आमची बँक २ : पत्रकार हेमन्त जोशी

आमची बँक २ : पत्रकार हेमन्त जोशी 

मे महिन्यातली दुपार, व्याजाने घेतलेले पैसे परत करायचे म्हणून जोशीकाका कसेबसे चालत चालत शंकरशेटच्या घरी आले होते, घामाघूम जोशीकाकांना शेटजींचा मुलगा मोहन तांब्या आणि पेला पुढे ठेवत म्हणाला, आधी तेवढी लस्सी पिऊन घ्या…

क्षणाचाही विलंब न लावता, आज लस्सी आणि तीही कंजूष शंकरशेटच्या घरी…जोशीकाकांनी अख्खा तांब्याच तोंडाला लावून फस्त करताच, लांब कानाच्या जोशीकाकांच्या कानावर शब्द पडले…आई, सकाळी उंदीर पडलेली लस्सी काकांनी अख्खी संपवली….मोहन सांगत होता…


इकडे जोशीकाका रागाने लालबुंद, त्यांनी पुन्हा तांब्या हाती घेतला आणि फरशीवर जोरात आदळला, तांब्या फुटल्याचे बघून, मोहन पुन्हा आईला म्हणाला, आई काकांनी रागाने तांब्या फोडला गं….आता सकाळी आपण दोन नंबरला जातांना काय वापरायचे..त्यावर आई म्हणाली, मेल्या तो ग्लास उचलून आण,तुझ्या बापाची लघवी आपण लॅब मध्ये त्यातच तपासायला नेतो…


हा चुटका तसा जुना आहे पण त्यातला मतितार्थ असा कि तुम्हाला जे नको ते लोकांना काढून देऊ नका तर जे तुम्हालाही हवे असे, हवे हवेसे वाटते ते लोकांना अगदी मनापासून काढून द्या, आणि हेच बुलडाणा अर्बन बँकेच्या, पतपेढीच्या भाईजी राधेश्याम चांडक यांनी केले, आजही किंवा ३२ वर्षांपूर्वीही आमच्या बुलडाणा जिल्ह्यातल्या समस्त मंडळींना ज्या पै पै पैशांची गरज आहे किंवा गरज होती ती त्यांनी हि पतसंस्था काढून बऱ्यापैकी पूर्ण केली, जेव्हा या राज्यातले समस्त बँकवाले मराठींकडे किंवा राज्यातल्या सामान्य जनतेकडे आधी हिडीस फिडीस करायचे नंतर बाहेर काढायचे तेव्हा राधेश्याम चांडकजींनी त्यांना पोटाशी धरले आणि बँकेतर्फे जेवढे शक्य होते ते ते केले, आजही मुक्तहस्ते करताहेत म्हणून बुलडाणा अर्बन मोठी झाली, चिकित्सक पुण्यात देखील बस्तान बांधून मोकळी झाली, आता तर थेट मुंबईत आली. शहरांमधल्या महाविद्यालयात शिकायला ग्रामीण भागातून आलेल्या गावरान मुलींना जशा शहरातल्या मुली जवळ येऊ देत नाहीत, नाकाला पदर लावून त्यांना एकाकी पडतात, तेच सुरुवातीला बुलडाणा अर्बन च्या बाबतीतही घडले, बुलडाण्यातली म्हणजे थेट खेड्यातली पतसंस्था म्हणून ती शहरात आल्यानंतर आधी डिवचल्या गेली, हिणवल्या गेली नंतर मात्र तिची झेप बघितली, भरारी पाहिली 

आणि स्पर्धकांच्या माना तदनंतर आपोआप खाली गेल्या, बुलडाणा अर्बनला मिळणारे यश बघून बँकांचाही मनात धडकी भरली. वा चांडकजी..


येथे एका व्यक्तीचा उल्लेख केला नाही तर तो अन्याय ठरेल. डॉ. सुकेश झंवर हे ते नाव, राधेश्यामजींचे ते जावई, ते साधेसुधे डॉक्टर नाहीत, उच्च शिक्षित डॉक्टर असूनही त्यांनी आपल्या यवतमाळ मधल्या प्रॅक्टिसकडे पाठ केली थेट बँक गाठली आणि ते या कटकटीचा क्षेत्रात उतरले. त्यांनी बुलडाणा अर्बनला आधुनिकतेकडे नेले. दोन्ही जावई हीच भाईजींची मुले, त्यांना दोन मुलीच आहेत, दुसरी मुलगी आणि जावई पुण्यात आपल्या व्यवसायात व्यस्त असल्याने भाईजी यांनी काढलेल्या शैक्षणिक संस्थांची आणि बँकेची जवळपास सारी जबाबदारी त्यांच्या या जावयावर आणि मुलीवर आहे, वानप्रस्थाश्रमाकडे निघालेले चांडकजी आज नक्की सुखी आणि समाधानी आहेत, सभासद म्हणतात, थँक यु डॉ. झंवर…


बुलडाणा अर्बन च्या बाबतीत हे म्हणता येईल, एका झपाटलेपणातून हि पतसंस्था स्थापन झाली, भल्या भल्या बँकांना या दुर्गम भागातून आलेल्या पतसंस्थेने मागे टाकले वरून कृतिशील सामाजिक बांधिलकीची कास धरत अर्थकारणाच्या क्षेत्रात देखील माणुसकीचा प्रसार करत राहिली. आज तिच्या जवळपास ४२२ शाखा आहेत आणि अमाप विश्वास संपादन केल्याने बुलडाणा अर्बन चक्क पतसंस्था असून देखील आणखी आणखी फोफावते आहे, सारे यश चक्रावून सोडणारे. मुख्य म्हणजे बुलडाणा अर्बन ने आर्थिक क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक क्षेत्रात देखील आपली मोहोर उठवली म्हणून त्या त्या परिसरात ती दुर्गम भागातून येऊनही पटकन झटकन लोकप्रिय झाली. पारदर्शक व्यवहार,तत्परता, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, कोअर बँकिंगच्या साहाय्याने अनेक शाखांची जोडणी, विशेष म्हणजे अगदी नोटबंदीच्या काळातही आणि नेहमी जनसामान्यांकरिता वेळेला आणि वेळेवर पैसे उपलब्ध करून देणे, मी जे बघितलंय, बघून वाटते, आपण आयसीआयसीआय सारख्या एखाद्या जागतिक स्तरावरल्या बँकेत आलोय, मला वाटते चांडकजींनी ३२ वर्षात घेतलेल्या मेहनतीचे, कष्टाचे, संपादन केलेल्या विश्वासाचे ते फळ आहे…

अपूर्ण:

पत्रकार हेमन्त जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *