राजकीय लबाडी लाथाडी आणि घडामोडी : पत्रकार हेमंत जोशी

राजकीय लबाडी लाथाडी आणि घडामोडी : पत्रकार हेमंत जोशी

आयुष्यात अमुक एखाद्याकडून असे काही घडेल अपेक्षितच नसते म्हणजे जयंत पाटील खिशात हात घालतील, दिलखुलास मनमोकळे मनातले एखाद्याशी बोलतील मनापासून हसून दाद देतील वगैरे त्यामुळे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची कामगिरी शून्य, जे काय दुकान जोरात सुरु आहे ते फक्त आणि फक्त शरद पवार यांच्या हिमतीवर ताकदीवर आणि भरवशावर, पवार एकदा का निवृत्त झाले कि पुढल्या काही महिन्यात राष्ट्रवादीच्या निवृत्तीची पण शंभर टक्के बातमी कानावर पडेल. राजकारणात काहीही घडू शकते, एकेकाळी काँग्रेस म्हणजे जीव कि प्राण असलेल्या कृपाशंकर सिंह यांनी भाजपाचा झेंडा हाती धरल्याचे आपल्याला बघावे लागेल स्वप्नांतही वाटले नव्हते पण राजकारणात काहीही घडू शकते अगदी उद्या अनंत गाडगीळ काळी टोपी घालून संघ स्थानावर बौद्धिक ऐकतांना बघण्याची वेळ तुमच्यावर येऊ शकते. भारतीय इतिहास कोणत्याही नेत्याचा फारसा कधी चांगला नसतो हि वस्तुस्थिती आहे त्यामुळे ज्यांनी काल कृपाशंकर सिंह यांना कांदे बटाटे विकतांना बघितले ते आज कोट्याधीश हे राजकारणात किंवा भारतातील प्रत्येक प्रांतात क्षेत्रात अजिबात नवीन नाही बहुतांश नेते गरिबीतून वर आले आहेत पण जे मोठे झाले तरीही अजिबात बदलले नाहीत त्यांचे नक्की कौतुक व्हावे त्यातलेच एक कृपाशंकर सिंह, नेत्यांच्या बॅग्स उचलणारा म्हणून खिजविल्या जाणारा कृपा ते आजचा मुंबईतला मोठा नेता कृपा, स्वभावात त्याच्या काहीही बदल झालेला नाही, तसाच पूर्वीसारखा बोलका हसरा आणि भेटला कि मनसोक्त गप्पा मारणारा दिलखुलास दाद देणारा हा नेता. दिनांक ७ जुलै हा दिवस अनेक अर्थांनी माझ्या सभोवताली बदल घडविणारा ठरला. माझ्या घराखाली उजवीकडे वळले कि जुहू कब्रस्थान आहे तेथे सकाळीच कसली लगबग आहे म्हणून विचारले तर दिलीपकुमार गेल्याचे कानावर पडले. त्याच्या अभिनयाची नक्कल करून अमिताभ पासून तर आजच्या शाहरुख खान पर्यंत कितीतरी मोठे झाले त्यामुळे सिनेमातले ऋषितुल्य व्यक्तिमत्व गेल्याने मन उदास झाले मनापासून वाईट वाटले. फिरून घरी आलो आणि कानावर पडले कि जुहू चौपाटीवर ज्यांच्यासंगे सकाळी आपण फिरतो त्या दोन्ही नेत्यांची आजची सकाळ आनंददायी ठरणारी आहे म्हणजे नारायण राणे केंद्रात मंत्री होणार असल्याचे कळले तर कृपाशंकर सिंह हे भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचेही कानावर पडले.

अलीकडे कोरोना त्यामुळे चौपाटीवर फारसे जाणे होत नाही अन्यथा राणे साहेब आणि कृपाजी दोघेही भेटायचे बोलायचे मन मोकळे करायचे. वास्तविक कृपाशंक सिंह हे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात जे उत्तर प्रदेशातले लाखो कुटुंब वसलेले आहेत त्या सर्वांचे अत्यंत लाडके नेते म्हणजे या मंडळींमध्ये गेली अनेक वर्षे एवढा लोकप्रिय नेता मी अदयाप बघितलेला नाही विशेष म्हणजे मुंबईत विशेषतः पश्चिम उपनगरातील झोपड्पट्टीतही कृपा यांना नेता म्हणून चांगली मान्यता आहे त्यांना मुस्लिम मोहोल्ल्यातूनही लोकमान्यता आहे वास्तविक काँग्रेसने त्यांच्याकडे अलीकडे दुर्लक्ष करायला नको होते कारण कृपा हा मास लीडर आहे कायम सामान्य लोकांमध्ये मिळून मिसळून वागणारा आणि शक्य असेल तेवढी सर्वांना सर्वोतपरी मदत करणारा कष्टाळू मनमोकळा येथल्या मातीत मिसळून गेलेला मराठी बोलणारा थोडक्यात सर्वांना हवाहवासा वाटणारा नेता आहे जर कृपाजी लाडक्या लेकाच्या प्रेमात अधिक राहून मध्यन्तरी अधिक आर्थिक दृष्ट्या घसरले नसते तर एव्हाना आणखी पुढे नक्की गेले असते यापुढे मात्र त्यांनी मागच्या चुका पुन्हा करू नयेत असे मनापासून त्यांना सांगावेसे वाटते. आगामी महापालिका निवडणुकीत आणि ठाणे व मुंबई जिल्ह्यात भाजपा अमराठी व अति सामान्य मतदारांमध्ये बळकट करण्यासाठी कृपाशंकर भाजपाला मोठे उपयोगी ठरणार आहेत. काँग्रेसने दुर्लक्ष केल्यानंतर तसेही त्यांची भाजपा प्रवेशाची बातमी अनेक दिवसांपासून कानावर पडत होती, ७ जुलैला बातमी खरी ठरली. काँग्रेस जोशात असतांना जे कधीही शक्य वाटते नव्हते ते भाजपाने करून दाखवले, काँग्रेसचे कितीतरी दिग्गज भाजपामध्ये येऊन स्थिरावले…

क्रमश: हेमंत जोशी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top