मराठा आरक्षण आणि माजी संरक्षण मंत्री : पत्रकार हेमंत जोशी


मराठा आरक्षण आणि माजी संरक्षण मंत्री : पत्रकार हेमंत जोशी 
दिवंगत बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांसारखे असे फार कमी नेते माझ्या बघण्यात आले ज्यांनी कधी जातीपातीचे संदर्भ जोडून राजकारण केले नाही त्यात या दोघांपेक्षा दिवंगत बाळासाहेब तर फारच पुढले होते, मला वाटते जात असते यावर त्यांचा कधी विश्वासच नसावा त्यांना माणूस आणि माणुसकी या दोनच जाती तेवढ्या ठाऊक होत्या. शरद पवारांच्या बाबतीत मराठेतर खाजगीत कायम बोंबा मारून मोकळे होतात कि पवारांना तेवढे मराठा दिसतात, इतर जातींना ते खुबीने वापरून सोडून देतात. माझा त्यावर आक्षेप आहे, थोडेफार तसे असू शकते पण शरद पवारांना गेली चाळीस वर्षे मी बारकाईने न्याहाळत असतांना माझ्या असे लक्षात येते कि त्यांना ब्राम्हणांविषयी मनात असूया किंवा राग असू शकतो त्यातून ते ब्राम्हणांना फारसे जवळ घेतांना कधी दिसले नाहीत किंवा त्यांचा आम्हा ब्राम्हणांवर असलेला राग पदोपदी जाणवतो विशेष म्हणजे इतरांसंगे राजकारणात सरकारी नोकरीत ब्राम्हण देखील मोठे व्हावेत त्यांना फारसे वाटले नसावे वाटत नसते  मात्र हा अपवाद सोडल्यास पवारांनी जसे त्यांच्या मराठ्यांना लिफ्ट दिली तशी त्यांनी ब्राम्हण सोडून इतर मराठेतर कार्यकर्त्यांना देखील मोठी लिफ्ट दिली अगदी अनेक मुसलमानांना देखील प्रसंगी नको तेवढे मोठे केले किंबहुना या पंचवार्षिक योजनेत तर पवारांची मुस्लिम मते काबीज करण्या मोठी धडपड सुरु असल्याचे जाणवते म्हणजे उद्धव यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुसलमानांना आपलेसे करताना त्याचवेळी उद्धव हिंदूंच्या विशेषतः मराठी मतदारांच्या मनातून कसे उतरतील त्यावर देखील त्यांचा प्रयोग मोठा यशस्वी ठरतो आहे, ती वस्तुस्थिती आहे. अनेक कारणांनी हतबल ठरलेल्या उद्धव ठाकरे यांच्या देखील ते लक्षात आलेले आहे पण सावध होण्याची त्यांची वेळ दुर्दैवाने बऱ्यापैकी निघून गेलेली आहे… 

येथे शरद पवार यांची मी बाजू घेत नाही, ब्राह्मणांचे जाऊ द्या पण शरद पवार यांनी फक्त मराठ्यांचे भले साधले हे म्हणणे योग्य नाही, वाटल्यास त्यांनी पश्चिम महाराष्ट्राचे इतर भागाच्या तुलनेत अधिक भले केले म्हटल्यास वावगे ठरणार नाही पण पवारांना फक्त मराठा समाज मराठे नेते हेच डोळ्यासमोर दिसले असते तर ज्या भाजपा सरकारने सत्तेत आल्या आल्या सरकारी नोकरीत खुल्या वर्गातील २५ वर्षे वयाची अट शिथिल करून ती ३२ वर्षे वाढवली ती पवार सत्तेत असतांना कधीही वाढविण्याचा प्रयत्न केल्या गेला नाही असा प्रयत्न पवारांनी केला असता तर या राज्यातल्या आजपर्यंत आणखी हजारो तरुणांना सरकारी नोकऱ्या मिळाल्या असत्या किंवा पवार जवळपास ६० वर्षे सत्तेत आहेत, मराठ्यांची आरक्षणाची मागणी मागील ३५ वर्षांपासून आहे मात्र जेथे भाजपने केंद्रात १० टक्के आणि राज्यात १६ टक्के आरक्षण दिले ते पवारांनी कधीच करण्याचा साधा प्रयत्न देखील केला नाही कारण त्यांच्यासमोर मराठ्यांचे केवळ भले हे टार्गेट नव्हते नसावे. याउलट पवारांनी त्यांच्या पक्षाच्या आमदार शालिनीताई पाटील यांनी मराठा आरक्षणाची मागणी केली म्हणून त्यांना पक्षातून काढून टाकले होते, पुढे तर त्या राजकीय अडगळीत कायमस्वरूपी जाण्या पवारांनी तशी खेळी केल्याचे स्वतः शालिनीताई दाखले देऊन सांगत असतात, अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे त्यांच्या घरातले अजितदादा कधी विनायक मेटे यांना सोबतीला ठेवून तर कधी अन्य काही टग्या मराठा नेत्यांना बिलगून कायम मराठ्यांना अधिक प्राधान्य देतात हे जेव्हा चाणाक्ष शरदरावांच्या लक्षात आले, प्रसंगी अनेकदा कठोर वागून याच शरदरावांनी अजितदादांना स्तोम फारसे वाढू दिलेले नाही आजही दादांचे राजकीय देऊळ शंभर टक्के पाण्यात आहे विशेष म्हणजे दादांच्या संगतीने सोबतीने इतरही बबनराव पाचपुते यांच्यासारख्या ज्या नेत्यांनी केवळ मराठा हे स्तोम माजवण्याचा राष्ट्रवादी पक्षात प्रयत्न केला, पवारांनी अशा प्रभावी नेत्यांना देखील आधी बेदखल केले नंतर अशांचे राजकीय अस्तित्व व महत्व संपविले… 

तुमच्याही ते नक्की लक्षात आलेले असेल कि आजतागायत मुख्यमंत्री म्हणून मराठ्यांसाठी किंवा त्यांच्या आरक्षणासाठी त्यांच्या इतरही मागण्या पूर्ततेसाठी मनापासून धडपड केली ती फक्त आणि फक्त देवेंद्र फडणवीस यांनी, मी त्यांना ज्या नावाने चिडवतो त्यांची ती चीड आता तुम्ही देखील यापुढे कायम करा त्यांना मी देवेंद्र फडणवीस पाटील असे म्हणतो आणि त्यांचे मराठ्यांवरचे मनापासून प्रेम बघता त्यांना यापुढे फडणवीस पाटील याच नावाने ओळखल्या जावे याचा अर्थ तुम्ही उद्धव यांचे शेख उद्धव असे नामकरण करावे असे नाही. मुसलमानांचे मुंबईत आणि राज्यात झपाट्याने वाढणारे स्तोम व महत्व त्याचा त्रास नक्की एक दिवस उद्धव यांना होईल हे त्यांनीही ध्यानात ठेवावे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना ते ज्या पद्धतीने सर्वाधिक मराठा प्रेमात पडले होते माझी समस्त मराठ्यांना मनापासून विनंती आहे कि त्यांनी फडणवीस यांचा जाहीर सत्कार करून त्यांच्या आडनावाचे फडणवीस पाटील असे नामांतर करावे, असे सांगणारे सांगतात कि आजही समस्त मराठा समाजाचे कसे भले साधावे याच चिंतेत म्हणे कायम फडणवीस पाटील असतात. आणि ज्या ज्या मराठ्याला मी भेटतो बोलते करतो त्यांच्या बोलण्यातून त्यांचा सर्वाधिक लाडका नेता म्हणजे देवेंद्र फडणवीस पाटील… 
अपूर्ण : हेमंत जोशी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *