कालचे पुढे ! अय्यागडे ईश्यगडे !!

राष्ट्रवादी आणि भाजपा म्हणजे शरद पवार आणि नरेंद्र मोदी एकत्र येतील त्यांची आघाडी या राज्यात महाराष्ट्रात सत्तेवर येईल हे आता जवळपास नक्की निश्चित झाले आहे, मुहूर्त तेवढा बाकी आहे, बातमी कशी बाहेर आली आणि हेमंत जोशी लिहून मोकळे झाले त्यावर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये खळबळ माजलेली आहे आणि शरद पवारांच्या मनात तर कुतूहल जागे झाले आहे पण एक बरे झाले कि नजीकच्या काळात राष्ट्रवादी आणि भाजपा एकत्र येताहेत हे शिवसेनेला विशेषतः उद्धव ठाकरे यांना आता माझ्या माध्यमातून समजले आहे म्हणजे ते देखील आपला मंत्रालयातील गाशा गुंडाळायला घेतील आणि पुढली रणनीती राजनीती आखून मोकळे होतील. एक मात्र माझ्या याआधीच्या लिखाणातून भाजपा नेत्यांना जे खटकले किंवा खुद्द प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जे मत त्यांच्या एका जवळच्या आमदाराजवळ व्यक्त केले त्यातून माझे काही महत्वाचे मुद्दे लिहायचे राहून गेले, चंद्रकांत पाटलांचा मोका मिळताच थेट मुका घेणारा म्हणजे त्यांच्या जो सर्वाधिक जवळचा आमदार आहे त्याने जे मुद्दे मला सांगितले माझ्याकडे उघड केले त्यावर माझे पुढले लिखाण आहे. अर्थात असे नाही कि मी त्या मुद्द्यावर याआधी तुम्हाला काही सांगितलेले नाही. होय ! मी तुम्हाला कित्येक दिवस काही दिवस आधीच हे सांगितले आहे कि शरद पवार हे आपला राजकीय पुनर्जन्म निदान या दिवसात तरी ना सुप्रिया सुळे यांच्यात बघताहेत ना अजित पवारांमध्ये, ना रोहित पवारांमध्ये, यादिवसात पवारांना राहून राहून वाटते कि थेट आशिष शेलार यांना कडेवर उचलून घ्यावे आणि त्यांचे भर चौकात चार चौघात कोडकौतुक करावे…
जरी तसे जाहीर ते सांगत नसले किंवा त्या दोघांचेही राजकीय पक्ष भिन्न असल्याने त्यांना तसे जाहीर करण्यात अडचणी येत असल्याने त्यांना अगदी उघड सांगता बोलता येत नाही पण पवार शेलार हे गुरु शिष्यासारखे प्रेम आता चाणाक्ष मंडळींपासून लपून राहिलेले नाही. शरद पवार यांचे आशिष शेलारांवर मनापासून प्रेम आहे आणि शेलारांनी देखील पवारांना मनातल्या मनात वरले आहे आणि याच गुपित प्रेमप्रकरणाचा मोठा फायदा भाजपाचे तरुण तडफदार दिलदार दमदार नेते तसेच मनात आणले तर संपूर्ण राज्यात आणि कायम मुंबईत त्या शिवसेनेला थेट भिडणारे कायम अंगावर घेणारे, त्यांच्याशी किंवा जात्यंध मुसलमानांशी पंगा घेणारे आशिष शेलार यांना शंभर टक्के होणार आहे. विशेष म्हणजे चतुर हुशार दूरदर्शी राजकीय टरबूज नव्हे तर राजकीय तरबेज माजी नामदार आणि आजचे आमचे आमदार आशिष शेलार यांनी एकनाथ खडसे, विनोद तावडे किंवा पंकजा मुंडे पद्धतीने कधीही त्यांचे मास लीडर देवेंद्र फडणवीस यांना आजपर्यंत आजतागायत एकदाही कधीही केव्हाही कोठेही अंडर एस्टीमेट न केल्याने थेट देवेंद्र फडणवीस यांचे देखील ते आवडते आहेत हि त्यांची सर्वात मोठी जमेची बाजू आहे आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे शेलार यांची अगदी घरातल्या सदस्यांसारखी त्यांच्या वरिष्ठांशी, दिल्लीतल्या प्रत्येक मोठ्या नेत्यांमध्ये उठबैस आहे, घरोबा आहे, घरच्या सारखे संबंध आहेत त्यामुळे पुढले मुख्यमंत्री होतांना त्यांना कोणतीही अडचण येणार नाही, सारेच्या सारे त्यांच्या नावाला पाठिंबा देतील त्यामुळे यापुढे भावी मुख्यमंत्री म्हणून आशिष शेलार हे स्पर्धेत पहील्या नंबरवर असतील. इतरांचाही विचार नक्की केल्या जाईल अगदी माजी मंत्री आणि माजी भाजपा प्रदेशाध्यक्ष सुधीरजी मुनगंटीवार यांचे देखील नाव चर्चेत असेल पण गडकरी यांच्याशी बांधिलकी, त्यांना कायम अडचणीची ठरते, यावेळी देखील तेच घडेल त्याऐवजी त्यांचा प्रदेशाध्यक्ष म्हणून विचार केल्या जाऊ शकतो…
आता अतिशय महत्वाच्या मुद्द्याकडे वळतो. तुटलेला धागा जसा पुन्हा जोडल्या जात नाही, घरातली बिघडलेली दुरावलेली नाती जशी पुन्हा एकमेकांना जवळ आणत नाहीत तेच राजकारणात बरेचदा बघायला मिळते. विशेषतः शरद पवारांच्या मनात अमुक एखाद्याविषयी एकदा जर का राग उत्पन्न झाला नफरत निर्माण झाली तर ती ज्या नेत्यांविषयी व्यक्तींविषयी निर्माण झालेली असते त्या त्या माणसाला मग पवार यांच्यापासून अनेक वेदना भोगाव्या लागतात, चिडखोर सासूसारखा त्रास व अपमान पदोपदी सहन करावा लागतो, नेमके हेच अगदी सुरुवातीपासून त्यांचे देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत घडले आहे, विशेष म्हणजे मी तर त्याही कालखंडाचा अगदी जवळून साक्षीदार आहे ज्या काळात हेच पवार त्या गोपीनाथ मुंडे यांना देखील आजच्या देवेंद्रसारखे थेट खूप उघड कायम पाण्यात पाहायचे बघायचे आणि शरद पवार यांची हि मला न भावलेली अतिशय वाईट अशी खोड व सवय आहे ज्यामुळे भलेभले राजकीय नेते किंवा तत्सम अनेक उध्वस्त झाले आहेत, ज्या पद्धतीने त्यांच्या हयातीतच फडणवीस देखील असे उध्वस्त व्हावेत ते तसेच पवारांचे वागणे बोलणे व खेळणे सतत सुरु असते अर्थात त्यात शरद पवार यांची शंभर टक्के चूक आहे म्हणता येणार नाही कारण गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस या राज्यातले एकमेव अद्वितीय ज्यांनी शरद पवार यांना थेट राजकीय आव्हान दिले त्यांच्या अनेकदा नाकात दम आणला, थेट पवारांचे विश्वासू साथीदार त्यांच्या घरातले सदस्य फडणवीसांनी आपल्याकडे खेचून राष्ट्रवादी अनेकदा खिळखिळी केली असल्याने शरद पवार यांना फडणवीसांचे हे थेट व महागडे आव्हान कायम झोंबले आहे त्यातून त्यांना काहीही झाले तरी निदान या राज्यात फडणवीसांना तोंड वर करु द्यायचे नाही आणि आपल्या राजकीय निवृत्तीआधी व आपल्या हयातीत आपल्यासारखे फडणवीसांना आव्हान देणारा नेता प्रसंगी भाजापामध्ये देखील निर्माण करायचा म्हणून यापुढे पवारांना साऱ्यांचे लाडके देवेंद्र फडणवीस येथे या राज्यात काहीही झाले तरी पुन्हा मुख्यमंत्री म्हणून नको आहेत त्याऐवजी त्यांना त्यांचा लाडका त्यांचा विश्वासू आशिष शेलार एकमेव नक्की चालणारा हा मुख्यमंत्री नवा हवा आहे. फडणवीसांचा निदान आज तरी पवार यांनी गोपीनाथ मुंडे करून ठेवला आहे, हि भळभळणारी जखम माझ्यासारख्या फडणवीसांच्या चाहत्यांना आता यापुढे कायमस्वरूपी बँडेज बांधायला भाग पाडणार आहे जे अत्यंत दुर्दैवी आहे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

Comments 2

  1. गामा पैलवान says:

    नमस्कार हेमंत जोशी!

    याचा अर्थ शिवसेनेची वाट लावून झाल्यावर आता शरद पवार भाजपचीही वाट लावणार तर. की शिवसेनेची म्हणावी तशी वाट लावता येत नाहीये म्हणून पवारसाहेब तुलनेने कच्च्या भिडूकडे म्हणजे भाजपकडे वळलेत? फडणवीस महाराष्ट्रात नसतील तर आपल्याला रान मोकळं मिळेल, अशी काहीशी पवारांची गणितं दिसताहेत.

    आपला नम्र,
    -गामा पैलवान

  2. सतीश says:

    मागच्या लेखात लिहिले की पवारांना नितीन गडकरी मुख्यमंत्री म्हणून हवेत. या लेखात लिहिलंय की पवारांना आशिष शेलार मुख्यमंत्री म्हणून हवेत. पुढील लेखात कोणाचे नाव लिहिणार? गिरीश बापट की चंपा?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *