आधी नागडे केले नंतर जखमा करून मीठ चोळले

आधी नागडे केले नंतर जखमा करून मीठ चोळले :

राज्यातल्या जवळपास समस्त भाजपा विरोधकांना भाजपाने आधी नागडे केले नंतर जखमा केल्या, जखमांवर डागण्या दिल्या वरून मीठही चोळले, सिनेमातल्या खलनायकाला सरतेशेवटी हिरो जसा कष्टदायक क्लेशदायक क्लेशकारक यातनामय पद्धतीने छळून त्याचा अंत घडवून आणतो खात्मा करतो त्या आणि या प्रकारात काहीही कोठेही फरक आहे, वाटत नाही. यादिवसात राज्यातली भाजपा म्हणजे सिनेमातला धर्मेंद्र, एक एक को चुन चुन के मारुंगा, पद्धतीने प्रत्यक्ष कृतीत घडलेले म्हणाल तर हे आधुनिक महाभारत. अशोकराव चव्हाण हे एकेकाळचे किंवा आजचे आजतागायतचे काँग्रेसचे राज्यातले सर्वाधिक लोकप्रिय आणि यशस्वी ठरलेले सदासर्वकाळ महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांना नेत्यांना सर्वाधिक भावलेले अत्यंत आवडणारे, कुठेही कंजुषी न करता त्यांच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना सढळ हाताने सहकार्य मदत कारणारे असे एकेकाळचे प्रदेशाध्यक्ष थोडक्यात त्यांना गेल्या काही वर्षांपासून काँग्रेसने संघटनेपासून काहीसे बाजूला सारले त्यामुळेच राज्यातली काँग्रेस विशेषतः नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली कमकुवत होत गेली, आता तर अशोक चव्हाण यांच्या काँग्रेस सोडण्याने आधीच खंगलेली राज्यातली काँग्रेस यापुढे आणखी आणखी नक्की आणि निश्चित खंगत जाईल ज्याचा फार मोठा फटका काँग्रेसला बसन्सर आहे. अत्यंत ओपिनीय माहिती अशी कि आजतागायत भाजपामध्ये आपला नेता म्हणून ज्याच्यावर विश्वास टाकावा असा कुठलाही कोणताही नेता काँग्रेसमधून भाजपामध्ये आलेला नव्हता किंबहुना फार मोठ्या प्रमाणावर शिवसेना किंवा राष्ट्रवादी जशी फुटून भाजपामध्ये सामील झाली होती तो रिस्पॉन्स विशेषतः राज्याच्या काँग्रेस नेत्यांकडून भाजपाला मिळत नव्हता जे यश आता अशोक चव्हाणांच्या येण्याने त्यांना मिळणार आहे, पुढल्या काहीच दिवसात अनेक असंख्य नेते आणि कार्यकार्ते काँग्रेसमधून फुटून मोठ्या प्रमाणावर भाजपामध्ये दाखल होणार आहेत, काँग्रेस विरहित राष्ट्र हि जी मोदी यांची संकल्पना आहे स्वप्न आहे त्याची सुरुवात आपल्या या राज्यातून झालेली आहे, केवळ काँग्रेस नव्हे तर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला ज्या पद्धतीने मोठे खिंडार पाडल्या गेले त्यामुळे महाराष्ट्र केवळ काँग्रेस विरहित नव्हे तर ओरिजनल शिवसेना आणि राष्ट्रवादी विरहित झाले आहे आणि याचे मोठे श्रेय केवळ देवेंद्र फडणवीसांच्या राजकीय रणनीतीला मेहनतीला देणे अत्यावश्यक ठरते…

www.vikrantjoshi.com

एकदाचे अशोक चव्हाण भाजपवासी झाले, शंभर वेळा डोळे मारून देखील एखाद्या मुलीने प्रेमाला प्रत्येक वेळी नकार द्यावा खूप प्रयत्नानंतर होकार द्यावा तसे अशोक चव्हाण यांचे त्या फडणवीसांच्या बाबतीत प्रत्येक वेळी घडले, वास्तविक अशोकराव आणि देवेन्द्रजी जेव्हा चव्हाण सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री होते म्हणजे ते सत्तेत आणि फडणवीस विरोधात होते तेव्हाचे नारायण दाभोलकर मार्गावर राहणारे हे एकमेकांचे सख्खे शेजारी एकमेकांच्या खोलवर प्रेमात होते विशेष म्हणजे जेव्हा चव्हाण फडणवीसांच्या बंगल्यात भिंतीवरून उडी मारायचे तेव्हाचे त्यांचे खाजगी सचिव निशिकांत देशपांडे देखील चव्हाण सोबतीने उडी घ्यायचे कानी फडणवीस जेव्हा वेषांतर करून चव्हाणांच्या बंगल्यात खास मराठवाडा बेत फस्त करायचे तेव्हा त्यांचे पीए सुमित वानखडे हे अब्दुला बनून फडणवीसांची सोबत करायचे थोडक्यात तेव्हाच पासून या दोघांच्या आपापसातले प्रीतीचे धागे घट्ट जुळले होते त्यामुळे फडणवीस सत्तेत आल्यानंतर एकनाथ शिंदे आणि अजित दादा यांच्या कितीतरी आधी चव्हाण हे भाजपावसी होतील अशी दाट शक्यता होती पण केवळ एकट्याने भाजपात येऊ नये असे चव्हाणांनी फडणवीस व त्यांच्या श्रेष्ठींना सांगितले होते, मला नेमके महत्वाचे नेते घेऊन तुमच्याकडे नक्की यायचे आहे हेही त्यांनी सांगून ठेवले असल्याने जुळवाजुळव करता करता त्यांना काहीसा विलंब झाला पण त्यांची हि भूमिका फडणवीस आणि शाह याना मनापासून भावली होती त्याचे फार मोठे बक्षीस सत्तेच्या रूपात चव्हाणांना मिळणार आहे. आणि पक्षांतराची हि तर सुरुवात आहे, आमदार राजू आवळे असतील किंवा माजी राज्यमंत्री डी पी सावंत, प्रणिती शिंदे, आमदार कुणाल पाटील, विश्व्जीत कदम, असलम शेख, संजय दत्त, संजय निरुपम, भाई जगताप, बसवराज पाटील अशा कित्येक काँग्रेसच्या राज्यातल्या विविध नामवंत नेत्यांची त्यांच्या कार्यकर्त्यांसहित पक्षांतर करण्यात मोठी रांग लागलेली तुम्हाला पाहावयास मिळणार आहे. मराठे आणि मराठवाडा, दोन्ही आपलेसे करण्यात भाजपाने मोठी बाजी जिंकलेली आहे. अत्यंत महत्वाचे म्हणजे अशोक चव्हाण यांच्या भाजपा प्रवेशाने त्यांचा एक मोठा व्यक्तिगत प्रश्न धसास लागला आहे, पुढल्या काही दिवसात दिवंगत शंकरराव चव्हाण यांची लाडकी नातं श्रीजया राज्याच्या मंत्रिमंडळात सामील झालेली असेल. पुढल्या काही दिवसात मराठवाड्यातले जवळपास नऊ ते दहा आजी माजी आमदार किंवा मंत्री याशिवाय राज्याच्या इतरही भागातून शिवाजीराव मोघे पद्धतीचे काँग्रेसमधले प्रभावी नेते भाजपात नक्की येणार आहेत, राज्यातल्या काँग्रेसची दयनीय अवस्था नेमकी आणि नक्की अस्वस्थ करून सोडणारी ठरणार आहे…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top