खडसे खतरे में : भाग २: पत्रकार हेमंत जोशी


खडसे खतरे में : भाग २: पत्रकार हेमंत जोशी 

सत्ता हि पिंजरा सिनेमातल्या मास्तर सारखी अवस्था करते. सत्तेचा कैफ भल्याभल्यांचा पिंजरा सिनेमातला मास्तर करतो, सत्तेच्या व्यसनापायी मग हा नेता त्या मास्तर सारखा काहीही करतो आणि स्वतःचे वाटोळे करून घेतो. सत्तेत बसल्यानंतर आपोआप होणाऱ्या घडणाऱ्या चुका या व्यसनाधीन झालेल्या व्यक्तीसारख्या हे कळत असूनही कि पुढे त्यात सत्यानाश आहे तरीही चुका भानगडी करतात  कारण सत्ता हि चीज अशीच आहे कि ज्याला सत्तेचे व्यसन जडले आणि सत्तेतून जो मोह उत्पन्न होतो मोह वाढीस लागतो त्या नेत्याला त्या त्या व्यक्तीला मग दुसरे काहीही सुचत नाही, समाजसेवा लोकसेवा गरिबांची सेवा राज्याची प्रगती या साऱ्या केवळ अफवा असतात ठरतात. राज्याच्या राजकारणावर सुरुवात करण्यापूर्वी एकनाथ खडसे हा विषय येथे संपवून मोकळा होतो. खडसे आणि कुटुंबाला चढलेला सत्तेचा कैफ हाच त्यांच्या राजकीय अस्ताचे कारण ठरणार आहे. बघा, चार दिवसात खडसे शांत झाले आणि खडसे हा विषय भाजपा व त्यांच्या नेत्यांसाठी जवळपास संपलेला आहे. ज्यांनी पक्षांतर्गत आदळआपट केली त्यांचे पुढे फार भले झाले असे कधी घडले नाही आणि एकनाथ खडसे यांच्यासमोर तर सुरेशदादा जैन हे त्यासाठी उत्तम उदाहरण होते. कायम सतत आदळआपट करीत राहिल्याने जे सुरेशदादा आणखी खूप काही मिळवून मोकळे झाले असते उलट त्यांच्या त्या आक्रस्ताळ्या स्वभावातून  त्यांच्या राजकीय आयुष्याचा शेवट दुर्दैवाने तुरुंगात झाला, राजकारणातला जळगाव जिल्ह्यातला हा वटवृक्ष गर्व झाल्याने उन्मळून पडला…

एकनाथ खडसे यांच्याही बाबतीत नेमके तेच घडते आहे किंवा घडले आहे निदान यापुढे तरी त्यांनी त्यांच्याच पक्षश्रेष्ठींपुढे नरमाईचे धोरण स्वीकारून तुम्हाला यापुढे पुन्हा पूर्वीचा किंवा पूर्णतः बदललेला एकनाथ दिसेल सांगून मोकळे व्हावे त्यातच त्यांचे व त्यांच्या पाठी त्यांच्या कुटुंबाचे अधिक भले आहे. जसे एकेकाळी जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरेशदादा जैन अनभिषिक्त सम्राट म्हणून गाजले नावाजले तदनंतर त्यांची जागा एकनाथ खडसे यांनी घेतली, आज फारसे वेगळे चित्र नाही खडसे यांचाही सिनेमातला राजेश खन्ना होतो आहे, जिल्ह्यातला राजेश खन्ना नंतरचा सुपरस्टार जसा अमिताभ बच्चन होता तसा तेथे तो राजकीय सुपरस्टार सध्या गिरीश महाजन आहे, मधेच एखादा सलमान खान मोठा होऊ शकतो कारण सत्तेत टिकून राहण्यासाठी आधी पाय जमिनीवर असणे अत्यावश्यक आवश्यक गरजेचे असते. अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे सत्तेत इतरांनाही सहभागी करून घ्यायचे असते, पैसे आणि सत्तेतली सारी महत्वाची पदे फक्त माझ्या कुटुंबासाठी म्हणजे कधी पत्नीसाठी तर कधी एकुलत्या एक मुलासाठी कधी विधवा सुनेसाठी तर कधी लाडक्या मुलींसाठी, त्यापलीकडे एकनाथ खडसे यांना मला वाटते दुसरे जग असते, विसर पडल्याने त्यांच्या या स्वकेंद्रित सत्ताकेंद्राचा त्यांना तोटा झाला आणि ज्याला त्यांनी तोवर दाबून ठेवले होते तो तडतड्या गिरीश महाजन अचानक उफाळून वर आला व केवळ जिल्ह्यातीलच नव्हे तर खान्देशातला यशस्वी मोठा नेता म्हणून नावारूपाला आला….


www.vikrantjoshi.com

गिरीश महाजन यांना मी त्यांच्या अगदी तरुण वयापासून बऱ्यापैकी जवळून बघत आलो, माणूस एकदम खूप खट्याळ आणि मस्तीखोर आहे म्हणजे एकदा का त्याने ठरविले कि अमुक व्यक्तीला बिलगून कवटाळून मिठीत घट्ट पकडून जवळ घेऊन पटापट मुके घेऊन मोकळे व्हायचे कि मग तो त्यात यशस्वी होऊनच बाहेर पडतो, त्याचे हे घट्ट बिलगून राहणे म्हणजे मैत्रीला जगणे विशेषतः चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही प्रभावी पक्ष नेत्यांना मनापासून आवडले भावले, मग त्यांनीही महाजन यांना मिठीत घेतले कुरवाळले, इश्य आणि गोंजारले देखील, तोपर्यंत एकनाथ खडसे यांची राजकीय मिठी सैल पडली होती ढिली पडली होती, त्याचा नेमका फायदा महाजन यांना झाला आता निदान खान्देश पंचक्रोशीत तरी भाजपा पक्ष श्रेष्ठींना महाजन प्रभावी ठरल्याने खडसे यांची तेवढी गरज उरलेली नाही. उद्या समजा चुकून खडसे भाजपातून बाहेर पडले असते तर याच जळगाव जिल्ह्यात जे ११ आमदार विधान सभेवर आहेत त्यापैकी एकही त्यांच्या संगतीने बाहेर पडला नसता, अगदी ज्या आमदार संजय सावकारे यांना खडसे यांनी मोठी राजकीय ताकद देऊन भुसावळ मधल्या वादग्रस्त चौधरी बंधूंना राजकीय अडगळीत नेऊन सोडले ते संजय सावकारे देखील एकनाथ खडसे यांच्या सोबत बाहेर पडले नसते, एकेकाळी जळगाव जिल्ह्यातले ताकदवर ठरलेले गुजर समाजाचे नेते आणि कार्यकर्ते देखील आता खडसे यांच्यापासून केव्हाच दूर गेले आहेत कारण या समाजाला त्यांचे रावेर चे नंदू महाजन हे विधान सभेला उमेदवार म्हणून हवे होते पण खडसे यांनी तेथेही रोहिणीला म्हणजे पोटच्या पोरीला पुढे केले, गुजर समाज खडसे यांच्यावर रुसला आणि रोहिणीच्या विधान सभेला पराभव झाला. त्याचवेळी अशाप्रकारे एकनाथ खडसे संपत गेले किंवा संपत चालले आहेत त्यांनी आता तरी सावध व्हावे. खडसे यांच्यावर आणखीही व्यापक पुढे केव्हातरी कधीतरी नक्की लिहिता येईल…

तूर्त एवढेच : हेमंत जोशी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *