प्रचंड ताकदीचा नेता पण मंत्री झाल्या झाल्या शार्दूल सारख्या फसव्या बदमाश बदनाम मित्रांच्या नादी लागून तावडे नको नको त्या भानगडीत अडकले आणि एवढे नाव गमावून बसले कि त्यांना आपले मंत्रिपद गमवावे लागले ज्याचा प्रचंड फायदा एकेकाळच्या तयाच्या मेहनती चतुर डॅशिंग शिष्याला झाला, आशिष शेलार विनोद तावडे यांच्या पुढे निघून गेले आणि मंत्री देखील झाले. चुका झाल्या चुका केल्या पण त्या तावडे याच्या लक्षात आल्या असाव्यात त्यातून अनुभवी बुजुर्ग विनोद तावडे बरेचकाही शिकले आणि सावध देखील झाले. अत्यंत महत्वाचे म्हणजे त्यांचा देखील संधी असूनही म्हणजे थेट शरद पवार त्यांना खुणेने बोलवत असतांना देखील तावडे यांचा एकनाथ खडसे झाला नाही म्हटल्यापेक्षा त्यांनी स्वतःचा एकनाथ खडसे होऊ दिला नाही, ना त्यांनी कधी भाजपा सोडण्याची भाषा केली ना तावडे यांनी बंडखोरीची भाषा वापरली विशेष म्हणजे त्यांनी साध्या शब्दातून देखील कधीही देवेंद्र फडणवीस यांना अपमानित केले नाही किंवा त्यांची कुठेही निंदानालस्ती केली नाही याउलट आपण नेमके कुठे चुकलो कोणत्या वाईट सवयीमध्ये अडकून बदनाम झालो त्यावर तावडे यांनी नक्की आत्मचिंतन केले असावे कारण संघटना उभी करण्यात वाक्बगार तर ते अगदी विद्यार्थी दशेपासून होतेच त्यामुळे विनोद तावडे यांची शांत राहण्याची भूमिका राज्यातल्या आणि दिल्लीतल्या त्यांच्या नेत्यांना मनापासून भावली आणि तावडे यांना अनपेक्षित खूप मोठे बक्षीस अगदी अलीकडे त्यांच्या पक्षाने दिले तावडे यांना थेट प्रमोद महाजन यांची जागा दिली त्यांना पक्षाचे सरचिटणीस म्हणून नेमण्यात आले. जे घडले आधी ते निश्चित वाईट होते पण यापुढे पुन्हा एकदा विनोद तावडे उफाळून वर येतील आणि जगात देशात राज्याचे व स्वतःचे नाव गाजवुन मोकळे होतील. त्यांना मनापासून शुभेच्छा !!

तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top